**जळगाव लोकसभा मतदारसंघातील वादळी वाऱ्याने केळी-पपई बागायतींना मोठा फटका; शेतकरी संकटात**
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव लोकसभा मतदारसंघातील अनेक भागांमध्ये काल अचानक झालेल्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने केळी, पपईसारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक बागायती पिके जमीनदोस्त झाली असून, गुरे-ढोरे आणि इतर जनावरांचेही जीवितहानीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी या अचानक पडलेल्या संकटात सापडले आहेत.
या गंभीर परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत जलसंपदा मंत्री मा. गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ तसेच जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती झाली. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर आज विविध गावांचा दौरा करून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. केळी-पपईच्या बागायतींमधील नुकसान, वादळात मृत झालेल्या जनावरांची माहिती तसेच शेतकऱ्यांवरील आर्थिक भार यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवकांना स्पष्टपणे निर्देश देण्यात आले की, नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल शासनाला सादर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळू शकेल.
शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासन तत्पर असून, पुढील कारवाई लवकरच होईल, असे सांगितले जात आहे.