कल्याण- डोंबिवली पालिकेतील शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयुक्तांचा कडक दणका;
लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक योगेश पाटील यांना तडकाफडकी निलंबित
ठाणे:कल्याण
(मनिलाल शिंपी)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयात बुधवारी सकाळी एक महत्त्वपूर्ण आणि धडकी भरवणारी घटना घडली. पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी अचानक आपत्कालीन विभागाची पाहणी केली असता, तेथे ड्युटीवर असलेले काही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी लेखा व वित्त विभागातील वरिष्ठ लिपिक योगेश यादव पाटील यांना तडकाफडकी निलंबित करून प्रशासनात खळबळ उडवून दिली.
*आपत्कालीन विभागातील अचानक पाहणी आणि गैरहजेरीचा पर्दाफाश*
बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास आयुक्त गोयल यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्यालयातील आपत्कालीन विभागात अचानक भेट दिली. या वेळी विभागात केवळ काहीच कर्मचारी उपस्थित होते. योगेश पाटील यांची ड्युटी सकाळी सहा वाजल्यापासून होती, मात्र ते साडे नऊ वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचले नव्हते. हे पाहून आयुक्त चांगलेच संतप्त झाले.
कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा व शिस्त नियमांनुसार योगेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे इतर कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले असून, आयुक्त गोयल यांनी आपत्कालीन विभागातील इतर दोन कर्मचाऱ्यांनाही फैलावर घेतले.
यागंभीर पार्श्वभूमी: धोकादायक इमारतीचा कोसळलेला प्रकार*
ही कारवाई अशा वेळेस झाली आहे जेव्हा कल्याण पूर्वेत मंगळवारी एक धोकादायक इमारत कोसळून सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी आपल्या यंत्रणेला अधिक जागरूक आणि कार्यक्षम राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
*सडेतोड निर्णय आणि नागरिकांचे समाधान*
आपत्कालीन विभागातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, लिपिक, शिपाई यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या पुढील चार महिन्यांसाठी नियुक्त्या करण्यात आल्या असून, कोणत्याही परिस्थितीत ड्युटीवर अनुपस्थित राहणार्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा आयुक्तांनी दिला आहे. अनेक कर्मचारी वेळेवर येत नाहीत किंवा टाळाटाळ करतात, ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी शिस्तप्रिय कारभाराला सुरुवात केली आहे.
*नागरिकांची सकारात्मक प्रतिक्रिया*
*आयुक्त अभिनव गोयल यांच्या शिस्तीचा धसका कर्मचाऱ्यांना बसला असला तरी, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नागरिकांकडून अशीही मागणी केली जात आहे* की, जे कर्मचारी रजा घेऊन काम टाळत आहेत, त्यांच्यावरही तत्काळ कारवाई करावी आयुक्त यांच्या धडाडीच्या कार्यशैलीमुळे पालिका प्रशासनात नव्याने शिस्तीचे वारे वाहू लागले आहेत.