विद्रोही मराठी साहित्य संमेलन प्रचंड यशस्वी करण्याचा एरंडोलकरांचा निर्धार!


१८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे तीन व चार फेब्रुवारी रोजी संपन्न होत असून सदर संमेलनाची एरंडोल तालुका नियोजन सभा दिनांक 20 डिसेंबर रोजी हॉटेल कृष्णा, सभागृह एरंडोल येथे संपन्न झाली. संयोजन समितीचे पदाधिकारी प्राध्यापक अशोक पवार, नगरसेवक शामदादा पाटील, प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, गौतम दादा मोरे, रणजीत शिंदे, बापूराव ठाकरे, सोपान भवरे, अजय भामरे व विद्रोही साहित्य संमेलन मीडिया प्रमुख अजिंक्य चिखलोदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेचे प्रास्ताविक सभेचे निमंत्रक तथा समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब भरत शिरसाठ यांनी केले. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आपणास सामाजिक समता साध्य करायची आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे काम आपण करत आहात. विषमतावादी व्यवस्था संपवून समतावादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी हा विद्रोह आहे, असे आपल्या प्रास्ताविकात त्यांनी नमूद केले.
विद्रोही साहित्य संमेलनाची आवश्यकता मांडताना प्रा.डॉ. लिलाधर पाटील यांनी सांगितले की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहास हा प्रस्थापितांना मोठे करणारा असून उपेक्षितांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारा आहे. पारंपारिक मराठी साहित्य संमेलन हे उपेक्षितांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी या मराठी साहित्य संमेलनाला प्रस्थापितांचे साहित्य संमेलन संबोधून उपेक्षितांनी आपल्या साहित्य संमेलनाची दिशा निश्चित करावी अशी अपेक्षाच व्यक्त केली होती. आज पर्यंत प्रस्थापित साहित्य संमेलन परंपरेने आण्णा भाऊ साठे, बाबुराव बागुल यांना डावलले. प्रस्तापित व्यवस्था जेव्हा जेव्हा विस्थापितांना डावलते तेव्हा विद्रोहाची चळवळ उभी राहते. त्यातूनच विद्रोही साहित्य संमेलनाची चळवळ महाराष्ट्रात उभी राहिले आहे, असे प्रतिपादन त्यांनी विचार मांडताना केले.
या नंतर विचार मांडताना रणजित शिंदे यांनी सांगितले की संमेलनाच्या नियोजनात युवक, युवतींनी सहभागी व्हावे. समाज प्रबोधनासाठी कार्यकर्त्यांनी वेळ द्यावा. आपण तालुक्यात समन्वय समिती स्थापन करावी. संमेलनाचा प्रचार, प्रसार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आपल्या मनोगतामध्ये माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिराडे साहेब यांनी विद्रोही साहित्य संमेलनात परिवर्तन चळवळीच्या साहित्यिकांनी व विचारवंतांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर या साहित्य संमेलनासाठी समाजाने सढळ हाताने आर्थिक योगदान द्यावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. आण्णासाहेब डि.एम.मोतीराय, डॉ. संदीप कोतकर सर, प्राध्यापक विजय गाढे यांनी आपले विचार मांडून संमेलनाला यशस्वी करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रा.अशोक पवार सर यांनी विचार मांडतांना विद्रोही संमेलन हे दोन दिवसाचा कार्यक्रम न समजता या चळवळीतून आपल्याला पुरोगामी चळवळीतील पक्के कार्यकर्ते निर्माण करता येतील, हे साहित्य संमेलनाचे उदिष्ट असले पाहिजे. या विद्रोही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न आमचा असेल. या संमेलनाला ऐतिहासिक करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासनाकडून प्रचंड प्रमाणात पैसा मिळालेला आहे. परंतु विद्रोही साहित्य संमेलनाचा पोशिंदा सामान्य बहुजन चळवळीचा कार्यकर्ता आहे. एकुण चाळीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून सामान्य व प्रामाणिक लोकांच्या पैशातून हा निधी उभारला जाईल. त्याकरिता चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हा निधी उभारण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब भरत शिरसाठ यांना साहित्य संमेलनाचा मोठा अनुभव असून त्यांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या कोर कमिटीमध्ये योगदान द्यावे, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.
माध्यमिक पतपेढीचे माजी संचालक राजेंद्र शिंदे सर यांची एरंडोल तालुका संयोजन समिती प्रमुखपदी निवड करण्यात आली. सदर समितीमध्ये मनोज नन्नवरे सर, राकेश पाटील सर, विनोद सपकाळे सर, प्राध्यापक विजय गाढे, संजय पवार सर, डाॅ. संदीप कोतकर सर, वर्षाताई कोतकर, वर्षाताई शिरसाठ, प्रकाश तामस्वरे सर, चिंतामण जाधव सर, महेश पाटील सर, अरुण पाटील सर, शामकुमार जाधव सर, भैय्यासाहेब सोनवणे सर, प्रवीण केदार सर इत्यादींचा समावेश आहे. सुत्रसंचालन व आभार प्रा. नरेंद्र गायकवाड सर यांनी मानले. कार्यक्रमास ग.स. सोसायटीचे संचालक भाईदास पाटील, प्रा. ज्योती मोरे, सुधाकर मोरे सर. कैलास पवार सर, आर. बी. सोनोने सर, संजय बागडे सर, शिवदास महाजन, कविराज पाटील, हिम्मत महाजन, सुरज महाजन, कैलास महाजन, हिलाल फुलारे, राजेंद्र माळी, शंकर शिरसाठ, अनिल पाटील, अश्विनी तायडे मॅडम, निशू तामस्वरे, डॉक्टर शुभम जाधव, शुभम तामस्वरे, रमा ब्राह्मणे, मनीषा जाधव, प्रमिला तामस्वरे, आरती गाढे इत्यादी मोठ्या प्रमाणात एरंडोल शहरातील नागरिक उपस्थित होते.