*अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मृत प्रवाशांना श्रद्धांजली, जखमी प्रवाशांना मदत उपलब्ध करून देण्यासोबतच अडकलेल्या प्रवाशांना पर्यायी प्रवासव्यवस्थेसाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांची केंद्र सरकारकडे मागणी*
मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी एक गंभीर विमान अपघात घडला असून यात काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मा. श्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मृतांना श्रद्धांजली व्यक्त केली आहें . जखमींना मदत दिली जात आहे ती महत्वाची आहे. त्याचसोबत पुणे व इतर गंतव्यस्थानांकडे प्रवास करणाऱ्या अडकलेल्या प्रवाशांसाठी तातडीने पर्यायी विशेष विमानसेवा वा ईतर प्रवाससेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, माहिती वाहिन्यांद्वारे असे स्पष्ट झाले आहे की अहमदाबाद येथून होणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांकडे जाण्याचे नियोजन असलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
या प्रवाशांमध्ये काहीजण आपत्कालीन वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यवसायिक कारणांसाठी प्रवास करत होते, याचे भान ठेवून वडोदरा, सुरत अथवा जवळच्या इतर विमानतळांवरून विशेष उड्डाणांची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल, वाहतूक व्यवस्था सुकर होईल आणि प्रशासनावरचा ताण कमी होईल, असेही त्या आपल्या पत्रात म्हणाल्या आहेत.