
पुरोगामी महाराष्ट्र उभा करणे हे महाराष्ट्राला मोठे आव्हान!!!
भारतातील महाराष्ट्र राज्य एक कणखर राज्य आहे. अनेक महापुरुषांनी त्याच्या जडणघडणीत फार मोलाचे योगदान दिलेले आहे. अनेक परकिय सत्तेने ग्रासलेले हे राज्य गुलामीने पछाडलेले होते. अशा काळात आशेचे किरण उगवले ते राजे शिवबाच्या रुपात अन त्यांनी पिता शहाजी व माता जिजाऊ च्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्याची शपथ घेतली. कर्मकांडात अडकलेल्या महाराष्ट्राला जिजाऊच्या पुरोगामी व मातृसत्ताक पध्दतीने महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळाली. त्या काळात चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा कलंक शिवबाने स्वराज्य विरुद्ध कारस्थान करणाऱ्यांची हयगय केली नाही त्यांना शिक्षा केली.जातीभेद विरहित समाजाची रचना केली. स्वकिय लोकांना देखील शासन करुन त्याना कठोर शासन केले. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबविला.राजे शिवबा हिंदू सम्राट नव्हते तर सर्व जाती-धर्मातील लोकांचे राजे होते. हाच वारसा शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड,महात्मा फुले यांनी वैचारिक अधिस्थान देऊन चालविला. सत्यशोधक विचाराची रुजवण ह्या भुमीत झाली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेची लाट मनुस्मृती जाळुन व संविधान तयार करुन पलटवली. अशा ह्या पुर्वी मुंबई नावाच्या राज्यात स्वभाषीक चळवळ जी मराठी माणसाला जगवेल अशी संयुक्त महाराष्ट्र ची चळवळ उभी राहिली. ह्या चळवळीने महाराष्ट्र आम्हाला दिला.यासाठी श्रीपाद डांगे, प्र.के अत्रे, अण्णाभाऊ साठे, अमर शेख, दत्ता गव्हाणकर, एस.एम जोशी, जेधे, गायकवाड, नाना पाटील यांचे अथक योगदान लाभले. डावे विचारवंत, अकाँग्रेसी,समाजसेवक, साहित्यिक, गिरणी कामगार, शेतकरी, सामान्य नागरीक होते. निवडणुकीत संयुक्त समितीचे 155 उमेदवार निवडुन आल्याने काँग्रेस ला निर्णय घ्यावा लागला. मुंबई आम्हाला राजधानी म्हणून मिळाली. ह्या महाराष्ट्र निर्माण करण्यात 107 लोकांचे बलिदान द्यावे लागले. पंतप्रधान पंडित नेहरूनी राजगृहात संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. 1 मे 1960 हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून जाहिर झाला. तरीही काही बेळगाव, डांग यासारखे भाग राहून गेले. याची आठवण अण्णाभाऊ साठेंनी माझी मैना गावाकडे राहिली ह्या गीताने करुन दिली. असा हा खडतर, कणखर महाराष्ट्र आज जातीयतेच्या प्रभावाने पिंजला गेला आहे. राजकारणात नैतिकता राहिली नाही. भविष्यात सामान्य लोकांसाठी राजकारणाचे दरवाजे कायमचे बंद झाले. ज्याच्याकडे साम, दाम, दंड, भेद असणारा निवडुन येतो.कुठलाही पैशाच्या वाटपावर शासनाचे नियंत्रण नाही. सामान्य लोकांना समजते की पैसा वाटप होतो. तरी निवडणूक यंत्रणेला मागमूस लागत नाही ही आश्चर्याची बाब आहे. भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे. बऱ्याच अधिकाऱ्याला बेहिशोबी पैसा मिळतो. त्यात तो कित्येक पिढयांची कमाई करुन घेतो. पकडला गेला तरी वाचविणारी यंत्रणा त्याच्याकडून आहेच. काही महाभाग तुरुंगातून निवडून येतात. स्त्री ला तर भोगवादी नजरेने पाहिले जाते. स्त्रीवर बलात्कार, अत्याचार झाला नाही असा एक दिवस जात नाही. राजकारणात एकाच नेत्यांच्या पिढयानपिढया पुढे चालु आहे. भ्रष्टाचाराने न्हाऊन झालेले नेते स्वार्थासाठी माकडउडया मारित आहे. ह्या महाराष्ट्रात गलिच्छ आरोप, शिवराळ भाषा सर्रास बोलली जाते. सामान्य माणूस ही त्यात शिकलेला सुध्दा 500 ते 1000 च्या नोटेने विकला जातो. कर्मकांडाची तर हद्दच झाली. शिकलेला समाज यात जास्त प्रमाणात गुंतलेला आहे. मीडीया एखादया पक्षाच्या दावणीला बांधला गेला आहे. महाराष्ट्रात काय वाईट चालले आहे त्यावर मीडिया मौन धरतो. सत्यशोधकाच्या महाराष्ट्रात खोटेपणाला किंमत मिळत आहे. एका वरचड जात दुसऱ्या जातीवर अन्याय करते. वैज्ञानिक दृष्टी वर कात चढली आहे. एका धर्माची सर्वांवर सत्ता यावी यासाठी अट्टाहास केला जात आहे. शिक्षणातून ज्ञान मिळत आहे परंतू संस्कार नाही. महात्मा फुलेंचा सत्यशोधक विचार मागे पडत आहे. अशा महाराष्ट्राला पुरोगामीत्व प्राप्त होण्याची गरज आहे अन्यथा येथील महापुरुषांचे योगदान वाया जाईल.
पत्रकार
एस.एच. भवरे