• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेरला शनिवारपासून दोन दिवसीय पाचवे अहिराणी साहित्य संमेलन

Mar 27, 2025

Loading

अमळनेरला शनिवारपासून दोन दिवसीय पाचवे अहिराणी साहित्य संमेलन

अमळनेर प्रतिनिधी

येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अर्थात अहिराणी सेवक माजी आमदार गुलाबराव पाटील साहित्य नगरी येथे ३० व ३१ मार्च रोजी पाचवे अहिराणी साहित्य संमेलनास प्रारंभ होत आहे. ज्येष्ठ पत्रकार व मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले उद्घाटक आहेत. या दोन दिवसात उपस्थित सर्वांनी अहिराणी भाषेतच बोलावे असा दंडक करण्यात आला आहे.
संमेलनात सुप्रसिद्ध लोककवी, लेखक, विचारवंत, नाट्य कलाकार एकपात्री नाटककार, अहिराणी मिमिक्री यांच्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. कार्यक्रमाची पत्रिका आयोजकांनी प्रसिद्ध केली आहे.
संमेलनात सिनेगीतकार, पार्श्वगायक प्रशांत मोरे त्यांच्या अहिराणी कविता व गाणी सादर करतील. अहिराणी शब्दकोश , ओवीकोष तसेच गीतांचे अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांचे विवेचन होईल. नाट्य अभिनेता हर्षल पाटील यांचे नाट्य अभिवाचन होईल. मिमिक्री आर्टिस्ट विलास कुमार शिरसाठ यांची अहिराणी मिमिक्री , विजय पवार तसेच एकपात्री नाटककार प्रविण माळी यांचे एकपात्री नाट्य अहिराणी प्रेमींसाठी आकर्षण ठरणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील , आमदार अनिल पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण , धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील प्रमुख अतिथी आहेत.
३० मार्च रोजी दुपारी ४ वाजता अहिराणी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक रॅली व ग्रंथदिंडी निघेल. उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव शामकांत देवरे , आयएएस अधिकारी राजेश पाटील, सहाय्यक आयुक्त अर्चना राजपूत , यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत .त्या नंतर होणाऱ्या काव्य संमेलनात कवी ज्ञानेश्वर भामरे, डॉ.वाल्मिक अहिरे, दादाभाई पिंपळे, रमेश धनगर यासह निमंत्रित कवींची काव्यमैफील रंगणार आहे.
रात्री ८ वाजेपासून जात्यावरच्या अहिराणी ओव्या, खानदेशी गाणे, अहिराणी नाटिका,कानबाई नृत्य, अहिराणी मिमिक्री, अहिराणी एकपात्री नाट्य, व अन्य कलाप्रकार यांचा समावेश असलेले खान्देशी सांस्कृतिक कार्यक्रम विविध सांस्कृतिक महिला मंडळ तसेच वैयक्तिक स्वरूपात राज्यभरातून आलेले कलाकार सादर करतील.
३१ मार्च रोजी अहिराणी माय ,आमना खानदेश आणि अभिमान अहिराणीना हे नवकवींचे सत्र होईल. यानंतर अहिराणी भाषा संस्कृती विचार या विषयावर परिसंवाद होईल. कोल्हापूर येथील अहिराणी भाषा अभ्यासक डॉ. रविंद्र ठाकूर अध्यक्षस्थानी असतील. तर डॉ.फुला बागुल, डॉ.सदाशिव सूर्यवंशी, डॉ.सत्यजित साळवे, डॉ.जगदीश मोरे, डॉ.बाळासाहेब गुंजाळ व डॉ.कृष्णा पोतदार हे विचार मांडतील. दाभाडी येथील कथाकार एस.के .पाटील, प्राचार्य संजीव गिरासे , गोकुळ बागुल , वृषाली खैरनार यांचे अहिराणीतून कथाकथन होईल.
दुपारच्या सत्रात निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांचा अहिराणी झटका हा विनोदी कार्यक्रम होईल. त्यानंतर निमंत्रित कवींची काव्य मैफिल रंगेल .यासाठी भाषा संचालनालयाचे अध्यक्ष सुनील शिरसाठ यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्या नंतरच्या सत्रात “आईत पोयत सख्या न” हा एकपात्री प्रयोग प्रविण माळी सादर करतील.
संमेलनाचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत व माजी आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी माजी शिक्षक आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी आमदार शरद पाटील , माजी आमदार डॉ .बी.एस.पाटील प्रमुख अतिथी असतील. संमेलनास उपस्थितीचे आवाहन अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील, सचिव प्रभाकर शेळके, स्वागताध्यक्ष प्रा.डी.डी.पाटील, कार्याध्यक्ष प्रा.अशोक पवार, संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक रणजित शिंदे, कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे,उपाध्यक्ष डी . ए. पाटील,साहित्यिक समन्वयक डॉ.कुणाल पवार,महिला समन्वयक वसुंधरा लांडगे, सचिव रामेश्वर भदाणे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *