कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव…
जातीचा अहंकार अमानुषतेला जन्म देतो..!
विचारवंत सुनील शिंदे यांचे प्रतिपादन….
जळगाव : आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला. दिनांक १७ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने क्रांती विचाराचे पहिले पुष्प पुरोगामी विचारवंत सुनील शिंदे यांनी गुंफले. काव्यरत्नावली चौकात झालेल्या या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमात “जातिअंताची लढाई” या विषयावर आपले अभ्यासपूर्ण व्याख्यान देताना सुनील शिंदे यांनी जातीअंताची लढाई या विषयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम वाचा फोडली. त्यांनी १९३६ मध्ये लिहिलेल्या ‘जातीचा विद्ध्वंस’ या निबंधापासून सुरुवात झाली. तत्कालीन समाज व्यवस्थेचा विचार करता सयाजी गायकवाड यांनी देखील विदेशी वर्तमानपत्राला एक इंग्रजी लेख लिहून जातीअंताच्या लढाईचे रणशिंग फुंकले होते. कॉम्रेड शरद पाटील यांनी मार्क्सवाद, फुलेवाद आणि आंबेडकरवाद हे तीनही तत्त्वज्ञानी प्रवाह आपल्या ग्रंथातून आणि भाषणांमधून नियमितपणे समाजासमोर मांडत जातीअंताची लढाई चा प्रारंभ केला. जातीची अस्मिता किंवा जातीचा अहंकार हा अमानुषतेला जन्म देतो.जातीव्यवस्था हा भारताला लागलेला कलंक आहे. ब्राह्मणी प्रवृत्ती सध्या जातीला जात म्हणत नाही, तर तिने नवीन नाव दिले आहे ते म्हणजे ‘समाज’, समाज म्हटले म्हणजे जात झाकली जाते. इंग्रजीमध्ये त्याला ‘सोसायटी’ असे म्हणतात. हे ब्राह्मणी षडयंत्र आहे,यातून जात बळकट होत राहते आणि ब्राह्मणी व्यवस्थेला आपले स्वार्थ साधता येतात. बाबासाहेब आंबेडकर आणि सयाजी गायकवाड या दोघांनी स्नेहभोजन आणि आंतरजातीय विवाहाला चालना दिली. सजातीय विवाह होत राहिले की त्याच जातीचे पुनरुत्पादन होत असते. महात्मा फुलेंनी आपल्या मृत्युपत्रांमध्ये लिहिले होते की, ब्राह्मण आणि भटाळलेल्यांची सावली सुद्धा माझ्या मृत्यूश्येवर पडू नये. १ जानेवारी,१८४८ ला पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या शाळेमध्ये चार ब्राह्मण मुली, एक धनगर आणि एक मराठा अशा सहा मुली शिक्षण घेत होत्या. समाज व्यवस्थेची उतरंड ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहे.खाली तळाला स्त्री आहे. बाईला जात नाही. त्यामुळे मुले जन्माला आली तरी बापाची जात घेऊन ते जन्म घेत असतात, हे या व्यवस्थेचे विदारक सत्य आहे.
लव जिहाद मध्ये आपण पाहिलं तर ब्राह्मण मुलगी असली किंवा दलित मुलगी असली तरी लवजिहाद होत नाही. लव जिहाद मध्ये नेहमीच ओबीसी मुलीला टार्गेट केले जाते. त्यामुळे जात २००-४०० वर्षात अधिक घट्ट ,मजबूत आणि कर्मठ बनत जाते. बुद्धाच्या काळात जाती व्यवस्था नव्हती अमर्त्य सेन या अर्थशास्त्रीने नोबेल पुरस्कार मिळवला. त्यांनी आपल्या प्रबंधातून सप्रमाण सिद्ध केले की, इ.स. १ साली भारताची लोकसंख्या दोन करोड होती. भारताचा जीडीपी ३१.५ होता, याचा अर्थ त्याकाळी भारतामध्ये आर्थिक संपन्नता होती, आणि त्यावेळेस बौद्ध तत्त्वज्ञानाचे राज्य भारतभर होते. जातीचे समूळ उच्चाटन करायचे असल्यास आंतरजातीय विवाह झालेल्या जोडप्यांच्या मुलाची जात लिहू नये. कायद्याने ते लिहिले जाऊ नये यासाठी लढा उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजातले ऑनर किलिंग थांबतील, प्रत्येक माणसाने डिकास्ट व्हायची गरज आहे. भारतीय समाज रचनेमध्ये धर्म, जात, कुटुंब यांना आपण जन्मात घातले, आणि यांनाच आपल्या शोषणाची परवानगी दिली आहे. जात, धर्म, कुटुंब, सत्ता, संपत्तीच्या बळावर आपण संमतीने गुलाम आहोत. आपली मैत्री होते म्हणजे कशावरून तर, आपल्या आवडी-निवडी, सवयी, विचार एकमय झाले की मैत्री प्रस्थापित होते. पण तरी देखील आपल्या सबकान्शेस माईंड मध्ये असलेली ‘जात’ निघता निघत नाही. त्यासाठी जातीअंताच्या उपाययोजनेची गरज आहे. असे परखड आणि सडेतोड मत शिंदे यांनी मांडले.
