खानदेशी अधिकारी घडविणार भविष्यातील अधिकारी
उत्कर्ष खानदेशी मंडळ दरवर्षी देणार 100 विद्यार्थ्यांना यूपीएससी एमपीएससी परीक्षेचे विनामूल्य प्रशिक्षण
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राबविलेला राज्यातील एकमेव प्रकल्प
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – “ज्या मातीत जन्मलो ती माती आणि ज्या नात्यात वाढलो ती नाती विसरायची नसतात” हा विचार खान्देशातून अधिकारी झालेले तरुण प्रत्यक्षात जगत आहेत. मागील दोन दशकात खानदेशातून विविध प्रशासकीय पदांवर रुजू असलेल्या अधिकाऱ्यांनी उत्कर्ष खानदेशी अधिकारी मंडळ स्थापन केलेले आहे. या माध्यमातून या वर्षापासून जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर्ग एक, वर्ग दोन पदांसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. उत्कर्ष मंडळातर्फे उत्कर्ष स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान जाहीर करण्यात आलेले आहे.या अभियानांतर्गत यूपीएससी, एमपीएससी परीक्षांसाठी 100 विद्यार्थ्यांना सहा महिने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या संदर्भात संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य दिले जाणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके भेट दिली जाणार आहेत .यासाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन 02 मार्च 2025 रविवार रोजी जळगाव, धुळे ,नंदुरबार जिल्हा ठिकाणी करण्यात आलेले आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पदवीला शिक्षण घेत असणारे किंवा पदवी पूर्ण झालेले सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी या प्रवेश परीक्षेला पात्र आहेत.परीक्षेच्या नोंदणीसाठी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावयाचा आहे. परीक्षेतील गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष मुलाखती घेऊन अंतिम विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.यातील 30 विद्यार्थ्यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तर उर्वरित विद्यार्थ्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी करण्यात येणार आहे.या विद्यार्थ्यांना सहा महिने जळगाव येथे नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात निःशुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिल्ली, पुणे ,संभाजीनगर ,मुंबई या ठिकाणी असणारे तज्ञ मार्गदर्शक, लेखक तसेच तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या प्रकल्पासाठी भारतीय सनदी सेवा अधिकारी राजेश पाटील, राजस्व अधिकारी संदीप कुमार साळुंखे माजी राजस्व अधिकारी उज्वल कुमार चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तरी विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात नाव नोंदणीसाठी सोबत दिलेल्या लिंक https://forms.gle/DnxEvriP2aXPqyua7 वर नाव नोंदणी करावी तसेच अधिक माहितीसाठी प्रवीण पवार 9422562981, विजयसिंह पवार 8007535093, जयदीप पाटील 9922004193 यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती उत्कर्ष खानदेशी अधिकारी मंडळाचे समन्वयक आदिवासी उपायुक्त कपिल पवार यांनी दिलेली आहे.