शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय: इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत हिंदी तृतीय भाषा अनिवार्य.
राज ठाकरे आक्रमक होणार!
(मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे)
महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ५ वीच्या वर्गांसाठी हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून शिकवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १७ जून २०२५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळांमध्ये तृतीय भाषेच्या धोरणांतर्गत हिंदी भाषा शिकवणे बंधनकारक असेल. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर संवादाची संधी उपलब्ध होईल, तसेच भाषिक समन्वय साधता येईल, असा शासनाचा विश्वास आहे.
हा निर्णय संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१४ / एस.डी.-४ या क्रमांकाने प्रसिद्ध करण्यात आला असून, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई येथून जारी करण्यात आला आहे.
शासनाच्या या निर्णयाचे स्वागत शिक्षणतज्ज्ञांकडून करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण भाषिक विकासासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे आता कोणती भूमिका घेतात याकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी चेतन पेडणेकर यांनी आपल्या स्टेटस वरती ही पोस्ट टाकून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पवित्रा घेईल अशी शक्यता दिसून येते. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषेचा मुद्दा सर्वच पक्ष करतील. घोडा मैदान जवळ आहे.