अध्यक्ष मनोगतातून आरक्षण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांनी कॉम्रेड शरद पाटील यांची जयंती का साजरी करावी? याबद्दल उद्बोधन केले. नामांतर लढ्यामध्ये शरद पाटील नावाचा माणूस तुरुंगात गेला. आदिवासींच्या लढ्यासाठी स्वतः रस्त्यावर आणि माध्यमांमध्ये जोरकसपणे लढला. उकई धरणामुळे महाराष्ट्रातील ५० हजार आदिवासी बांधव विस्थापित होणार होते. त्या सगळ्यांना एकत्रित करून जनआंदोलन शरद पाटलांनी उभे केले. एवढेच नव्हे तर शहाद्यामध्ये पुरुषोत्तम सेनेने आदिवासींच्या हत्याकांड केले, त्यावेळेस ५० हजार आदिवासींचा महामोर्चा काॅम्रेड शरद पाटलांनी काढला. मार्क्सवाद, फुलेवाद, आंबेडकरवाद यांची एक सैद्धांतिक मांडणी करून नवे तत्त्वज्ञान उभे केले. १९७० च्या दशकामध्ये फुले- आंबेडकर हे विचारवंत आहेत ते तत्त्वज्ञानी नाहीत हा वाद ब्राह्मणांनी सुरू केला.त्या वादाला हाणून पाडण्याचे काम सप्रमाण पाटलांनी खोडून काढला.फुले आणि आंबेडकरांनी तत्त्वज्ञानी आहेत, हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले. कॉम्रेड शरद पाटील म्हणजेच एक तत्त्वज्ञान आहे. क्रांतीचा विचार आहे. रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता आहे ,अशा सर्वव्यापी आणि समुदर्शी असणाऱ्या कॉम्रेड शरद पाटील यांचा जीवन आणि कार्य दलित, आदिवासी ,महिला आणि बहुजन समाजाला प्रेरणा देणारे आहे.
आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक जयसिंग वाघ यांनी देखील या निमित्ताने कॉम्रेड शरद पाटील यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला. कॉम्रेड शरद पाटील हे एक स्वतंत्र विचारांचे अधिष्ठान आहे. त्यांचा विचार हा तळागाळातील माणसांना मुक्ती देणारा आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. डॉ सत्यजित साळवे यांनी कॉम्रेड शरद पाटील यांच्या ‘अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथाचा दाखला देऊन ब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र हे बहुजनांच्या आणि वंचितांच्या साहित्याचे सौंदर्यशास्त्र असू शकत नाही. बहुजनांच्या अर्थात अनार्यांच्या साहित्याचे सौंदर्यशास्त्र हे स्वतंत्र आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या बुद्ध तत्त्वज्ञानावर ते आधारलेले आहे.अशी मांडणी कॉम्रेड शरद पाटलांनी “अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र” या ग्रंथातून केली आहे, असे मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी केले, तर आभार प्रा.प्रीतीलाल पवार यांनी मानले. कार्यक्रमाला सरोजिनी लभाणे,ॲड. गोयर साहेब, विश्वास बि-हाडे, सोमा भालेराव, श्रीकांत बाविस्कर, भाऊराव इंगळे ,तुकाराम भालेराव, अनिल मेढे, प्रकाश दाभाडे, सुधाकर बिरारी, सुभाष सोनवणे, विजय सुरवाडे, दिलीप सपकाळे, एस.आर.अडकमोल, गोपाळ भालेराव, कैलास तायडे, प्रताप मोरे, ॲड. डी. एस. भालेराव ,सुनील देहडे, मनोहर कोचुरे, प्रीतम तायडे, साधुराम शामनानी, भीमराव खोब्रागडे, दिलीप सपकाळे, टी.एस.भालेराव,वाल्मीक जाधव,फईम पटेल, महेंद्र केदारे, उज्वल निकम, भारत सोनवणे, संजय बागुल, राजू सोनवणे, आनंदा तायडे, दिलीप सपकाळे, रमेश सोनवणे पुरोगामी चळवळीचे असंख्य कार्यकर्ते व नागरिक अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित होते.