“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार”
प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिला होणार सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत अथवा गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त दरवर्षी ३१ मे रोजी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ (नारळ), रोख रक्कम (रु. ५००/- प्रती महिला) असे पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर दोन कर्तबगार महिलांची निवड करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, पोलिस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. ज्या ग्राम पंचायतीमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी यांचा कार्यकाल समाप्त झालेला असेल/ ग्रामपंचायत बरखास्त झालेली असेल, अशा ठिकाणी प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. इच्छुक महिलांनी स्वतःची वैयक्तिक माहिती व केलेल्या कार्याच्या तपशिलासह संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. जेणेकरून आलेल्या अर्जामधून पुरस्कार निवड करण्यात येईल.
असे आहेत पात्रता निकष
-महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट, उल्लेखनिय कार्य करीत असलेल्या महिला
-सदर महिला हया त्याच ग्रामपंचायतीतील/गट ग्रामपंचायतीतील रहिवासी असावी.
- त्याचे कार्य हे त्याच ग्रामपंचायती / गट ग्रामपंचायतीमध्ये केलेले असावे,
-महिला व बाल विकास क्षेत्रात किमान ३ वर्ष कार्य केलेले असावे,
-पुरस्कार प्राप्त महिला या सात वर्षानंतर सदर पुरस्कारासाठी पुन्हा पात्र ठरतील,
-महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलता असावी. सामाजिक क्षेत्रात सक्रीय सहभाग असावा,
-महिला अत्याचारामध्ये समाविष्ट नसावी.
-बाल विवाह प्रतिबंध, हुंडा निमुर्लन, लिंग चिकीत्सा प्रतिबंध घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार या सारख्या कार्यामध्ये उत्स्फुर्तपणे पुढाकार घेतलेला असावा.
कोट
अध्यादेशाची जिल्हाभरात प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी अमळनेर तालुका धनगर समाजाने केली आहे
मागिल वर्षी 241 महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन अमळनेर तालुक्यात सन्मानित करण्यात आले होते. यावर्षी देखील त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा.
खऱ्या अर्थाने कर्तबगार महिलांचा सन्मान होतो, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
सामाजिक कार्यकर्ता
डी ए धनगर सर
माजी जिल्हाध्यक्ष धनगर समाज कर्मचारी संघटना जळगाव
-डी ए धनगर (अमळनेर)
माजी जिल्हाध्यक्ष धनगर समाज कर्मचारी संघटना, जळगांव