• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शाळेला सुरू होऊन पंधरा दिवस झाले,
निवडणूक आयोगाने शिक्षकांना जुंपले निवडणुकीच्या कामाला…

Jun 24, 2023

Loading

शाळेला सुरू होऊन पंधरा दिवस झाले,
निवडणूक आयोगाने शिक्षकांना जुंपले निवडणुकीच्या कामाला…

उदय नरे या शिक्षकाचे मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र

मुंबई प्रतिनिधी
15 जुनला राज्यातील शाळा सुरु होऊन शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यात आली. व अल्पावधीतच निवडणूक आयोगाने राज्य पातळीवर निवडणूक कामासाठी शिक्षकांना जुंपण्याचे लेखी आदेश 23 जुन 2023 रोजी दिले आहेत. यामुळे अध्ययन व अध्यापन प्रक्रिया कोलमडून जाणार आहे. निवडणूक कामा संदर्भात देण्यात आलेल्या पत्रकात शाळेचे कामकाज सांभाळून निवडणूक कामे पार पाडण्याची अपेक्षा व्यक्त केल्याने मुंबई उपनगरातील एका शाळेतील पर्यवेक्षक उदय नरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे निवडणूक कामा संदर्भात शिक्षकांच्या व्यथा व्यक्त करून शिक्षकांच्या कर्तव्याबद्दल योग्य ती भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

माननीय मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय,
मुंबई

विषय : शाळेतील शिक्षकांना देण्यात आलेल्या बीएलो ड्युटी संदर्भात.

माननीय महोदय,
सप्रेम नमस्कार,

मुख्य निवडणूक आयोगाने राज्य पातळीवर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे निवडणूक कामासंदर्भातले पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना अनेक ठिकाणी 23 जुन 2023 रोजी प्राप्त झाले आणि मुख्याध्यापक त्रस्त झालेले आहेत.
अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असतानाही पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शिक्षकांना निवडणूक ड्युटी आल्यामुळे शिक्षक ही व्यस्त झाले आहेत. यामुळे यापुढे शाळा कशी चालवावी असा मोठा प्रश्न मुख्याध्यापकांना व शाळेतील पर्यवेक्षकांना पडलेला आहे. देशात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने निवडणूक कार्यकारी अधिकारी यांचे पत्र आता सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकां द्वारा देण्यात आले. लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 कलम 13 ब (2) व कलम 32 यानुसार हे पत्र देण्यात आलेले आहे .निवडणुकीचे काम करताना शाळेचे कामकाज सांभाळून मतदार यादीचे काम करावे असे आदेश देण्यात आल्यामुळे शिक्षकही हवालदिल झालेले आहेत. या निवडणूक कामाची टाळाटाळ केल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 कलम 132 नुसार कार्यालया प्रमुख तसेच संबंधित अधिकारी हे शिक्षेसाठी प्राप्त राहतील अशी सूचनाही या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे.
मुंबईतील अनेक शाळांमध्ये नव्याने शिक्षक भरती करण्यात आली नाही. शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. प्रथम घटक चाचणी सुध्दा झाली नाही व त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार? एका वर्गीत 65 ते 75 मुले आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे धोरण अवलंबावियाचे का निवडणूक कामे करायची? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे?

निवडणूक, जनगणना व नैसर्गिक आपत्ती या कामातून शिक्षकांना सुटका नाही यामुळेच शिक्षक निवडणूक कामासाठी रुजू ही होतील पण अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुरळीत कशी पार पाडणार? असा प्रश्‍न शिक्षक विचारत आहेत.
शिवसेना – भाजपाचे गतिशील सरकार आहे. त्यामुळे भविष्यात या सरकार कडून आम्हाला अनेक अपेक्षा आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देण्यात आलेल्या ड्युटी आम्ही कर्तव्य व देशहितासाठी नक्कीच करू पण या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
मुंबईतल्या अनेक शाळेतील शिक्षकांना देण्यात आलेल्या पत्रकात 01 जुन ते 16 आँक्टोंबर या काळात निवडणूक पुनरीक्षण पुर्व कार्य देण्यात आले आहे व ते सुद्धा शाळा करून. निवडणूक कामे करण्यासाठी शिक्षक तयार आहेत पण इतका प्रदीर्घ काळ शिक्षक शाळेबाहेर राहिल्यास शैक्षणिक नुकसान होणार आहे तसेच शिक्षकांच्या कार्यशैलीवर परीणाम होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूकीच्या दिवशीच व त्या अनुषंगाने प्रशिक्षणासाठी शिक्षक तयार आहेत.एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षक कोणत्याही प्रकारची कामे करण्यातसाठी नेहमीच तयार असतात व या पुढील काळातही कामे करतील. सरकारने सुवर्ण मध्य काढावा अशी सर्वच शिक्षक, विद्यार्थी व पालकांची अपेक्षा आहे. वर्तमान पीढीला मार्गदर्शन करून भविष्यकालीन पीढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतो. त्यामुळे शिक्षकांच्या बिएलओ ड्युटी संदर्भात शासनाने एक सकारात्मक भूमिका घेऊन शिक्षकांच्या कर्तव्याबद्दल योग्य ती भूमिका घ्यावी ही माफक अपेक्षा.

आपला स्नेहांकित

उदय जी नरे
मुंबई
9892755311

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed