• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

भावविश्व व अनुभवविश्वाचे अद्वैत यामुळे जयश्री काळवीट यांच्या कवितेचा दर्जा उच्चतम

Jun 20, 2024

Loading

भावविश्व व अनुभवविश्वाचे अद्वैत यामुळे जयश्री काळवीट यांच्या कवितेचा दर्जा उच्चतम

ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते ‘ कवितेच्या गहिऱ्या डोही ‘ काव्य संग्रहाचे प्रकाशन व जिल्ह्यातील पाहिले अभिनव बालकविंचे थाटात काव्यसंमेलन
” भावविश्व व अनुभवविश्वाचे अद्वैत यामुळे जयश्री काळवीट यांच्या कवितेचा दर्जा उच्चत्तम आहे.निसर्गानुभुती व संस्कार यामुळे कविता वाचकांना अंतर्मुख करते. शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिकदृष्टया ‘ कवितेच्या गहिऱ्या डोही ‘ काव्यसंग्रह अनुभवसमृद्ध आहे.”असे प्रतिपादन बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी केले.
कवयित्री जयश्री काळवीट यांच्या ‘ कवितेच्या गहिऱ्या डोही ‘ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व निमंत्रितांचे कवी संमेलन सोमवार १७ जून २०२४ रोजी भुसावळ येथे ब्राह्मण संघ सभागृहात उत्साहात संपन्न झाले.त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना डॉ.जगदीश पाटील बोलत होते.काव्यसंग्रहाचे प्रकाशन माननीय शशिकांत हिंगोणेकर (माजी विभागीय सचिव म.रा.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,लातूर ) यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी डॉ. चारुता गोखले मॅडम (निवृत्त मराठी विभाग प्रमुख मु.जे. महाविद्यालय,जळगाव ) असून विशेष उपस्थिती निवृत्त उपप्राचार्य वा.ना.आंधळे ( सुप्रसिद्ध साहित्यिक एरंडोल ) यांची असून प्रमुख अतिथी प्रा.संध्या महाजन (जळगाव ) व डॉ.जगदीश पाटील ( भुसावळ ),रेल्वेचे सेवा निवृत्त लोको पायलट प्रसाद काळवीट व कवयित्री जयश्री काळवीट व्यासपीठावर उपस्थित होते.प्रकाशनानंतर मार्गदर्शन करताना शशिकांत हिंगोणेकर म्हणाले की , ‘ आत्मशोधातून काव्यरचना करतांना कवी आपल्या संवेदनशील मनातून सभोवतालचे जगही टिपतो.जयश्री काळवीट यांची कविता आत्मशोध व सभोवतालचे अभिव्यक्ती मांडणारी आहे.त्यांच्या कवितेचे मुख्य सूत्र आशयगर्भ कविता असून काव्यसंग्रहातून त्यांच्या संवेदनशील मनाचे प्रतिबिंब उमटले आहे .” गहिऱ्या डोही या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कवितेच्या गहिऱ्या डोही या काव्यसंग्रह लेखनामागची भूमिका कवयित्री जयश्री काळवीट यांनी प्रास्ताविकात मांडली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते काव्यसंग्रह प्रकाशन करण्यात आले.प्रा.डॉ. वा.ना.आंधळे यांनी आपल्या मनोगतातून कवयित्री जयश्री काळवीट यांच्या काव्यसंग्रहाचा सर्वांगसुंदर आढावा घेतला. काव्यसंग्रहातील कविता, त्यातील भावसौंदर्य, विचार , प्रतिमा, प्रतीके, रूपके यांचा चपखलपणे केलेला वापर यासंदर्भात मुद्देसूद व कवितांची उदाहरणे देऊन काव्यसंग्रहाची वाङ्ममयीन मूल्ये कथन केले. कविता आत्मशोधातून आत्मबोधाकडे जाणाऱ्या असल्याचेही आंधळेंनी सांगितले.प्रा.सौ.संध्या महाजन म्हणाल्या की, ‘ जयश्री काळवीट यांच्या कवितांमध्ये स्त्रीचे दुःख आले असले तरी त्याचे रडगाणे त्यांनी गायलेले नाही. महिलांच्या आयुष्यात येणारे विविध प्रसंग व त्यावर करायची मात आणि त्यातून प्रतिभाशक्तीने केलेली काव्यनिर्मिती हे कवीमनाचे उत्तम लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ.चारूता गोखले यांनी जयश्री काळवीट यांच्या काव्यामधील विविध कंगोरे आणि सौंदर्य याविषयी सांगून त्यांच्या कविता अनुभवांच्या काठावर घासून निर्माण झाल्या आहेत. स्त्रीच्या जीवनात येणारे प्रसंग व घटना यांच्याकडे पाहण्याचे संवेदनशील मन कवयित्री जयश्री काळवीट यांच्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कवयित्री संध्या भोळे यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडले. त्यात आम्ही सिद्ध लेखिका गृपच्या कवयित्रींसह राज्यभरातील कवींचा समावेश होता. त्यानंतर कवयित्री जयश्री काळवीट यांच्या सांगवी खुर्द जि.प.शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे देखील बालकवी संमेलन वैभव भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन आशा साळुंखे यांनी केले.काव्यसंमेलन व काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याला राज्यातील रसिक श्रोत्यांची व आप्तेष्टांसह, सुजाण विद्यार्थी पालकांची भरगच्च उपस्थिती असल्याने कार्यक्रम ऐतिहासिक व संस्मरणीय झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *