
१२वी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी ऐवजी मराठी/हिंदी विषयाचे पेपर आधी घ्या : मातोश्री सेवाभावी संस्थेची शिक्षण विभागाकडे मागणी!
धुळे : विद्यार्थी हिताच्या दृष्टीने १२वी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी ऐवजी मराठी/हिंदी विषयाचे पेपर आधी घ्यावेत, अशी आग्रही मागणी धुळे जिल्ह्यातील जैताणे-निजामपूर (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्थेने शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ.बी.बी.चव्हाण व विभागीय सचिव मोहन देसले यांना नुकतेच यासंदर्भात निवेदन देण्यात आले. विभागीय सहसचिव डॉ.एम.व्ही.कदम यांनी संस्थेचे संचालक अनुराग जगदाळे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२) हे निवेदन स्वीकारले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवान जगदाळे हेही उपस्थित होते.
१२ वी बोर्डाच्या परीक्षेत वेळापत्रकानुसार दरवर्षी इंग्रजी विषयाचा पेपर सर्वप्रथम आयोजित केला जातो. परंतु इंग्रजी विषयाची काठिण्यपातळी जास्त असल्याने इंग्रजी विषयाच्या भीतीपोटी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर मानसशास्त्रीयदृष्ट्या एक प्रकारचे मानसिक दडपण येते. त्यामुळे सुरुवातीलाच पहिला पेपर अवघड गेल्यास अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जातात व त्याचा परिणाम त्यांच्या पुढील उर्वरित विषयांच्या पेपरांवर होतो. वास्तविक मराठी ही आपली प्रादेशिक मातृभाषा असून हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. तरी विद्यार्थीहिताच्या दृष्टीने येत्या काळात १२वी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून तृतीय भाषा इंग्रजीऐवजी प्रथम भाषा मराठी व द्वितीय भाषा हिंदी या विषयांचे पेपर आधी आयोजित करावेत व इंग्रजी विषयाचा पेपर त्यानंतर आयोजित करावा, अशी आग्रही मागणी मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे संस्थापक अध्यक्ष भगवान जगदाळे, उपाध्यक्ष राजनारायण जगदाळे, सचिव सुशीलकुमार जगदाळे, खजिनदार जगदीश खैरनार, संचालक भारत जाधव, संचालक आशुतोष जगदाळे, संचालक अनुराग जगदाळे यांनी केली आहे. सदर निवेदनाच्या प्रति शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह राज्याचे शालेय शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.), महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे राज्याध्यक्ष, राज्य सचिव व विभागीय शिक्षण उपसंचालक, नाशिक यांनाही रजिस्टर पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.
प्रतिक्रिया,
“आपल्या भावना आम्ही समजू शकतो. परंतु आता १२वी बोर्डाच्या परीक्षेचे सर्व नियोजन पूर्ण झाल्याने ह्यावर्षी वेळापत्रकात बदल करणे अशक्य आहे. तरी वरिष्ठांकडे याबाबत पाठपुरावा करून आपल्या मागणीचा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने आगामी काळात नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल!”
—डॉ.एम.व्ही.कदम,
सहसचिव, नाशिक विभागीय मंडळ…
छायाचित्र :
नाशिक : नाशिक विभागीय मंडळाचे सहसचिव डॉ.एम.व्ही. कदम यांना मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे मागणीचे निवेदन देताना संस्थेचे संचालक अनुराग जगदाळे…