
लोकसभा निवडणूकांपाठोपाठ मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही भाजप आणि शिंदे गटात चूरस
आगामी लोकसभा निवडणुकांमधील जागांवरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये उघडपणे भांडण होत असताना आता मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील जागेवरूनही मतभेद होऊ लागले आहेत. भारतीय जनता पक्षाच्यावतीने तीन तर शिंदे गटाच्यावतीने एका शिक्षकाने निवडणुकीसाठी प्रचारही सुरु केला आहे. या सत्ताधारी पक्षांमध्येच मतभेद असताना शिक्षकांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी राजकीय पक्षाची पार्श्वभूमी नसलेला उमदेवार योग्य ठरतो, असे मत महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी मांडले. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी राजकीय पक्षांचे व्यासपीठ नको, असे सांगत हांडे यांनी ‘शिक्षक भारती’ संघटनेतून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेले नेते जालिंदर सरोदे यांच्यावरही टीका केली.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून भाजपला राज्यातील जवळपास सर्वच जागा हव्या आहेत. भाजपविरोधात शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि भरत गोगावले यांनी जाहीररित्या विरोध दर्शवला आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्या की जून – जुलै महिन्यात मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आतापासूनच शिक्षक संघटनांनी प्रचार सुरु केला आहे. यात भाजप पक्षाच्यावतीने तीन उमेदवारांनी प्रचार सुरु केल्याने शिक्षकवर्गात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. भाजपपक्षाकडून अनिल बोरनारे, राजू बंडगर आणि शिवनाथ दराडे यांनी जाहीररित्या प्रचार सुरु केला आहे. तिन्ही जणांनी पक्षाकडून आपण मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. असाच काहीसा प्रकार शिंदे गटाच्या शिवाजी शेंडगे यांनी केला आहे. त्यामुळे मित्रपक्षात मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठीही एकी नसल्याचा सूर शिक्षकवर्गातून उमटला आहे.
मुळात शिक्षक समूहात राजकारण नको. राजकीय पक्षांची ढवळाढवळ शिक्षक समूहाला मान्य नाही कारण गेली कित्येक वर्षे शिक्षकांच्या मागण्यावर राजकीय पक्षांनी निर्णयात्मक काम केलेले नाही, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी केली. राज्यात शिक्षकांच्या असंख्य मागण्या प्रलंबित आहेत. त्यांची दयनीय अवस्था आहे. शिक्षण हक्क कायदा अंमलात आणताना शिक्षकांच्या शिफारशी विचारल्या गेल्या नाहीत. यातूनच राज्यात शिक्षण क्षेत्रात खासगीकरणाचा पाया रचला गेला, आतापर्यंतच्या इतिहासात एकाही शिक्षणमंत्र्याने शिक्षकांना न्याय दिला नाही, असे सांगत हांडे यांनी निवडणुकीत राजकीय पक्षांच्या समावेशाबद्दल संताप व्यक्त केला.
विनाअनुदानित शाळांचे वेतन अनुदान, शिक्षक भरती, अतिरीक्त शिक्षक, जुनी पेन्शन तसेच शिक्षकांचा आरोग्य विमा याबद्दल राज्य सरकारला खडसावून जाब विचारणारा शिक्षक आमदार आतापर्यंत राज्याला मिळाला नाही. राजकीय पक्षांच्या उमेदवाराला शिक्षकांच्या समस्या मांडायला मर्यादा येतात, पक्षाचे अजेंडे शिक्षकांच्या विरोधात असतात. त्यामुळे मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील राजकीय पक्षांची घूसखोरी नको, असे हांडे यांनी स्पष्ट केले.
ठाकरे गटाकडून मुंबई शिक्षक मतदार संघासाठी माजी शिक्षणाधिकारी अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीचे नेते जालिंदर सरोदे यांनी संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्यांना सोबत घेत शिक्षक सेनेत प्रवेश केला. कपिल पाटील यांच्याकडून निकटवर्तीय यांना झुकते माप देत सुभाष मोरे यांना मुंबई शिक्षक मतदार संघाची उमेदवारी दिल्यामुळे फूट पडली आहे. पक्षांतर करून बंड पुकारलेल्या नेत्यांना भविष्यात ठाकरे गटातही काहीच साध्य होणार नाही, असेही हांडे म्हणाले.