*”अक्षयतृतीया निमित्त शिरुड अभ्यासिकेत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश”**
अमळनेर प्रतिनिधी
अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, निश्चित फलनिष्पत्ती देणारा एक पवित्र दिवस होय, असे मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ ‘अक्षय’ (न संपणारे), कायम टिकणारे असे मिळते, असा समज आहे. आजच्या शुभदिनी पर्यावरण , ज्ञान, विज्ञान व संस्कृतीची पूजा करणे व आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता भाव प्रकट करणे, हाच खरा या उत्सवाचा संदेश आहे. नेमके हेच औचित्य साधून शिरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती अभ्यासिकेत वृक्षारोपण करण्यात आले. बारा फूट उंचीची बारा झाडे लावण्यात आले. त्यात प्रामुख्याने वड, आंबा, निंब, बकुळ यांचा समावेश आहे.
या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. महर्षी व्यास आणि श्री गणेशाच्या साह्याने महाभारतासारखे महानकाव्यरचले त्याप्रमाणे वर्तमान युगातही नव्या ज्ञान रचना या पवित्र दिवसाच्या मुहूर्तावर केल्या पाहिजे असा आग्रह धरला जातो. त्यामुळे आखाजी हा ज्ञान परंपरेचा सुवर्णयोग मानला जातो. म्हणून अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चिरकाल टिकावा व त्यांना यश मिळावे यासाठी अभ्यासिकेच्या परिसरात आयटीआय कॉलेजचे निर्देशक अनिल वामन दुसाने व अंगणवाडी सेविका संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांच्या दातृत्वाने झाडे लावण्यात आली. यावेळी अनिल दुसाने, रामकृष्ण पाटील समन्वयक डी ए धनगर व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. झाडे लावण्यासाठी कल्पेश पाटील, जगदीश शिंपी, मयूर पाटील, हर्षल पाटील, आदित्य पाटील, चेतन पाटील, विपुल पाटील, धीरज वैराळे, स्वप्निल पाटील, शुभम पाटील, विशाल कासार, मयूर पाटील, अंकित महाजन, ज्ञानेश्वर महाजन यांचे सहकार्य लाभले. अभ्यासिकेतील लाभार्थी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी झाड दत्तक घेऊन ती जगवण्याची प्रतिज्ञा केली. दोन विद्यार्थी मिळून एक झाड दत्तक घेण्यात आले व त्याला संगोपन व संवर्धनाची जबाबदारी त्यांनी घेतली. या विशेष दिनाचे औचित्य साधून केलेले वृक्षारोपण खरोखर स्तुत्य आहे असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला.