
बहिणाबाईंची कविता जगण्याची ओळख करून देते.
भावना चौधरी
असोदा – दैनंदिन जीवनात समाजात जगताना माणसांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी खऱ्या अर्थाने बहिणाबाईंची कविता असून ती प्रत्येकाला आपल्या जगण्याची ओळख करून देत असल्याचे मत भावना चौधरी यांनी सार्वजनिक विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांसाठी स्वरचित कविता व बहिणाबाईंच्या कविता कवी संमेलन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले. विचार मंचावर मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल. जे. पाटील, सांस्कृतिक प्रमुख के.बी. तायडे सचिन जंगले, पी.जे.बऱ्हाटे, डी.जी. महाजन मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः रचलेल्या कविता सादर केल्या. हर्षाली पाटील या विद्यार्थिनीने, मित्र म्हणून शिकवतो आणि कुंभार म्हणून घडवतो तोच खरा शिक्षक असतो”अशी शिक्षकांविषयीची कविता, नूतन वाणी हिने हे “आधुनिक जग आजही बदललेले नाही,चालूया लढाया, मशीनी वाढाया चक्र या जगाच तुटतंय, प्रदूषण कसं घडतंय” ही कविता, कार्तिक नारखेडे या विद्यार्थ्याने “चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गाणं, बहिणाई महान आमची बहिणाई महान” अशी बहिणाबाईंवर आधारित कविता, कोमल नारखेडे या विद्यार्थिनीने “मैत्री कशी असावी मैत्री असावी समजून घेणारी जसे कृष्णा आणि सुदामा सारखी श्रीमंत असूनही गर्व न करणारी गरिबी व श्रीमंताला न पाहणारी”अशी मैत्री वर आधारित कविता, यज्ञिका पाटील या विद्यार्थिनीने “वाचा पुस्तक पुन्हा पुन्हा माझं पुस्तक रंगबिरंगी सांगतात गोष्ट सप्तरंगी सांगतात गोष्टी नवी जुनी जसे बोलता चिमणा चिमणी” अशी पुस्तकावर आधारित कविता, मोहिनी पाटील या विद्यार्थिनीने घरातले “एटीएम कार्ड असतात वडील स्वतःचं दुखणं बाजूला ठेवून आपल्या मुलांसाठी कष्ट करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे वडील स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणाऱ्या सूर्यासारखे असतात वडील” अशी वडीलांवर आधारित कविता.याप्रकारे विद्यार्थ्यांनी खूप सुंदर अर्थपूर्ण अशा स्वरचित कविता सादर केल्या.तसेच शाळेतील उपशिक्षक पी.जे.बऱ्हाटे यांनीही बहिणाबाईंच्या भावविश्वाविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.उपशिक्षक एस.एस.जंगले यांनी बहिणाबाईंवर आधारित स्वरचित कविता सादर करत आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल यांनी मी बहिणाबाईंच्या गावात काम करत असल्याचा सार्थ अभिमान आहे असे मत व्यक्त करत बहिणाबाईंच्या जीवन कार्याविषयीचा थोडक्यात उलगडा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती पाटील तर आभार के.बी.तायडे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थी विद्यार्थिनी सादर केलेल्या स्वरचित कवितांना व बहिणाबाईंच्या गेय कवितांना उपस्थितांनी दाद दिली. याप्रसंगी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्वतःच्या हातांनी मातीच्या सहाय्याने बनवलेल्या बहिणाबाईंच्या कवितेतील वस्तू व त्यांनी वापरलेली भांडी यांचे प्रदर्शन भरविण्यात आले त्यांना मीनाक्षी कोल्हे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी यांची प्रतिकृती हेमांगी चौधरी ह्या विद्यार्थिनीने साकारली. स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान संदर्भात प्रतिज्ञा घेण्यात आली.