तिलोत्तमा पाटलांना मिळणार निष्ठेचे फळ?`
मा.शरद पवारसाहेब स्विकारणार जबाबदारी?`
महिलेला मिळू शकते अधिक पसंती!
अमळनेर प्रतिनिधी
सद्यस्थितीत राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे जोमाने वाहत आहे, त्यात अमळनेरचे वातावरण तर चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. नुकत्याच अचानक झालेल्या आजी-माजी आमदारांच्या लागोपाठ बैठकांमुळे अमळनेरकर चांगलेच संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे गेली ३ पंचवार्षिक निवडणुकीत अमळनेरकरानी कुठल्याही उमेदवारास फेरनिवडीची संधी दिलेली नाही. त्यामुळे यंदादेखील याची पुनरावृत्ती होणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. आजी माजी आमदारांच्या लढाईत महिला उमेदवार अधिक प्रबळ ठरू शकते.
दरम्यानच्या काळातील “अनिल भाईदास पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ”, हे शरद पवारांचं वक्तव्य, तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची महाराष्ट्रभर सुरू असलेली निष्ठा यात्रा, आणि याच यात्रेच्या दरम्यान अचानक त्यांनी दिलेली तिलोत्तमा पाटील यांच्या घरी दिलेली भेट, सौ. पाटील यांची पक्ष स्थापना ते आजतागायत असलेली त्यांच्या पक्षाशी असलेली एकनिष्ठता आणि नुकताच साहेबराव पाटील यांनी घेतलेला पवित्रा, या सर्व तिलोत्तमा पाटील यांच्या उमेदवारी विषयी जमेच्या बाजू असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंचायत समिती, जिल्हा परिषद, शेतकी संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ते पणन महामंडळ अशा अनेक निवडणुकांचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या आणि गेली ३ दशकाहून अधिक काळ राजकारणात असलेल्या तिलोत्तमा पाटील यांना एक निष्ठावंत महिला चेहरा म्हणून पक्षामार्फत संधी दिली जाऊ शकते, असे काहींचे मत आहे. माजी आमदार डॉ. बी एस पाटील व त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशानंतरची ही पहिलीच विधानसभेची निवडणूक असल्याने त्यांची ताकद व सोबत काँग्रेस आणि शिवसेना हे नावे समीकरण तालुक्यात कुठले बदल घडवून आणू शकते, याचा आज जरी अंदाज घेणे शक्य नसले तरी, लोकसभेच्या वेळी देशाने अनुभवलेले इंडिया आघाडी विषयीचे चित्र उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील दिसले, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सुवर्ण संधी चालून आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
दरम्यान, पक्षामार्फत तिलोत्तमा पाटील यांच्यासोबतच ग्रंथालय सेलचे उमेश पाटील आणि तालुका अध्यक्ष सचिन पाटील हे देखील उमेदवारीसाठी इच्छुकांच्या यादीत असून, या सर्वांना पुढील आठवड्यात मुंबई येथे पक्षश्रेष्ठींसोबत चर्चेसाठी बोलावले असल्याचे समजते. तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेरमध्ये नव्या युगाची सुरुवात होऊ शकते. त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेम करणारा व पाठीशी असणारा सर्व समाज घटकातील महिलांचा समूदाय अमळनेर मतदारसंघात बदल घडू शकतो, असे काही तज्ञ मानतात. शरद पवार यांचा पाठिंबा आणि त्यांच्या विरोधकांविरोधातील रणनीतीमुळे तिलोत्तमा पाटील या निवडणुकीत यशस्वी होऊ शकतात, अशी चर्चा आहे.
तिलोत्तमा पाटील यांच्या एकूण जीवनातील संघर्ष, त्यांची प्रामाणिकता आणि लोकांच्याप्रति सेवा करण्याची इच्छा, या सर्व बाबींनी त्यांना एक सशक्त नेत्याच्या रूपात घडवले आहे, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. आज, जर शरद पवार यांनी त्यांना उमेदवार म्हणून घोषित केले, तर अमळनेर मतदारसंघाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.
तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेरमध्ये एक नवी पहाट उगवेल, अशी आशा काही मतदार व्यक्त करतात. त्यांच्या उमेदवारीला मिळणारा पाठिंबा आणि शरद पवार यांचा विश्वास, या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो, असे बोलले जात आहे. तिलोत्तमा पाटील यांचे जीवन, त्यांची निष्ठा आणि सेवाभाव अमळनेरच्या मतदारांना एक नवा विश्वास देईल, आणि त्यांचे नेतृत्व अमळनेरला एक नवी दिशा दाखवेल, असे अनेकांचे मत आहे.