अलौकिक सोहळा, 28 जुलै, 2024 रोजी “कर्तुत्वाचा महासन्मान सोहळा”
बन्सीलाल पॅलेस, अमळनेर येथे संपन्न झाला.. या सोहळ्यातील काही ठळक बाबी ज्या लक्षात राहण्याजोग्या होत्या..त्या मी माझ्या नजरेतून येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे..
केवळ झूम मीटिंग द्वारे चर्चा करत या सोहळ्याच नियोजन झालं.. सर्व सभासदांनी जबाबदाऱ्या स्वीकारल्या..आपण काहीतरी केले पाहिजे, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो.. हा ठायीभाव असलेले कपिल पवार साहेब यांनी आम्हा सर्वांना एकत्र घेत.. ज्यांनी कष्टातून यश मिळवले आहे, आपल्या खानदेशाच्या मातीतील तरुणांचा सन्मान होणे.. हे आद्य क्रमाचं काम आहे असं जाणून या “कर्तृत्वचा महासन्मान” सोहळ्याचे आयोजन केलं.. कपिल पवार साहेबांबद्दल इतकं विनम्र कोणी असू शकतं का? यावर माझं अजून एक मत होत नाही.. एमपीएससी सारख्या कठीण परीक्षा देऊन मोठ-मोठे पद उपभोगून, प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याच्या पाऊलखुणा उमटवून आणि आता नाशिक आदिवासी आयुक्तालय, नाशिक विभागाचे जॉईंट कमिशनर या पदाला गवसणी घालणारे अधिकारी असून देखील सामान्य लोकांना आपल्यातीलच वाटावे असे हृदयस्त व्यक्ती कपिल पवार साहेब आहेत.. असं मला या त्यांच्या सहवासातून जाणवलं. त्यांच्या कार्याला साथ देणारे, नेहमीच तत्पर असणारे ज्यांचे कार्य देखील वाखाण्याजोग आहे असे, बँकिंग क्षेत्रात काम करून देखील आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे मयूर पाटील साहेब देखील त्यांच्या हाकेला नेहमी ओ देतात आणि इतर मंडळी देखील या कार्यात जी जी मदत करता येईल ते करतात.. हे इथे उल्लेखनीय आहे.. असे मला जाणवले..
कार्यक्रमाचे मुख्य सत्कारमूर्ती मंगळग्रह संस्थांचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले सर व नोबेल फाउंडेशन, जळगावचे अध्यक्ष, उत्तम वक्ते डॉ.जयदीप पाटील सर हे होते. आणि माजी आय आर एस अधिकारी आदरणीय डॉ.उज्वलकुमार चव्हाण साहेब, अमळनेर विभागाचे डी वाय एस पी सुनील नांदवाडकर साहेब, सारथी संस्था पुणेचे उप व्यवस्थापक अनिल पवार साहेब, प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. शरद बाविस्कर आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते..सत्कारार्थी मध्ये विशेष सन्मान ज्याचा होणार होता तो साने गुरुजी विद्यालयाचा विद्यार्थी ज्याने असंख्य संकटांवर मात करत असिस्टंट कमांडंट पदी विराजमान होण्याचा मान मिळवला, असा यशपाल पवार, जिज्ञासा धनगर, क्रांती पाटील सारखे अभियंते व पोलीस दलात व आर्मीमध्ये भरती झालेले सर्व नवजवान या ठिकाणी उपस्थित होते..यांच्या समवेत त्यांचे पालक आणि अमळनेर नगरीतील सुजाण असे नागरिक, ज्यांना उज्वल खानदेश व्हावा वाटतो, असे बरेच व्यक्ती या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. कार्यक्रम नियोजनाचे सर्वेसर्वा कपिल पवार साहेब यांनी कार्यक्रम आयोजनाचे प्रास्ताविक केले.. सूत्रसंचालन युनियन बँकेचे शाखाधिकारी मयूर पाटील करत होते.. सर्वांचे स्वागत झाल्यानंतर यशपाल पवार याने आपल मनोगत व्यक्त केलं.. अतिशय चपलक आणि सफाईदार शब्दात त्याने आपलं मनोगत व्यक्त केलं.. त्याच्या प्रत्येक शब्दातून त्याचा खडतर प्रवास जाणवत होता आणि त्याला ऐकताना मनोमन असं वाटत होतं..
*”मुश्किले दिल के इरादे आजमाती है,*
*सपनो के पर्दे निगाहों से हटाती है,*
*हौसला मत हार गिरकर ओ मुसाफिर,*
*ठोकरे इंसान को चलना सिखाती है..”*
चार पाचदा एक्सीडेंट होऊन सुद्धा त्याने जिद्द सोडली नाही.. हे इथं नमूद केले पाहिजे.. आजकाल असे तरुण आणि त्या तरुणांमधील जिद्द लयास जाताना दिसते.. परंतु अशा परिस्थितीत त्याने हे उत्तुंग यश मिळवले.. हे खरंच काबिले तारीफ आहे.. आणि पुढे जाऊन अजून मोठा सन्मान स्वीकारण्याची त्याची जिद्द तर सलाम करण्याजोगी..
त्यानंतर मुख्य सन्मान झाले.. सन्मानाला उत्तर देताना डॉ.जयदीप पाटील सर जे नियमित तरुणांना आणि सर्वांना प्रेरणा देत आलेले आहेत.. ते मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले.. ते माझे आवडते वक्ते असल्यामुळे ज्याप्रमाणे नळाला पाणी आल्यावर टाकीतील उरलेले पाणी खाली करून ती स्वच्छ धुवून नवीन पाणी भरण्यासाठी ती टाकी सज्ज करावी त्याप्रमाणे मी माझ्या मनातून सारे विचार सांडून सरांचे विचार ग्रहण करण्यासाठी तयार झालो.. सरांच्या वाणीतून विनम्रतेचा भास होत होता.. अमळनेर विषयी त्यांना कमालीची आसक्ती आहे.. स्वतःच्या सन्मानाबद्दल आभार मानत आपण या ठिकाणी का जमलो आहोत?आपण भविष्यात काय केले पाहिजे? आपली संस्कृती कुठे चालली आहे? याबद्दल अनेक विचार त्यांनी मांडले.. कर्तुत्ववान होऊन आई-वडिलांची हेडसांड करता कामा नये..हा आवर्जून सल्ला त्यांनी उपस्थित सन्मानार्थिंना दिला.. संस्काराची उपजत शिदोरी आपण जपली पाहिजे.. वृद्धाश्रम बंद पडले पाहिजेत.. आई-वडिलांची सेवा हेच परम कर्तव्य आहे.. असे देखील त्यांनी नमूद केले. खानदेशाबद्दल विशेष प्रेम त्यांना जाणवत होतं आणि खानदेशातील सांस्कृतिक राजधानी जर कोणाला करायचं असेल तर ते अमळनेरला करायला हवं.. असेही त्यांनी नमूद केले.. बरेच प्रेरित विचार मांडून त्यांनी विराम घेतला..
डॉ.डिगंबर महाले सरांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानाबद्दल आभार मानत माझ्या जीवनात माझ्या मित्रांच भलं मोठं योगदान आहे.. असं सांगताना ते भावुक देखील झाले..
आदरणीय सुनील नांदवळकर साहेबांनी देखील आपले विचार मांडले..त्याचबरोबर सारथी पुण्याचे अनिल पवार साहेब यांनी सारथीच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती बाबत उपस्थिताना अवगत केले..
आणि आता ज्यांच्या मनोगतासाठी, ज्यांच्या शब्दासाठी सगळे जण आतुरलेले होते,असे डॉ. उज्वलकुमार चव्हाण साहेब हे विचार मांडायला व्यासपीठावर उभे राहिले.. त्यांच्या अनोख्या शैलीत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली..
*”चंद्र तेथे चंद्रिका,*
*शंभू तेथे अंबिका,*
*संत तेथे विवेका*
*असणे कीजे..”*
या ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांनी त्यांनी सुरुवात केली.. यावरून त्यांना कीर्तनाचा देखील व्यासंग आहे.. हे जाणवलेच आणि त्यांनी आवर्जून ते सांगितले देखील.. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत.. असे कार्यक्रम राजकारणी कधीच घेऊ शकत नाही, असं ते म्हणाले.. या कार्यक्रमाला एक विशिष्ट उंची आहे.. असं सांगताना त्यांनी हा कार्यक्रम ‘मास’ साठी नसून हा ‘क्लास’ साठी आहे असं ते म्हटले..अमळनेर ने खानदेशाची वैचारिक धुरा नेहमीच सांभाळलेली आहे.. याचा नेहमी चाळीसगावकरांना हेवा वाटतो.. कार्यक्रम आयोजनाच्या उद्देशाबाबत बोलताना त्यांनी ज्ञानेश्वरीच्या एका श्लोकाचा आधार घेत
*तरी, जाणिजे झाड फुले।*
*कां मानस जाणिजे बोले।*
*भोगे जाणिजे, केले ।* *पूर्वजन्मीचे ||…*
उपस्थितांची मने जिंकली..
यश संपादन केल्यानंतर हुरळून न जाता गावातील संस्कार आणि गावातील प्रथा,परंपरा या आपण जपल्या पाहिजेत.. तेथील लोकांना आपण नमस्कार वगैरे केल्याने त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल प्रेम निर्माण होते.. हे गमतीदार पद्धतीने त्यांनी विवेचन केले..जगण्याची समृद्ध अळगळ जरी असली तरी गावातील गोष्टी आपण जपल्या पाहिजेत.. नातेसंबंध आपण जपले पाहिजेत, असेही त्यांनी प्रतिपादन केले.सामाजिक कार्य करताना, पाणी आणण्यासाठीची धडपड करताना समाजाने, गावकर्त्यांनी त्यांना कशा पद्धतीने त्रास दिला हेही.. त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले.. परंतु या सर्व्यातून सकारात्मकता घेऊन त्यांनी पुढील आपले काम सुरू ठेवले हे देखील नमूद केले.. त्यांच्या मनोगतातून प्रेरणा ओतप्रोत वाहत होती.. उपस्थित सर्व त्यांना कान देऊन ऐकत होते..बऱ्याच विचारांची सर-मिसळ करत त्यांनी आपल्या विचारांना विराम दिला आणि अमळनेर मध्ये धडपड करणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी एक हॉल असावा असा मानस व्यक्त केला..
कार्यक्रम दोन वाजेपर्यंत नॉनस्टॉप चालला… तरी देखील उपस्थितांमधून कोणी हु की चू झाले नाही..कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली..
जीवन जगत असताना समृद्ध करण्यासाठी अति महत्वपूर्ण हा कार्यक्रम ठरला..
भेटूया,पुढील वर्ष अशाच दर्दी प्रेक्षकांसमवेत आणि कर्तुत्वान सन्मानार्थ्यांना घेऊन..
*लेखन:-*
*शरद भिका पाटील* उपशिक्षक,विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज..अर्थात अमळनेर