
‘उत्तर मुंबई म्हणजे उत्तम मुंबई’ गोयल यांचे स्वप्न साकार करायचेय मेळाव्यात आ. प्रविण दरेकरांचे आवाहन
मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आपल्याकडे कार्यकर्त्यांची संख्या खूप आहे, निष्ठेचे कार्यकर्ते आहेत. मार्गदर्शन करणारी मातब्बर नेतेमंडळी आहे. योजना, विकास खूप आहे. फक्त बूथवर काम करण्याची गरज आहे. प्रत्येक बूथवर ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले तर महाराष्ट्रात सर्वाधिक प्रथम क्रमांकाचे मतदान केल्याशिवाय हा उत्तर मुंबईचा मतदार राहणार नाही आणि पियुष गोयल यांचे ‘उत्तर मुंबई म्हणजे उत्तम मुंबई’, हे स्वप्न आपल्याला अधिक गतीने साकार करायचे आहे, असे आवाहन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी उत्तर मुंबईतर्फे आयोजित केलेल्या लोकसभा चुनाव-२०२४ पदाधिकारी मेळाव्यात केले.
या मेळाव्याला मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबई निवडणूक प्रमुख आ. योगेश सागर, दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी, अंदमान-निकोबारचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, आ. भाई गिरकर, भाजपा सचिव संजय उपाध्याय, विनोद शेलार, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्यात मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, पियुष गोयल यांना संपूर्ण महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक मताधिक्क्याने विजयी करायचे असेल तर बूथ स्तरावर बूथ अध्यक्षांच्या, त्यांच्या वरील वॉरियर्सच्या माध्यमातून मतदार याद्यावर काम करून तेथील मतदान कसे वाढेल याची आपण चिंता, नियोजन करत नाही, अंमलबजावणीच्या दृष्टीने काम करत नाही तोपर्यंत अपेक्षित निकाल आपल्याला मिळणार नाही. आपल्या बाजू जमेच्या आहेत. पक्षाबाबत जनतेच्या मनात मोठा पक्ष म्हणून प्रतिमा चांगली आहे. देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते दहा वर्ष पंतप्रधान म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. त्यांच्या तोडीचा समोर पंतप्रधान पदाचा उमेदवार दिसत नाही. महत्वाचे म्हणजे प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी जी भाजपात आहे ती अन्य कुठल्याही पक्षाकडे दिसत नाही. वातावरण आपल्या बाजूने आहे, विरोधक कमकुवत आहे. आपल्याकडे विकासाचे मुद्दे आहेत हे जरी खरे असले आणि आपण आपल्या बूथवर जनतेशी संपर्क साधला नाही, मतदार यादीवर काम केले नाही, मतदार मतदानाच्या दिवशी घरी आहेत का? या सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईने अभ्यास करण्याची गरज असल्याचेही दरेकरांनी म्हटले.
दरेकर पुढे म्हणाले की, आपल्याला खऱ्या अर्थाने जनतेच्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोचायचे आहे. पियुष गोयल यांची प्रतिमा, व्यक्तिमत्व पक्षाच्या बूथ अध्यक्षाला सांगायची गरज नाही. परंतु त्या वॉर्डात असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधला जातोय का? याचा विचार करण्याची गरज आहे. त्यावर नियोजन करून काम करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पतसंस्था, विविध मंडळे, हमाल, घरेलू महिला कामगार, वृत्तपत्रविक्रेता, वॉचमन अशा प्रकारच्या घटकांना भेटून संवाद साधण्याची आवश्यकता आहे. जे आपल्या पक्षाचे सदस्य नाहीत त्यांच्याशी संपर्क साधून पियुष गोयल, मोदी सरकारचे काम सांगण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचेही दरेकर म्हणाले.
गोयल यांनी अडचणीच्या
काळात देशाला सावरले
दरेकर म्हणाले की, देशात जबाबदार केंद्रीय मंत्री म्हणून जी-जी खाती पियुष गोयल यांनी निभावली त्या खात्याच्या माध्यमातून अडचणीच्या काळात देशाला सावरण्याचे काम केले. कोरोनाच्या काळात पियुष गोयल अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री होते. त्यावेळी आपण गरिबांना जे अन्नधान्य देत होतो त्याचे सारे नियोजन, व्यवस्थापन करणारे केंद्रीय मंत्री हे आज आपले उमेदवार आहेत ज्यांनी कोरोना काळात लोकांना आधार दिला. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व योजनांना आकार देण्याचे काम पियुष गोयल यांनी केल्याचेही दरेकर म्हणाले.