• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व : प्रा. कुमुद पावडे
– प्रा. अर्चना हातेकर, धुळे

Jun 5, 2023

Loading

एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व : प्रा. कुमुद पावडे
– प्रा. अर्चना हातेकर, धुळे

आज आमच्यात कुमुदताई नाही. 31 मे 2023 ला साडे पाच वाजता हृदयविकारो त्यांचे निधन झाले. मला ही बातमी फोनवरून त्यांची लहान बहीण चारुताई सोमकुँवर यांनी दिली. ती बातमी कळताच माझ्या डोळ्यात अश्रुंचा पूर दाटला. त्यांच्या अनेक आठवणी माझ्या मनात साठलेल्या आहेत. त्या संस्कृत पंडित होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत विषय घेण्यास मनुवादी शिक्षण व्यवस्थेने विरोध केला. ते वाचल्यानंतर कुमुदताईला मेडीकलला प्रवेश मिळत असूनही मुद्दाम संस्कृत विषय घेऊन कुमुदताई एम.ए. झाल्या आणि ‘संस्कृत’च्या प्राध्यापकही झाल्या.
कुमुदताईंनी ‘अंत:स्फोट’ नावाचं लिहिलेले पहिले आत्मकथन आहे. त्यांचे चौदा भाषेत भाषांतर झाले आहे. परदेशातही ते खूप गाजले. त्यांच्या काही वैचारिक लेखांमुळे मी त्यांच्याकडे आकर्षित झाले. तो लेख होता ‘मला आहेव मरण नको’ हा लेख त्या काळात खूप गाजला. तर दुसऱ्या लेखात त्या लिहितात, ‘‘बायको म्हणजे पायातलं खेटर एवढीच बायकोची किंमत केली असेल तर अशा नवऱ्यांसाठी बाईंनी सावित्री व्रताचा हेका धरावा हे बुद्धीला न पटणारं आहे. स्त्रीला दुय्यम बनविणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध हे बंड आहे. सद्‌सद्‌विवेक बुद्धीला न पटणारं आहे. सद्‌सद्‌विवेक जागृत ठेवणारी स्त्री एक माणूस आहे. देवता नाही किंवा पारंपारिक गुलाम ही नाही.
कुमुदताई पावडेंचे दलित साहित्यातील फार मोठे नाव आहे. याची जाणीव मला झाली. स्त्री ही प्रथम माणूस आहे. तिचा माणूस म्हणून विचार करायला हवा हा बुद्ध तत्त्वज्ञानाचा विचार त्यांनी आपल्या विचार प्रवर्तक भाषणातून देशात आणि देशाबाहेर मांडला. अशा कुमुदताईची भेट व्हायला पाहिजे. ही संधी मला 21 मे 1995 ला चालून आली. पुण्याला विलास वाघ आणि इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांची एक सामाजिक परिषद घ्यायचे ठरविले. मला ही त्याचे निमंत्रण आले. संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या या ठिकाणी आल्या. कुमुदताई पण त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत आल्या होत्या सर्वांनी आपआपले विचार मांडले. मी ही परखडपणे माझे विचार मांडले. दोन दिवस ही परिषद होती आणि सर्वानुमते महाराष्ट्राची दलित महिला संघटना स्थापना करावयाची असा विचार समोर आला आणि अनपेक्षितपणे माझे नाव सूचविले गेले. मी म्हटले एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकू नका. पण सगळ्यांच्या मते मी ही जबाबदारी पार पाडू शकेल. दलित महिला संघटना महाराष्ट्राची मी अध्यक्ष झाले. सल्लागार समितीत उषा वाघ आणि कुमुद पावडे होत्या. कुमुदताईंनी माझे अभिनंदन केले. सोळा वर्षापूर्वी वाचलेले आत्मचरित्राची लेखिका मला भेटली याचा मला खूप आनंद झाला.
मी त्यांना सांगितले की, माझे माहेर नागपूरच आहे. मी माहेरी येत असते. तेव्हा त्या मला म्हणाल्या जेव्हा कधी तू नागपूरला आलीस तर माझ्य घरी अवश्य ये. मी आताच तुला निमंत्रण देते आहे. ही माझी पहिली भेट. पुढे आमची मैत्री दृढ होत गेली.
मी 17, 18 मार्च 1997 ला धुळ्याला अखिल भारतीय दलित महिला अधिवेशन घेतले. या संमेलनाचे अध्यक्ष पद कुमुदताईंनी स्वीकारले. भारतातील प्रत्येक राज्यातून सामाजिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या महिला आल्या होत्या. आ. प्रमिला दंडवतेही समारोपाच्या भाषणाला आल्या होत्या. हे संमेलन खूप गाजले.
त्यानंतर माझे आणि कुमुदताईंचे सामाजिक कार्यामुळे वारंवार भेटी व्हायला लागल्या. त्या ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमेन्स ऑर्गनायझेशन’ च्या अध्यक्षा होत्या. त्यांचा आंतरजातीय विवाह त्या काळात खूप गाजला. त्याची माहिती खुद्द त्यांचे पती मोतीराम पावडे यांनी दिली. त्यांना मी दादासाहेब म्हणायची. कारण ते मराठा पाटील होते. या लग्नाला खूप विरोध झाला. यानंतर कुमुदताईंचे आयुष्यच बदलून गेले. पती गांधीवादी विचारसरणीचे तर त्या आंबेडकरवादी विचारसरणीच्या.
त्यांचे रात्रशाळेपासून शिकविण्याचे काम चालू झाले ते निवृत्तीपर्यंत. वस्तीवस्तीत जाऊन प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालविले. आजही त्यांच्या संघटनेमार्फत झोपडपट्टीतील मुलांना शिकविणे चालू आहे. या संस्थेमार्फत आता खेड्यापाड्यातील दलित स्त्रियांना बोलतं करणं हे काम शेवटपर्यंत करीत होत्या. स्त्रियांसाठी मार्गदर्शनपर शिबिरे या संस्थेमार्फत घेतली जात होती.
नागपूरजवळ भानखेडे नावाचे खेडे आहे. तेथे मुस्लीम, कोष्टी व बौद्ध समाज आहे. पुरुषांना दारुचे व्यसन त्या गावात भट्ट्या लावल्या जातात. तेव्हा कुमुदताई महिलांना घेऊन भट्‌ट्या संहार मोहिमेवर गेल्या. तेव्हा त्यांना गावगुंडांशी सामना करावा लागला. मोहीम यशस्वी करूनच त्या परतल्या.
त्या मला म्हणाल्या अर्थातच मी जे हे कार्य करते ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने करते. दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, पुणे या मोठ्या शहरातून ते ग्रामीण भागापर्यंतचे दलित स्त्रियांचे प्रश्न विदेशातही मांडते. या अनुषंगाने 1992 ते 2006 पर्यंतच्या काळात विविध देशात त्यांना निमंत्रित केले गेले. दक्षिण आशिया, डर्बन, जोहान्सबर्ग, केपटाऊन, साऊथ आफ्रिका, हरारे, जिनेव्हा, केनिया, स्विर्त्झलँड, न्यूयॉर्क, वाशिंग्टन, साऊथ अमेरिका. माझ्या समाजाचा त्या मानबिंदु आहे.
त्यांच्या सामाजिक कामगिरीबद्दल अनेक ठिकाणी सन्मान सत्कार झाले आणि पुरस्कारही मिळाले. ‘संस्कृत पंडित’ पुरस्कार- महाराष्ट्र शासन (1987), अहिल्याबाई होळकर- अस्मितादर्श (1997), क्रांतिज्योति फुले स्मारक समिती, नागपूर (1999), ‘अमेरिकन वुमेन्स ऑर्गनायझेशन’ पुरस्कार (2002), साऊथ आफ्रिका, महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य पुरस्कार (2002), केशव गोरे स्मारक, मुंबई, ‘पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान’ पुरस्कार (2003), मुंबई, कस्तुरबा गांधी पुरस्कार- लोकसेवा विकास संस्था, चंद्रपूर (2004), ‘कुसुमताई चौधरी स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार (2005),
त्या म्हणाल्या की, पुरस्कार म्हणजे आपण प्रामाणिकपणे काम केल्याची पावती असते. पुरस्काराने मिळणाऱ्या आनंदापेक्षा सामाजिक कार्यात यशस्वी झाल्याचा उत्साह द्विगुणित होतो. तो त्यांना जास्त महत्त्वाचा वाटतो.
आंतरजातीय विवाहास दोघांनीही खूप मोठा वाटा उचलला. त्यांचे पती आणि त्यांनी 300 ते 350 आंतरजातीय विवाह लावून दिले. समाजात वावरतांना कित्येक विद्यार्थ्यांना पैशांची मदत केली. त्यांचे घर म्हणजे कार्यकर्त्यांचा आधार होता. हे चित्र घरातील मुलांनाही बघायला मिळाले. त्यामुळे त्यांच्यावरही नकळत संस्कार झाले.
दलित स्त्री आणि सवर्ण स्त्री मध्ये त्या फरक करतात. सवर्ण स्त्रीला आर्थिक सुबत्ता मिळते. दलित बहुजन महिला अर्थार्जनासाठी घराबाहेर पडतात. पण त्यांच्यावर धार्मिक व सामाजिक बंधने असतात. तसेच तिची मिळकत तिला नवऱ्याला द्यावी लागते. ती अजूनही मुक्त नाही असे कुमुदताई आपल्या भाषणातून विचार प्रगट करायच्या.
आज त्या आपल्यात नाहीत. पण त्यांचे प्रबोधनपर विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. त्यांना मी या लेखाद्वारे श्रद्धांजली वाहते आहे. आमचा मानबिंदु त्या आहेत आणि श्रद्धास्थानही आहेत. - प्रा. अर्चना हातेकर, धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed