• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सत्यशोधक विचार व सामाजिक न्याय प्रत्यक्ष कृतीत आणणारा राजा छत्रपती शाहू!

Jun 25, 2023

Loading

सत्यशोधक विचार व सामाजिक न्याय प्रत्यक्ष कृतीत आणणारा राजा छत्रपती शाहू!

भारतात अनेक राजे, सम्राट, बादशहा झालेत. काही मोजक्या राजांनी हया भूमीला वैचारिक आभुषणांनी मढविले. अशा नररत्नामध्ये कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराज हे नाव अग्रक्रमाने घेता येईल. बऱ्याच राजांनी स्वतःचे नियम लादून स्वैराचार करून राज्य केले. परंतु राजा छत्रपतीला राजे शहाजी व जिजाऊच्या छाव्याची छत्रछाया असल्याने जनतेचा एक सेवक म्हणून त्यांनी राज्य केले. बहुजनांचा हा कैवारी राजा मानवतेचा उद्धारकर्ता ठरला. तथागत बुद्धांच्या 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हया वचनाप्रमाणे प्रजेला केवळ न्याय नाही तर सामाजिक न्याय ही दिला. जहागिरदार जयसिंगराव घाटगे पाटील व राधाबाई यांच्या पोटी समतेची पेरणी करणारे यशवंत म्हणजे शाहू महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी ४ यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आनंदीबाईंनी यशवंतची चुणूक पाहून दत्तक म्हणून घेतले. यशवंतचे शाहू महाराज हे नामनिधान पडले.बालपणापासून धीट, धाडसी, पट्टीचे मल्ल असलेले शाहू आरोग्याची सर्वोतोपरी काळजी घ्यायचे.

सत्यशोधक चळवळीचा प्रभाव
शाहू महाराज यांच्या काळात महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव होता. सोलापूर, कोल्हापूर ,सांगली, सातारा या भागात सत्यशोधक विचाराचे बीज रुजले होते. शाहुनी सुरुवातीला आर्य समाजाच्या कार्याचे अवलोकन केले परंतु समाज सुधारणेसाठी ते भूमिका घेत नसल्याने समाजाला समतेच्या वाटेने नेणाऱ्या सत्यशोधक चळवळीचा मार्ग स्वीकारला.समाजात शिक्षण नाही म्हणून बहुजन नाडला जातो हे त्यांच्या लक्षात आले महात्मा फुले यांच्या पुरोगामी विचाराने समाज पुरोहित मुक्त करता येईल म्हणून सत्यशोधक समाज पुन्हा वाढीस लावला.

महात्मा फुलेंच्या पाऊलावर शाहूंचे मार्गक्रमण

महात्मा फुले जर झाले नसते तर कदाचित बहुजनांना शिक्षणाचे स्वप्न पाहता आले नसते.महात्मा फुलेंनी पेटविलेली ठिणगी जाज्वल करण्याचे काम शाहू महाराजांनी केले. ब्राह्मण, पुरोहित,भट यांनी बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून लांब ठेवण्याच्या मनसुब्याला शाहुंनी सुरूंग लावला.बहुजनांच्या अज्ञानाच्या बेड्या तोडून फेकण्यासाठी प्राथमिक शिक्षण कोल्हापूर संस्थानात सुरू करून बहुजनांचे स्वप्न साकार केले. सुवर्ण व अस्पृश्य यांच्या वेगळ्या शाळा एकत्र केल्या. बहुजन व सवर्ण यांच्यासाठी एकत्र शाळा सुरू केल्या.

बहुजनाच्या उच्च शिक्षणासाठी शहरात वस्तीगृह निर्मिती प्राथमिक शिक्षणाची सोय केल्यावर पुढील उच्च शिक्षणासाठी बहुजनांकडे शहरात राहण्याच्या सोयी नव्हत्या.मराठा, कुणबी, तेली,महार,मांग,सुतार, चांभार सह सर्व बहुजनांच्या मुलांसाठी २७ वस्तीगृहाची निर्मिती केली. बहुजन वर्ग उच्च शिक्षण घेऊ लागला. ज्ञानाच्या सुंदर कक्षेत बहुजन स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ लागली शिक्षण हेच अज्ञान घालविण्याचे साधन आहे हे बहुजनांना पटू लागले. बहुजनांची असंख्य मुले शिकून नोकरी मिळू लागले.नोकरीत पुन्हा सवर्णांची मक्तेदारी होती. त्यावर पर्याय शोधण्याचा विचार छत्रपती शाहूंनी केला.

नोकरीत सामाजिक न्याय म्हणून आरक्षण बहुजनांची मुले शिकू लागली उच्चशिक्षित झाली परंतु त्यांना मनुवादी यंत्रणा नोकरी देइनात. सर्वांना समान न्याय पाहिजे. गरीब ,श्रीमंत ,उच्च नीच यात भेद नसावा यासाठी नोकरीत ५०% मागासवर्गीयांना आरक्षण दिले त्यामुळे बहुजनातील मुले नोकरी करू लागले. केवळ वंचितांना नोकरी करण्याचा न्याय देऊन चालत नाही तर सामाजिक न्याय असल्याशिवाय ते स्वाभिमानाने जगू शकणार नाही.मुजोर घोडा ज्याप्रमाणे कमकुवत घोड्याचे धान खाऊन जातो त्या प्रकारची परिस्थिती होऊ नये म्हणून त्यांनी बहुजनांना ५०% आरक्षण दिले तर ५०% वर उच्चवर्णीयांना व सुवर्णांना पूर्णत: संधी दिली.

शाहुंनी शेतीसाठी तलाठी पदाची केली सुरुवात… इंग्रजांच्या काळात शेतीच्या कर वसुलीसाठी कुलकर्णी पदाची नेमणूक केलेली होती. कुलकर्णी जाचक अटी लादून कर वसूल करीत. शासनाच्या नियमापेक्षा अतिरिक्त कर वसूल करीत. त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोणतीच सवलत नसे. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात बहुजनातील कुणबी म्हणजे शेतकऱ्याचा मुलांची तलाठी म्हणून नेमणूक केली. त्यात सर्व जातीतील शेतीचे ज्ञान असलेल्या मुलांना तलाठी होता आले.आज तलाठी हे पद अस्तित्वात आहे ही शाहुंची समाजाला दिलेली देणगी आहे.

मातीशी नाळ जुळवून ठेवणारा राजा
भारतात प्रमुख उद्योग शेती हाच आहे. त्यामुळे शेतीच्या अप्रतिम सुपीकतेसाठी शाहुंनी शेतीसाठी असंख्य बांध,कालवे ,बंधारे शेततळे, तलाव दूरदृष्टीकोणातून निर्मिती करून हरित शेतीचा अभिनव प्रयोग केला. नवीन नवीन पिके घेण्याचा सल्ला देऊन बटाटा, कंबोडिया कापूस ,ताग, रबर, ऊस याची लागवड वाढविली. प्रत्येक शेतकऱ्याकडे जमीन असावी त्यासाठी शेतकऱ्याला १० एकर शेती ठेवण्याचा कायदा केला.महार वतन बंद केली. बारा बलुतेदाराला नवीन शिकण्याची उमेद फुलविली.पारंपारिक उद्योगापेक्षा तंत्रज्ञानावर आधारित कौशल्यधिष्टीत उद्योग दिले. शेतीसोबत पशुपालन हा उद्योगधंदा दिला. कोल्हापुरात आजही पशुपालन केले जाते. उत्तम प्रतीचे दुध कोल्हापुरात मिळते हा शाहुंच्या दूरदृष्टीचा ध्यास आहे.

छत्रपतीची रहाणी राजासारखी मात्र हृदय माणुसकीचे होते.
इतिहासातील राजाचे अवलोकन केले असता बरेच राजे ऐष आराम,नृत्यांगना,व्याभिचार, अन्यायी, लहरी असल्याचे दिसून येते परंतु छत्रपती शाहू महाराज हे जनतेची सेवा करणारे जनसेवक होते. आपल्या राज्यात कुणावरही अन्याय होता कामा नये हे कटाक्षाने पाळीत. मागास जातीत स्वतः जाऊन त्यांच्या घरची चटणी भाकरी खाणारा हा राजा जनतेच्या हृदयात विराजमान झालेला राजा होता. आपल्या राज्यात समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता संविधान तयार होण्यापूर्वीच अस्तित्वात आणणारा लोकहितवादी राजा होता. गंगाराम कांबळे नामक शिपायाला खानावळ टाकून देऊन स्वतः त्याच्या खाणावळीत भजी व चहा घेऊन सामाजिक न्याय देणारे शाहू समतेचे राजे होते.

आजन्म विद्यार्जन करणारा राजा शिक्षण हे मरेपर्यंत घेता येते त्याप्रमाणे आपल्या सर स्टुअर्ट मेडफोर्ड फ्रेशर हया इंग्रज अधिकारी व शाहूंनी गुरु मानलेल्या व्यक्तीचे सदैव मार्गदर्शन घेतले. प्रत्यक्ष समाजातील गोष्टींचा अभ्यास करून जनतेला योग्य पर्याय देणारा राजा शाहू महाराज होत. संस्कृत विषयाच्या अभ्यास ठेवून भेदभाव करणाऱ्या पुरोहिता विरुद्ध बंद पुकारून बहुजनाच्या विधीसाठी शिवाजी संस्कृत स्कूल काढून त्यातून बहुजनातील पुजारी तयार केले‌.वेदोक्त प्रकरणातून पुरोहिताची लबाडी उघड करणा-या राजाने सत्यशोधक समाज उभा करून समाजाला चिकित्सपणे जगण्याचा हक्क दिला. कधीही जातीचा गर्व न करता सर्वांना घेऊन प्रत्येकात सामील झाला.अशा राजाला शत:श प्रणाम.

साहित्यिक
एस. एच. भवरे
9284695140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *