इंडियन मॅथेमॅटिक्स अँड सायन्स टीचर्स असोसिएशन फॉर रिसर्चची स्थापना
शिक्षकांना इस्रो, आयआयटी ,आयशरशी जोडणार
शिक्षकांना नोंदणीचे आवाहन
जळगांव प्रतिनिधी – राज्यातील तसेच इतर राज्यातील गणित आणि विज्ञान विषय शिकविणाऱ्या सर्व खाजगी आणि शासकीय शिक्षकां साठी आनंदाची बातमी आहे . राज्यातील गणित विज्ञान शिक्षकांना एका छताखाली आणून एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान विषयक क्रांतीपर्वात शिक्षकांना सामावून घेण्यासाठी विज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारी अग्रगण्य संस्था नोबेल फाउंडेशन तर्फे इंडियन मॅथेमॅटिक्स अँड सायन्स टीचर असोसिएशन फॉर रिसर्च या संस्थेची उभारणी केली जात आहे.
या अंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गणित व विज्ञान अध्यापनाच्या पद्धतीची सुसूत्रता आणणे तसेच परकीय विद्यापीठे आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था, आयआयटी, आयशर तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यासारख्या उत्तम संस्थांमध्ये शिक्षकांचे प्रशिक्षण घडविणे ,गणित व विज्ञान शिक्षकांना इसरो येथे अभ्यास सहलीसाठी नेणे ,यासह विज्ञान आणि गणिताच्या प्रसारासाठी राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनाचे आयोजन करणे, राज्यातील प्रयोगशाळा अदयायावत करण्यासाठी शाळा तसेच शिक्षकांना आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देणे या उद्दिष्टांसह संस्थेचे कार्य पार पडणार आहे.
संस्थेचे सदस्यत्व नोंदणी 28 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होत असून प्राथमिक स्तरापासून तर विद्यापीठ स्तरापर्यंत शिक्षक या अंतर्गत नोंदणी करू शकतात. तसेच खाजगी शाळांमधील तसेच कोचिंग क्लासेस मधील गणित विज्ञान, शिक्षक ही संस्थेचे सदस्यत्व घेऊ शकता. सदर सदस्यत्व विनामूल्य असून www.nobelfoundatiin.co.in या संकेतस्थळावर आपण नोंदणी करू शकतात.
सदर संस्थेच्या उभारणीसाठी इस्रोचे माजी शास्त्रज्ञ सतीश राव जितेंद्र खरडे,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी पाटील, प्र कुलगुरू पी.पी. माहुलीकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रत्नमाला बेंद्रे, संगणक तज्ञ लेखक अच्युत गोडबोले , इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे ऋषिकेश राठोड, यजुर्वेंद्र महाजन आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभत आहे.
याबाबत बोलताना इंडियन मॅथेमॅटिक्स अँड सायन्स टीचर असोसिएशनचे संचालक जयदीप पाटील म्हणाले की महाराष्ट्र राज्यात गणित आणि विज्ञान विषयात अत्यंत विद्वान शिक्षक कार्य करीत आहेत या सर्व विद्वत्ता असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन महाराष्ट्रातून नोबेल पारितोषिक प्राप्त करण्यासाठी नवीन पिढ्या घडविणे काळाची गरज आहे यासाठी तसेच शिक्षकांच्या विकासासाठी या मंचाची उभारणी करीत आहोत.