
नांद्रा प्र.लो. येथे गाव पातळीवर शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
जामनेर : तालुक्यातील नांद्रा येथील प्रगतिशील शेतकरी दिवाकर पाटील यांच्या शेतात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत गाव पातळीवर शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. माती पुजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थान वि.का.सो. व्हा.चेअरमन धनसिंग पाटील यांनी स्वीकारले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकर पाटील यांनी केले. सदर कार्यशाळेमधे मंडळ कृषी अधिकारी सुभाष अहिरे यांनी नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून रासायनिक शेतीतील उत्पादीत शेतमालाचे शरीरावर होणारे अपाय तसेच राज्य पुरस्कृत कापूस उत्पादकता वाढ व मुल्य साखळी अभियान याविषयावर माहिती सांगितली. संग्रामसिंग राजपूत यांनी एस.आर.टी. तंत्रज्ञान, नैसर्गिक पद्धतीनुसार करावयाची शेती पध्दत तसेच जीवामृत – बिजामृत तयार करणे आणि महत्व विषद केले व याचे प्रात्यक्षिक करण्यात आले, डॉ. संदीप पाटील यांनी पशुधनातील व नैसर्गिक शेतीतील महत्वाचा घटक असेलल्या गाईचे संगोपन व महत्व याविषयावर माहिती दिली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदेखील केले. कृषी पर्यवेक्षक जी.पी.पाटील यानी कृषीविषयक शासनाच्या योजनाची माहिती देऊन शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन केले. त्याप्रमाणे राजूभाऊ यांनी नैसर्गिक शेतीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कृषी सहाय्यक आर.जी.निकम व ललीत राजपूत तसेच गाडेगाव, रोटवद व मोहाडी येथील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर एस.आर.टी. पध्दतीने लागवड केलेल्या पिक प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांनी भेट दिली व दिवाकर पाटील यांच्यासोबत संवादातून तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली. कार्यक्रमास नांद्रा येथील शेतकरी गटातील महिला सदस्य, तसेच वि.का.सो. चेअरमन धनसिंग पाटील, अविनाश वाघ, भरत बोरसे, पाणी फाऊंडेशनचे तुषार तायवाडे, मंगेश चव्हाण, नंदकिशोर पाटील, दीपक पाटील तसेच दिवाकर पाटील आदी मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आर.जी.निकम यांनी मानले.