
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करताना दिसतात. राज्यातील शिक्षकांची अवस्था फारच दयनीय आहे. गेली अनेक वर्षे शिक्षक भरती करण्यात आली नाही. शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत असे असूनही दरवर्षी प्रमाणे यावर्षीही राज्यातील शिक्षक दिनाचा आनंद ओसंडून वाहत होता. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यादीत महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषदेच्या शिक्षिका मृणाली गांजाळे यांना मान मिळाला. तर राज्यातील 108 शिक्षकांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला. महाराष्ट्रातील शिक्षण क्षैत्रातील बजबजपुरी मात्र मोठय़ा प्रमाणात यावर्षी बाहेर आली. लाखो – करोडो रुपयांचा गैरव्यवहार शिक्षण खात्यात होत आहे याची वाच्यता शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सभागृहात केली व मुंबईतील एका महिला शिक्षण अधिकाऱ्याला आपल्या पदावरून दूर जावे लागले. शिक्षक पुरस्कार नामांकन करण्यासाठी सुध्दा वजन ठेवून वजनदार शिफारस लागते अशी चर्चा शिक्षण क्षैत्रात आहे. ही कारवाई म्हणजे सागरातील एक कप आहे कारण शिक्षण क्षेत्रातील अनेक मंजुरी व पदोन्नतीसाठी इतकेच काय तर शिक्षक निवृत्त झाल्यावर त्यांच्या भविष्य निर्वाह निधी मिळण्यासाठी दरपत्रक ठरले आहे याचा गौप्यस्फोट आमदार कपिल पाटील यांनी सभागृहात केला. शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटून काढून लवकरच शिक्षक भरती पारदर्शक पणे केली जाईल अशी घोषणा केली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने का होईना सर्वच नेत्यांना शिक्षकांचे स्मरण होते आहे व राज्यात शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. वर्तमान पीढीला मार्गदर्शन करून भविष्यकालीन पीढी घडवण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाच सप्टेंबर हा दिवस देश पातळीवर साजरा होत आहे.आपल्या गुरु विषयीचा आदरभाव, मान, सन्मान या दिवशी व्यक्त केला जातो.
अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे सर्व कामकाज आज शाळेच्या विद्यार्थ्यांनी पार पाडले.सकाळची सामुहिक प्रार्थना, विद्यार्थी उपस्थीती घेणे इतकेच काय? तर अध्ययन – अध्यापन प्रक्रिया शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पार पडली. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षकीपेशाचा आगळावेगळा अनुभव घेतला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री गोविंदराजन श्रीनिवासन सरांनी विद्यार्थीदशेतील आव्हाने व यशस्वी गुरुकिल्लीचा मार्ग यावर विद्यार्थ्यांना समुपदेशन केले.