• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

रमा आणि भिमा परिवर्तनाची अबाधित चाके!!

May 27, 2024

Loading

रमा आणि भिमा परिवर्तनाची अबाधित चाके!!

भारताच्या उज्ज्वल परंपरेला खंडित करणारी व्यवस्था म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्था...मानव इथून तेथून सारखाच असतांना काही जमात क्षेष्ठ व बाकी कनिष्ठ हा भेद भारतात निर्माण केला गेला. शिक्षण घेणे, पैसा संग्रह करणे, शस्त्र बाळगणे अशा गोष्टीला बंदी बहुजनांना होती. संस्कृत चुकुन वाचायला म्हणायला लागला तर त्याला कठोर शिक्षा अशा पेशवेशाहीच्या उतरत्या काळात दोन व्यक्ती परिवर्तन गाडीचे चक्र बनले. ते म्हणजे रमा व भिमा ही एकमेकांवर जीव ओतणारी जोडी...एकीकडे ज्ञानाची अथांग उंची गाठलेला सागर तर एकीकडे त्यागाची सरिता असे नाते होते भिमा व रमाचे..कधी न शिकलेल्या रमाला भिमाने कधी कमी लेखले नाही. अक्षर ओळख करुन देऊन भिमाने रमाला ज्ञानाची वाट दाखवली. भिमा व रमाचे अतूट नाते हे रक्तापलीकडचे नाते होते. अशा ह्या रमाचे 27 मे 1935 ला निर्वाण झाले. आयुष्यभर साहेबाला पुढे जाण्यासाठी त्याग करणारी रमा ही अगदी हलाखीच्या कुटूंबातील होती. मेहनत हा उत्तम दागिना तिलाच शोभून दिसला. साहेब जगाचा विचार करतात, मानवतेचा विचार करतात ते समाजाला उन्नत करित आहे यात रमा आनंदी होती. अपार कष्ट त्यात कुटूंबातील मुलांचा ओढवलेला मृत्यू समोर अनुभवत रमा निर्धार करित उभी राहत गेली. साहेबाचे ज्ञानार्जनाच्या कामात रमाने कधी खंड पडू दिला नाही. साहेब तलवार तर ती ढाल बनली. उदरनिर्वाह करतांना कोणत्याही प्रसंगी डगमगली नाही. अगदी सालस, शांत, निगर्वी रमा शेण्या थापत होती. साहेबाची बायको असून शेण्या थापते असे लोक म्हणू लागले तेव्हा साहेबाच्या नावावर कुणी हिणवू नये म्हणून रात्रीपर्यंत शेण्या थापणारी रमा कशाचीही तमा बाळगत नाही. रमावर साहेबाचा फार जीव होता. विदेशात असतांना रमाच्या कष्टाचा विचार साहेबाच्या मनात येताच अश्रू गोठून जात असत. रमा निरक्षर होती तरी तिचे अनुभवविश्व फार समृध्द होते. काम करुन साहेबाकडून भाषा शिकली. भावनेची समृध्द भाषा रमा शिकली होती. साहेबाची बायको म्हणून कुणीही जास्त मिळकतीची कामे मिळाले असते.साहेबांसारखी कुणापुढे लाचार झाली नाही. आपले कष्टाळूपण जपले रमाने अखेरपर्यंत...रमा साऱ्या घराची माय झाली. ..रमा आपल्यासाठी झिजली आयुष्यभर कारण धनी हा स्वतःसाठी झिजत नव्हता त्याला वंचित, गरीब, दीन समाजाची काळजी होती. भिमा केवळ भारताचा नाही जगाचा झाला होता. भिमाच्या नजरेचे भाव फक्त रमा ओळखू शकली. रमा व भिमा एक जिस्म एक जान होते. रमाने लिहलेली सारेच पत्र प्रकाशकाने छापली नाही. कारण हृदयातील निस्सिम भाव सर्वांना वेचता येणार नाही. रमाचे दुःख ओळखणार मन होते भिमराव..रमाची तब्येत खराब असून मला काय होणार म्हणणारी रमा भिमराव ओळखणार नाही तर कोण ओळखणार? बाबासाहेबाच्या साऱ्या गोष्टीचे ज्ञान असलेली समजदार रमा मातृवत्सल होती. साहेब शब्दाने ही दुखावणार नाही एवढी काळजी रमाने घेतली. केवढी ही समज की साहेब घराकडे लक्ष न देता देशाचा, समाजाचा, बहुजनाचा विचार करतात तरी रमा घराला सावरुन धरते. असंख्य खस्ता खाल्या रमाने परंतू भिमाला कळू दिले नाही. रमा जर झिजली नसती तर स्वातंत्र्य भारताची राज्यघटना निर्माण झाली नसती...अवघे जीवन एकटयाने काढून रमा दुखाशी दोन हात करत राहिली. बाळासाहेबांची सावली बनली. शेवटपर्यंत साधे जीवन जगली. होती रमा म्हणून झाला भिमा असे म्हटले तरी वावगे होणार नाही. आज न शिकलेली बाई व उच्च शिक्षित व्यक्ती यांचा संसार होत नाही. परंतू त्याग करणारी रमा व ज्ञानाचा महासागर रमा रुपी सरितेला आयुष्यात सामावून घेतो हे दुर्मीळच उदाहरण होय. रमाच्या बलिदानाला शतश:प्रणाम..

पत्रकार
एस. एच. भवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *