पाडळसरे धरणाला पीएम कृषी सिंचन योजनेत अंतिम मान्यता; जलशक्ती विकासासाठी नवे पर्व
पाडळसरे धरण प्रकल्पाला केंद्रीय मंजुरी;
पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या आंदोलनासह लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश
अमळनेर प्रतिनिधी
दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात आयोजित गुंतवणूक बोर्डाच्या (पी आय बी) बैठकीत निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणास अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा समावेश करण्यासंदर्भातील मार्ग मोकळा झाल्याने पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे आनंद व्यक्त आला असून देशाचे जलशक्ती मंत्री ना.सी आर पाटील यांचेसह विविध मान्यवरांचे जाहीर आभार समितीतर्फे व्यक्त करण्यात आले आहे.
पाडळसरे धरणाचे काम गतिमानतेने होण्यासाठी भरीव निधीची आवश्यकता आहे म्हणून सदर धरणाचा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाडळसरे धरण जन आंदोलन समिती करीत असलेल्या आंदोलनाला यश आले असून विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर पाटील यांनी तत्कालीन मंत्री आ.अनिल पाटील,खा.स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत आश्वासन दिल्याप्रमाणे पाडळसरे धरण निम्न तापी प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पी आय बी च्या बैठकीत अंतिम मान्यता प्रदान केली. त्याबद्दल जलशक्ती मंत्री ना. सी आर पाटील, राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन तसेच सदर प्रश्न मार्गी लागावा म्हणून सातत्याने प्रयत्न करणारे माजी मंत्री आ. अनिल पाटील, खा.स्मिता वाघ यांचेही जाहीर आभार पाडळसरे धरण जनआंदोलन समिती तर्फे काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, देविदास देसले, सुनिल पाटील ,महेश पाटील,अमळनेर अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे, रामराव पवार, दिनेश शेलकर,हेमंत भांडारकर, सुरेश पाटील, अजय पाटील ,पुरुषोत्तम शेटे आदींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर आभार व्यक्त केले आहे.