• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शिक्षणातून जागतिक मूल्ये प्रस्थापित करणारे थोर महापुरुष महात्मा फुले!!

Nov 28, 2023

Loading

शिक्षणातून जागतिक मूल्ये प्रस्थापित करणारे थोर महापुरुष महात्मा फुले!!

जगातल्या प्रत्येक मानवाला हेवा वाटावा असे अप्रतिम कार्य महात्मा फुले यांनी या धरतीवर करून दाखविले. शिक्षणातून नवा विचार करण्याचा दृष्टिकोन त्यांनी दिला. समाजाला विशाल मानवी मूल्यांकडे नेले .आज असा स्मृतीत कायम जपावा असा दिवस आहे तो म्हणजे महात्मा फुले यांचा स्मृतिदिन !भारतात मनुस्मृतीच्या विचाराने बरबटलेल्या काळात महात्मा फुले यांचा जन्म झाला. एक झपाटलेला युवक भारताला त्या काळात मिळाला. भीषण परिस्थितीत ज्योतिराव फुले शिकले, त्यांनी भारतात रुढी ,परंपरा यांच्या नावाने चालत असलेली वाईट रिती पाहिल्या. मानवी मूल्य बाजूला ठेवून सनातन्यांची अरेरावी वाढली होती.अशा काळात भारतीय समाजाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी एक योद्धा निर्माण झाला तो म्हणजे थोर महात्मा ज्योतिराव फुले .जर त्या काळात महात्मा फुले सारखे क्रांतिकारी पुरुष झाले नसते तर आज बहुजनांसाठी स्वातंत्र्याची पहाट उजाडली नसती .पुणे सारख्या सनातनांच्या दादागिरीला बेबंदशाहीला लगाम लावण्याचे काम ज्योतिराव फुले यांनी केले .शिक्षण घेणे बहुजनांसाठी पाप आहे ते केवळ एका वर्गाची मक्तेदारी आहे हा भ्रम ज्योतीरावांनी दूर केला. चांगल्या कामासाठी आपल्या जीवाची देखील तमा न बाळगता महात्मा फुले यांनी शिक्षणा चा पाया भरला .आज भारतात लोकशाही असताना सर्वांना समान शिक्षण ,मोफत शिक्षण मिळतांना सर्वत्र दिसत नाही. एकीकडे इंग्रजी शाळा वारे माप पैसा घेऊन शिक्षण देत आहे दुसरीकडे सरकारी शाळा शिक्षण देत आहे ही तफावत आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यावर दूर करू शकलो नाही. शिक्षणाने शिक्षित समाज निर्माण होताना वरवर दिसत असला तरी आतून मात्र अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला दिसून येतो. महात्मा फुले यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोणतेच काम केले नाही .आज त्यांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याने अनेक लोकांना भारतरत्न उपाधी मिळाली. भारताची जी प्रगती दिसते आहे त्यामागे शिक्षणाची ताकद आहे .ही ज्ञानाची ज्योत ज्या महापुरुषाने अथक परिश्रम घेऊन या भूमीवर लावली त्याला मात्र विसरताना दिसत आहे. शिक्षणाने समानता शिकवली परंतु आमच्या समाजाची मानसिकता धर्मनिरपेक्ष बनली नाही. त्यामुळे येथील धर्म एकमेकांपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानतात जाती-जातीत श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद दिसून येतो. शिक्षण घेतल्याने हा भेद गेला पाहिजे होता परंतु शिक्षण मिळाले पण जातीचा अहंकार गेला नाही .महात्मा फुले यांना अपेक्षित सर्वांना शिक्षण ही संकल्पना रुजताना दिसत नाही. ज्या महापुरुषाने विचाराचे दालन आम्हासाठी खुले केले त्या व्यक्तीचे ऋण आम्ही विचारानेच फेडले पाहिजे. अशा महापुरुषाचे योगदान न विसरण्यासारखे आहे त्यांनी निर्माण केलेल्या सत्यशोधक समाज आम्ही उभा केला पाहिजे. स्वतः आपल्या जीवनाचे उद्धारक झाले पाहिजे .मला जे ज्ञान मिळाले ते मी निस्वार्थ भावनेने दुसऱ्यांना दिले पाहिजे .कर्मठ विचार बाजूला सारले पाहिजे. शिक्षण समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवले पाहिजे. चिकित्सक विचार समाजाचा पाया झाला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात आला पाहिजे. हिच तात्यासाहेब ज्योतीराव फुले यांना आदरांजली देता येईल

पत्रकार
एस.एच. भवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *