• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

माय तू झीजली नसती तर
आम्हाला शिकता आले नसते!!

Jan 2, 2023

Loading

माय तू झीजली नसती तर
आम्हाला शिकता आले नसते!!

भारतात हजारो वर्षांपासून बहुजनांना
गुलामीत ठेवण्याचे षडयंत्र आखले गेले. ह्या विरोधात वेळोवेळी संघर्ष करून येथील मूळवंशियांनी पुन्हा व्यवस्थेवर मात केली.. असा हा संघर्ष चालू राहिला.संतांनी ही या विरोधात आवाज उठवून भागवत धर्माची स्थापना केली.. संतामध्ये नामदेवानी सर्व समाजातील संत एकत्रित करून विषमतेवर मात करणारा वारकरी समाज निर्माण केला.. ह्या संतपरंपरेत अन्यायाविरुद्ध जागृती करणारे संत तुकाराम ते कबीर तसेच संत रविदास होते.. ह्या संतांनी भक्तीचे नव्हे वैचारिक प्रबोधनाचे काम केले.राजे छत्रपती शिवाजी यांनी समतेचे राज्य निर्माण केले.. मराठेशाही जाऊन पेशवाई आली.. ह्या पेशवाईत बहुजनांचे जीणं हैराण झाले . इंग्रज आल्याने पेशवेशाहीचा अंत झाला.. अशा काळात पेशवाईची पाळेमुळे रुजली होती.. त्यांच्या अनिष्ठ परंपरा बहुजनांना बेजार करीत होत्या.. मनुस्मृतीची नियम कर्मठ भट, पुरोहित पाळत होते.. बहुजनांना शिक्षण बंदी होती. स्त्रीला तर यापेक्षा कठीण यातना होत्या. तीला शिक्षण घेणे पाप मानले जाई. चूल व मूल पर्यंत तीची सीमा होती..अशा काळात माय सावित्रीचा जन्म झाला. तो दिवस होता 3 जानेवारी 1831. वडील खंडुजी नेवसे पाटील श्रीमंत माळी होते. ते सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावचे रहवाशी त्यांना 4 अपत्य सिदूजी, सखाराम, श्रीपती व सावित्रीबाई होत्या..सावित्रीबाईच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते.सावित्री अगदी विनयशील, विवेकी, शांत पण धाडसी होती..सागरगोट्या, विटीदांडू, लपंडाव हे खेळ खेळायच्या..
सावित्रीबाई निरागस, तर्कनिष्ठ, निस्वार्थी होत्या. आपल्या मैत्रीणींना घरातील पकवान्न आणून प्रेमाने जेऊ घालत..त्या काळी लग्न लवकर केली जात त्यामुळे सावित्रीबाईचा विवाह जमीनदार, श्रीमंत गोविंदराव फुले यांच्या जोतिराव फुले ह्या मुलाशी झाला.. त्यावेळी सावित्रीबाई 9 तर जोतिराव 13 वर्षाचे होते..जोतिराव हे हुशार विद्यार्थी, व्यासंगी, अभ्यासू, विवेकी, वैज्ञानिक दृष्टीकोण, समता, न्याय, बंधुता ह्या वैश्विक मूल्य मानणारे होते. त्यावेळी त्यांनीं विषमतेचे महाराष्ट्रात वाढलेले स्तोम ओळखले होते.. लग्नात झालेला अपमान त्यांना सहन झाला नाही.. आपण मानव असून सुद्धा आपल्याला हीन वागणूक का मिळाली.. मानवाने मानवाचा द्वेष का करावा ह्या विचाराने ते पेटून उठले..
सोबत एकनिष्ठ, धाडसी, कर्तव्यनिष्ठ, त्यागी पत्नी सावित्रीची जोड मिळाली आणि बहुजनांच्या खांद्यावर असलेली गुलामीची झुल फेकून देण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली.
सावित्रीत्रीबाईंना तात्यासाहेबांचे कार्य काय आहे याची ओळख झाली होती.. तीने ही स्वतःला ह्या ज्ञान यज्ञात झोकून दिले.. शेतात काळ्यामातीवर रेघोट्या मारून अ, आ, ई काढून शिकू लागल्या.. सामान्य शाळेत शिकऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.. पुढील शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी मित्र सखाराम परांजपे, केशव भवाळकर ह्या ब्राह्मण मित्रांकडे दिली.. त्यानंतर अहमदनगरच्या अमेरिकन मिशनरीच्या फरारे सिंथिया यांच्याकडे शिक्षकी पेशासाठी लागणारी पदवी घेऊन सावित्रीबाई शिक्षिका झाल्या.. आपल्या ध्येयाने झपाटलेल्या कुटुंबाने बहुजनांसाठी शिक्षणाचे बंदिस्त दार उघडले..पुण्यात भिडेवाड्यात 1 जानेवारी 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा काढली.. साऱ्या पुण्यात कर्मठ विचाराचा उदोउदो असतांना, पुरोहितांचा, सनातन्यांचा विरोध असतांना शाळा उघडणे कठीण काम होते.. ह्या शाळेत सावित्रीबाई शिकवू लागली.. मनुवाद्यांनी माईच्या अंगावर शेंणगोटे फेकले, नावे पाडली, वाट अडवीली, अपप्रचार केला. परंतु माय माऊलीने काम थांबविले नाही.. आपल्या धन्याने हाकललेला रथ जोमाने चालू ठेवला..6 मुलीवर सुरु झालेली शाळा 45 मुलीपर्यंत पोहचली..असंख्य यातनातून मार्ग काढत सावित्रीबाईनीं पतीच्या सहकार्याने, साथ देत पुणे व परिसरात 18 शाळा काढल्या.. खऱ्या अर्थाने बहुजनांच्या प्रबोधनाची ही सुरुवात होती.. एकीकडे बहुजन शिकू लागले परंतु समाजात माजलेल्या हिन प्रथा त्रास देत होत्या.. त्यासाठी समाजसुधारणा करण्याचे काम चालू ठेवले.. सावित्रीबाईंनी महिलांवर लादलेल्या रूढी याबाबत जागृती सुरु केली.. समाजात नवस करून पोरे होतात हा भ्रम होता.. त्यावर संत तुकारामानी लिहलेल्या अभंगाचा दाखला देऊन, नवसाठिकाणी जागृती करून वैज्ञानिक दृष्टीकोण रुजवीला.. सतीप्रथा हा अवैज्ञानिक प्रकार ह्या बाबत अधिक लक्ष देऊन, शासनाला खरी स्थिती दाखवून बंद केला.. ज्या ब्राम्हण महिला सती गेल्या नाही त्यांना केशवपण करावे लागे.. त्यासाठी न्हावी लोकांचा संप घडवून आणला.. प्रत्येक ठिकाणी पुरोहितशाही होती विधवा झालेल्या स्त्रियांवर हेच नराधम अन्याय करायचे..त्या स्त्रिया अब्रू जाऊ नये म्हणून जीव द्यायच्या.. कुमारी मुलींवर अत्याचार करून त्यांच्या बालकास मारले जाई.. अशा भ्रूणास सांभाळण्यासाठी अनाथालय सुरु केले..अशा विधवा व कुमारी यांच्या साठी बालहत्या प्रतिबंधगृह 28 जानेवारी 1853साली उस्मान शेख यांच्या घरी सुरु केले. आमचे काम हे सर्वांसाठी आहे त्यात सवर्ण व बहुजन असा भेदभाव नाही कारण आम्ही सर्वांना एका निर्मिकाची लेकरे मानतो.. समाजात जरठ विवाह नावाने लहान मुलीशी बालविवाह व्हायचा त्यात कमी वयाच्या मुलीसोबत जरठ व्यक्ती विवाह करायचा त्यामुळे मुलींना लवकर वैधक्य यायचे.. अशा प्रथेला विरोध केला व बंद केली. पुरोहित लग्न सोहळा व धार्मिक विधी याबाबत समाजाला लुटायचे.. याविरुद्ध सत्यशोधक समाजाची स्थापना करून पुरोहिताला पर्याय उभा केला.. फुकटात बहुजनांची लग्ने होऊ लागली .. आधी केले मग सांगितले.. एका ब्राम्हण विधवेला गरोदर असतांना सांभाळून तिच्या पुत्राला स्वतः दत्तक घेऊन सावित्रीबाईने अनाथ स्त्रीला पोटच्या पोरीप्रमाणे संभाळले. पुत्राचे