शतकोत्तरी प.रा.विद्यालयात वैचारिक प्रबोधन !..
अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातील अनमोल रत्न – पी डी पाटील ( प्रमुख वक्ते )
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – शहरातील शतकोत्तरी प.रा.विद्यालय येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व बाळ गंगाधर टिळक स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.एम.सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही एच चौधरी होते. प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे आदर्श शिक्षक पी डी पाटील होते. विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शाळेच्या वतीने प्रमुख वक्ते पी डी पाटील यांच्या पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील वर्ग ५ वी , ६ वी ७ वी च्या मुला – मुलींनी दोन्ही महापुरुषांच्या संदर्भात माहिती सांगितली.
प्रमुख वक्ते पी डी पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडून त्यांचा संघर्ष अण्णांनी या देशाला दिलेले अनमोल साहित्य यासंदर्भात विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती सांगितली. कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या व्यथा आपल्या साहित्यात मांडणारे उत्कृष्ट कादंबरीकार, नाटककार, विचारवंत, लेखक, पत्रकार, लोकनाट्याचे जनक, आद्य शिवशाहीर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातले अनमोल रत्न आहेत असे प्रतिपादन पाटील यांनी केले. प्रा.अशोक पवार युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर यांच्या माध्यमातून राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत महापुरुषांच्या विचारांचा जागर धरणगाव तालुक्यातील ५० शाळांमध्ये संपन्न होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही एच चौधरी यांनी महापुरुषांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांवर चालले पाहिजे हीच खरी महापुरुषांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन केले. याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एस डी मोरे, आर.जी.खैरे, एस.पी.तावडे, आर.एल.पाटील, नीरज शिंदे तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही.एम.सोनवणे तर आभार राजेश ठाकरे यांनी मानले.