
ट्रेनिंग, परीक्षा व निवडणुकींच्या कामांनी शिक्षक दमले,मुंबईतील शिक्षकांना कुणीही वाली नाही- अनिल बोरनारे
मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) तीन दिवसांचे प्रशिक्षण, १२ वी परीक्षांची कामे, १० वी परीक्षांचे नियोजन, लोकसभा निवडणूकीसाठी शाळांना मतदार केंद्र म्हणून करावयाची तयारी त्यासाठीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकी यामुळे मुंबईतील शिक्षक व मुख्याध्यापक बेजार झाला असून शिक्षकांना कुणी वालीच नसल्याची खंत शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी व्यक्त केली असून तातडीने शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करण्याची मागणी केली आहे
सध्या १२ वीच्या परीक्षा सुरू असून त्यातच शिक्षकांना प्रशिक्षणे लावण्यात आली आहेत. प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा ४ मार्च पासून सुरू होत असून तीन दिवस पुन्हा शिक्षक या ट्रेनिंग मध्ये गुंतले जाणार आहेत १० वीची परीक्षा १ मार्च पासून सुरू होत असून या परीक्षांचे पर्यवेक्षण कुणी करावे असा प्रश्न शिक्षकांसमोर पडला आहे.
त्यातच निवडणूक अधिकाऱ्यांकडून लोकसभा निवडणुकीसाठी शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या जात आहेत त्यासाठी मुख्याध्यापक यांच्या सभा घेतल्या जात आहेत त्यामुळे मुख्याध्यापक त्रस्त झाले असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.