नाव यशवंत ठेऊन त्याचे लग्न सत्यशोधक पद्धतीने लावले.. त्यावेळी अनेक तथाकथित समाजसुधारक होते पण ते स्वतःच्या समाजातील रूढी परंपरा रोखू शकले नाही. सावित्रीजोतीने ते कृतीकरून करून दाखविले…क्रांतिज्योती सावित्राबाई व जोतिरावांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव मेजर कँडी यांनी पुण्यात 12/2/1853 ला विश्रामबागेत करून त्यांचे नाव संपूर्ण जगात नेले.. सावित्रीबाई यांनी स्वतःसोबत फातिमा शेख ह्या मैत्रींणी ला भारताची दुसरी शिक्षिका बनविले.. रानबा महार, धुराजी चांभार हे सुद्धा शाळेचे शिक्षक बनले..1875 ते 1877 मध्ये भीषण दुष्काळ पडला त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी 52ठिकाणी अन्नछत्र उघडून 1000 बालकांना जीवनदान दिले.. सावित्रीबाईंनी स्वतः दळण दळून अन्नछत्र चालविले.. घरचे धान्य गरिबांना वाटप करून स्वतःची विहीर वंचितासाठी खुली केली.. हंटर कमिशन समोर बहिस्कृत लोकांना शिक्षण दयावे ही अट घातली.. त्यावेळी मनुवादी, सनातनी वरच्या वर्गाला शिक्षण देण्याचे सुचवीत होते त्यांनी वरच्या वर्गातून शिक्षण झिरपण्याचा सिद्धांत मांडला होता.. महात्मा फुले व सावित्रीने 6 व्या इयत्तापासून व्यवसायिक शिक्षण देण्याचे सुचविले होते.. सावित्री जोतिरावांच्या शाळेत उत्तम शिक्षण होते..त्याचे उदाहरण म्हणजे मुक्ता साळवे यांनी लिहलेला निबंध त्यात ती आमचा धर्म कोणता? असा सवाल उपस्थित करते.. तीचा सत्कार करतांना इंग्रज अधिकारी तीला खेळणे व गिफ्ट देतो त्यावेळी ती इंग्रजी मध्ये सांगते I want library.. सावित्रीबाईंनी ज्यावेळी अहमदनगर येथे पूर आला त्यावेळी 325 रु देणगी दिली त्यावरून त्यांचे जीवन हे परोपकारासाठी, दीन दुबळ्या, वंचित, गुलामगिरीत अडकलेल्या बहुजनांसाठी होते हे दिसून येते..तात्यासाहेब जोतिराव फुले यांच्या मृत्यू समयी फुलेंचे नातेवाईक महादजी व बालाजी यांनी यशवंत ह्यास दत्तक पुत्र म्हणून टिटवे उचलण्यास विरोध केला..तेव्हा सावित्रामाईने स्वतः टिटवे उचलले.. कर्मकांडाप्रमाणे विधी न करता तात्यांना अखेरचा निरोप दिला..तात्यासाहेब गेल्यानंतर 1890 ते 1897 ह्या कालावधीत माईने खूप सामाजिक व शैक्षणिक काम केले.. सार जीवन ह्या पतिपत्नीने भारतासाठी खर्च केले.. सावित्रीबाईने कवियत्री म्हणून “काव्यफुले ” व “बावणकशी सुबोध रत्नाकर ” त्यात अंधश्रद्धांवर प्रहार व जोतिरावांच्या कार्याचा उल्लेख आहे.. अशा ह्या थोर विभूतीने सकलांना विद्यारुपी अस्त्र देऊन सशक्त केले आहे… अशी ही माऊली पुण्यात आलेल्या प्लेग च्या साथीत ससाणे ह्यांच्या माळावर दवाखाना सुरु करावयास लावते. अखेर दलित मुलाला खांद्यावर घेऊन जात असतांना प्लेगग्रस्त होऊन मरण पावते..कसे फेडावे पांग तुझे माते जिथे शब्द पडती ठिथे.. आज आम्ही थोर माऊलीच्या देशात अंधश्रद्धा पाळून सत्यशोधक विचार टाळत आहोत.. जेव्हा सत्यशोधक विचार मनात रुजवू तेव्हाच ठरेल सावित्रीमातेस आदरांजली…

सत्यशोधक
सोपान भवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *