
येथे गुरुजींना करावीच लागते आत्महत्या
जगण्याचे कारण देणारा प्राणवायूच
जेव्हा शोषून घेऊ लागते व्यवस्था,
तेव्हा गुरुजींना करावीच लागते आत्महत्या,
आपल्याच शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारात!
बघावीच लागते उडून जाणारी संस्कृती, काळजातील करुणेने लिहिलेली.
आता होणार नसतात घामाची फुले कारण, आधीच रचलेली असतात आजच्या श्यामच्या मम्मीने
प्लॅस्टिकची फुले ! गुरुजी, तुमच्या त्या गोड गोष्टी विसरलेल्या, आणि आता सत्तरीत झुकलेल्या त्या धडपडणाऱ्या मुलांच्या, नव्या शनिवारवाड्यातील वातानुकूलित दिवाणखान्यात विझून जाणार असतात ती तुम्ही पाहिलेलली एकात्म भारताची आंतरभारतीस्वप्ने!
पडणार नसते तुमची ती ‘ स्वर्गातील माळ ‘ तुमच्या लाडक्या सुधेच्या गळ्यात, कारण ती आधीच खेचून नेलेली असते रूप बदललेल्या पेशवाईतील आजच्या ‘ बार ‘भाईनी!
ते साजरे करताना दिसतात
नारायणरावाच्या अखेरच्या किंकाळीचा उत्सव, नि नवे खरकसिंग सुमेरसिंग
गिनत असतात मोहरा, नेमून दिलेल्या कामगिरीच्या!
गुरुजी, अहो गुरुजी, तुमचा तो
बलसागर भारत ‘, करायचाच ठरवले आहे दुर्बल, तुमच्याच लेकरांच्या हातांनी .नि जगाला प्रेम अर्पावे’ मधील मंत्र करून टाकलाय गपगुमान , मस्तवाल शक्तीप्रदर्शनाच्या मत्त मुजोरीत!
गुरुजी ,तुम्ही अजूनही कुठल्या भाबड्या आशेवर,
नवा रामशास्त्री येईल पुन्हा संस्कारपेठेत म्हणून?
अहो, त्यांना समारंभपूर्वक पाठवले आहे, मुळामुठेच्याकिनारी, रूप बदलून वावरणाऱ्या आनंदीबुवांनी , तुमची ती ह्यांनीच कालबाह्य केलेली ‘भारतीय संस्कृती ‘ तुमच्याच हातांनी बुडवायला!
आता सुरू होत राहतील महोत्सव,
कारस्थान यशस्वी झाल्याच्या आनंदात!नि कुरवाळत रहातील कोटाची सोनेरी बटणे, कसे चकवले गुरुजी तुम्हाला, ह्या तरंगत्या आनंदात!
‘ काका, काका, मला वाचवा हो !’ही आर्त साद ऐकायला,आता कुणीही नाही मोकळा, कारण, आता जो तो नव्या कंत्राटाच्या शोधात , नि मीडिया ब्रेकिंग न्युजच्या आनंदात!
गुरुजी, येथे पुन्हा एकदा करावी लागणार आत्महत्या, लागा तयारीला लागा गुरुजी, ते पहा ते येत आहेत चतुर वाणीचा, श्रद्धांजलीचा क्लोरोफॉर्म घेऊन! तेवढाच एक कार्यक्रम मिळाला, उद्याच्या सायंकाळीसाठी! परवाच्या सकाळसाठी!
*
(कवितेतील व्यक्तिरेखा वा प्रसंग कुठे वर्तमानात आढळल्यास तो योगायोग समजू नये) *प्रवीण दवणे* ( ,दिनांक२६जून२०२३,पहाटे ४