विषमुक्त शेतीसाठी नवे पाऊल: मंगळग्रह सेवा व पानी फाऊंडेशनच्या विशेष प्रशिक्षणाचा ठसा
अमळनेर प्रतिनिधी
: जैविकता जोपासत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विषमुक्त शेती करण्यासाठी संघटितरित्या काम करून गाव समृद्ध करण्याचा निर्धार पानी फाऊंडेशन व मंगळग्रह सेवा संस्था आयोजित दोन दिवसीय विशेष प्रशिक्षणात शेतकऱ्यांनी केला.
२४ आणि २५ एप्रिल रोजी मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित या शिबिरात सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या २७ गावातील ११२ महिला व पुरुष शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणात मानव आणि निसर्ग यांच्यातील नाते दृढ करीत पीक उत्पादनातून मिळणाऱ्या निव्वळ नफ्यात वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे कसा करावा? खर्च कमी करून उत्पादनात वाढ कशी करावी? फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेतकरी गट कसे निर्माण करावेत? गटांच्या माध्यमातून अधिकचे उत्पन्न कसे मिळवावे? उपलब्ध भांडवलात अधिकचे उत्पन्न कसे काढता येईल? शेती अवजारे खरेदी करताना काय काळजी घ्यावी? याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शेतातील पायाभूत सुविधांसंदर्भात माहिती देऊन ‘गटशेती प्रीमियर लीग’चीदेखील माहिती देण्यात आली.
ही प्रीमियर लीग पाणी फाऊंडेशनच्या मूल्यांकनानुसार मॉडेल गट बनविण्यासाठी होईल.
पानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक गुणवंत पाटील, तज्ज्ञ प्रशिक्षक प्रणय गोरीवले, प्रशिक्षक तुषार राऊत, अविनाश काळे, योगीराज हाके आणि पानी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक सुनील पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांसाठी चहा -पान व सुरुची भोजन व्यवस्थाही करण्यात आली.
प्रशिक्षण यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे कार्यालय अधीक्षक भरत पाटील, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मोरे, जितेंद्र पाटील, मंगल सेवेकरी आशिष चौधरी आदींनी परिश्रम घेतले.