संविधान जागृतीसाठी लोकचळवळ उभारण्याची गरज – मुकुंद सपकाळे

– २५ व २६ जानेवारी २०२४ ला जळगावात दोन दिवसीय संविधान परिषद होणार
संविधान जागर समितीच्या बैठकीत निर्णय
जळगाव : समस्त भारतीयांना लोकशाहीचा राजा बनविणाऱ्या भारतीय संविधानाची माहिती घराघरात पोहचविण्यासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज आहे असे विचार महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी व्यक्त केले.ते संविधान जागर समितीच्या बैठकीत बोलत होते.
रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिनी काढण्यात येणाऱ्या संविधान रॅलीच्या नियोजनाची बैठक पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली.
संविधानाने दिलेले मूलभूत हक्क,मूलभूत कर्तव्य व मार्गदर्शक तत्वे याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी भव्य संविधान रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंत काढण्यात येणार आहे. दिनांक २५ व २६ जानेवारी २०२४ रोजी दोन दिवसीय संविधान संमेलन जळगाव येथे घेण्यात येणार असून संविधान जागर मोहिमेंतर्गत महाविद्यालयीन स्तरावर निबंध,वादविवाद व वकृत्व स्पर्धा होणार आहेत. तसेच संविधान रथयात्रा काढून पथनाट्य सादर करून शहरात व ग्रामीण भागात संविधानाने दिलेल्या हक्क व अधिकार संदर्भात जनजागृती केली जाणार आहे. संविधान सभेतील महिलांचे योगदान याविषयावर चर्चा सत्र देखील घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
प्रास्ताविक हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले.
यावेळी झालेल्या चर्चेत भारत ससाणे,जयसिंग वाघ,दिलीप अहिरे,दिलीप सपकाळे,विजय सुरवाडे,अनिल सुरडकर,समाधान सोनवणे,सतीश गायकवाड यांनी आपले विचार मांडले.
बैठकीत राजू मोरे, रमेश सोनवणे,चंदन बिऱ्हाडे,भारत सोनवणे,मनोहर लोखंडे,किरण सोनवणे,जगदीश सपकाळे,वसंत मोरे,भाऊराव इंगळे,दिलीप त्र्यंबक सपकाळे,महेश गायकवाड आदी उपस्थित होते.