*महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून राज्याच्या प्रगतीचा संकल्प*
*विधान भवन येथे विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या शुभहस्ते व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन*
मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : “महाराष्ट्राच्या प्रगतीचा, उद्योजकतेचा आणि सामाजिक समावेशाचा प्रवास अधिक वेगाने सुरू ठेवू या” असा संकल्प विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त व्यक्त केला. त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना तसेच जगभरातील मराठी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावर्षीचा महाराष्ट्र दिन विशेष आहे कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असून राज्यात महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली विविध प्रगतीशील निर्णय घेतले जात आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आज विधान भवन येथे विधान परिषद सभापती मा. श्री राम शिंदे यांच्या शुभहस्ते व उपसभापती मा. श्रीमती डॉ. नीलमताई गोऱ्हे आणि उपाध्यक्ष मा. श्री. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (१) श्री.जितेंद्र भोळे, सचिव (३) डॉ.विलास आठवले, सचिव (४) श्री.शिवदर्शन साठ्ये, सह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी श्री.राजेश तारवी, सह सचिव श्री.नागनाथ थिटे, उप सचिव श्री.सुभाष नलावडे, श्री.रविंद्र जगदाळे, श्रीमती पूनम ढगे, श्री.उमेश शिंदे, श्री.विजय कोमटवार, श्री.मोहन काकड यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य सुरक्षा अधिकारी श्री.राजू भुजबळ आणि राखीव पोलीस उप निरीक्षक श्रीमती अरुणा जॉन्सन बुरकेन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.
डॉ. गोऱ्हे यांनी यावर्षीच्या विशेष वैशिष्ट्यांचा उल्लेख करताना सांगितले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी आणि विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना राबविल्या आहेत.” लाडक्या सव्वा दोन कोटी महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सरकारने केला असून Waves या सांस्कृतिक, सामाजिक व तंत्रज्ञानाधिष्ठित प्लॅटफॉर्मचे महाशिखर संमेलनही यानिमित्ताने मुंबईत होत आहे.
या Waves परिषदेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १ मे रोजी मुंबईत उपस्थित राहणार आहेत, यावरही डॉ. गोऱ्हे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की या परिषदेमुळे महाराष्ट्रातील डिजिटल व सांस्कृतिक क्षेत्राला चालना मिळेल.
राज्याच्या प्रगतीचा आणि सामाजिक समावेशाचा मार्ग अधिक भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्धार करावा, असे आवाहनही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केले.