शासनाने आऊट सोंर्सिंगने पवित्र शिक्षक पद भरु नये – ज्ञानदेव हांडे
मुंबई |प्रतिनिधी : समाज व राष्ट्र घडविणार्या शिक्षकांची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याचा शासन निर्णय उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाने काल निर्गमित केला. या शासन निर्णयात प्रशासनावरील खर्च कमी करण्यासाठी ७४ प्रकारची विविध पदे कत्रांटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शिक्षक पदाचाही समावेश केल्याने शिक्षण क्षेत्रातही नाराजीचा सूर उमटला आहे. निरंतर चालणार्या शिक्षण प्रक्रियेत कंत्राटी शिक्षक भरल्यास गुणवत्तेसह इतर प्रश्न निर्माण होतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारशींना हारताळ फासण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. त्यामुळे कंत्राटी पध्दतीने भरती न करता शिक्षक भरती नियमित व कायमस्वरुपी पध्दतीने करावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी शासनाकडे केली आहे.
