• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

बारावीच्या लाखो उत्तरपत्रिका तपासणीविना पडून. अद्यापही सकारात्मक तोडगा नाहीच.

Feb 28, 2023

Loading

बारावीच्या लाखो उत्तरपत्रिका तपासणीविना पडून. अद्यापही सकारात्मक तोडगा नाहीच.

जळगाव: संपूर्ण राज्यात इ.१२वीची वार्षिक परीक्षा सुरू होऊन आठवडा उलटलेला आहे. अद्यापपावेतो एकाही विषयाच्या मुख्य नियामकांची सभा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार आंदोलनामुळे होऊ शकलेली नाही. आज अखेर झालेल्या इंग्रजी आणि हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अक्षम्य चुका झाल्याचे निदर्शनास आलेले असून इंग्रजी विषयात तर चक्क नमुना उत्तरपत्रिकेतील ओळी छापल्यामुळे संपूर्ण राज्यात प्रचंड गदारोळ निर्माण झालेला होता. त्याचप्रमाणे हिंदी विषयामध्ये देखील एकसमान अनुक्रम छापल्यामुळे दोन गुणांचा घोळ झालेला आहे. या दोन्ही विषयातील अनुक्रमे सहा आणि दोन गुणांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल यासंदर्भामध्ये बोर्डाची अधिकृत भूमिका अद्यापही जाहीर झालेली नाही. त्याचप्रमाणे राज्यातील सर्वच नऊ मंडळातील मुख्य नियामकांच्या सभा पेपर तपासणीवरील बहिष्कारामुळे होऊ शकलेली नाही. या विषयाच्या मुख्य नियामकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार आंदोलनात सहभागी असल्याचे निवेदन संबंधित विभागीय मंडळांकडे सादर केलेले आहे.
नियमानुसार विभागीय मंडळाने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शाळा, महाविद्यालयांना तपासणीसाठी पाठवण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र अनेक वर्षांच्या प्रलंबित न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील सर्वच उ.मा.वि.,/ क.म.वि. शिक्षक हे पेपर तपासणी बहिष्कारात सहभागी असल्याने ते सर्वच पेपर्स विना तपासणी महाविद्यालय व कस्टडी स्तरावर तसेच पडून आहेत. राज्यातील सुमारे साडेचौदा लाख विद्यार्थी यंदा बारावीचे परीक्षा देत आहेत. शिक्षकांचा केवळ पेपर तपासणीवर बहिष्कार असल्याने सर्व परीक्षा या सुरळीत सुरू आहेत. परंतु उत्तपत्रिका तपासणीवरील बहिष्कारमुळे उत्तरपत्रिकांची तपासणीचे काम आजअखेरही सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे १२वीचा निकाल वेळेवर लागेल की नाही अशी अनामिक भीती विद्यार्थी व पालक वर्गामध्ये निर्माण झालेली आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व शिक्षणमंत्री यांच्यात गेल्या तीन दिवसांपूर्वी चर्चा झालेली असली तरी शालेय शिक्षण मंत्री ना.दिपकजी केसरकर यांनी काही मागण्यांसंदर्भात अनुकूलता दर्शवलेली असली तरी सदर सभेचे इतिवृत्त अद्यापही महासंघाला प्राप्त झालेले नाही. प्रलंबित न्याय्य मागण्यांसंदर्भात सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा अशी जोरदार मागणी महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ. संजयजी शिंदे व नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा.श्री. बी.ए.पाटील यांचेसह जळगाव ज्युक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा.नंदन वळींकार सचिव प्रा.सुनील सोनार कार्याध्यक्षद्वय प्रा.शैलेश राणे प्रा.सुनील पाटील उपाध्यक्ष प्रा.डॉ.अतुल इंगळे, प्रा.गजानन वंजारी, प्रा.पी.पी.पाटील, प्रा. राहुल वराडे, प्रा.सुधाकर ठाकूर, प्रा.डी.जे.चिकटे प्रा.राजेश कोष्टी जेष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड प्रा.डी.डी.पाटील, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *