
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त-
“आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज”
19 व्या शतकाची सुरुवात सत्यशोधक समाज व्यवस्थेच्या छत्र छाये खाली सुरू झाली. न्याय, समता, बंधुता,चे स्वप्न पाहणे या समाजाने सुरू केले. अशा वेळी जाती- व्यवस्थेचा विनाश होत नाही तोपर्यंत सामाजिक न्याय ,समता प्राप्त होणार नाही .हा विचार घेऊन येणारे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26/6/ 1874 रोजी झाला. त्यांचे जन्म नाव यशवंत होते .कागलचे आप्पासाहेब घाडगे यांचे ते सुपुत्र !
परंतु सुदैवाने त्यांना दत्तक घेण्यात आले .छत्रपतींची गादी त्यानां मिळाली.
ते कोल्हापूर संस्थानचे राजे झालेत.
राजा तो राजाच असतो .परंतु या राजाने लोकशाही व्यवस्थेचे स्वप्न पाहिले .आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी विचाराला नीतीची जोड देऊन कृतीची सुद्धा साथ मिळवली.
एवढे महान कार्य करीत असताना सुद्धा सर्वसामान्यांचे कैवारी होणं किती त्रासदायक असतं याचा अनुभवही त्यांना आला.त्या काळातील जाती व्यवस्थेचे चटके किती खोलवर असतात याचा अनुभव रोजच्या दैनंदिन जीवनात ते घेत होते .
“राजा “म्हणून दरबारात काम करीत असताना सर्व समाज व्यवस्था कशी दुर्दैवाच्या ,अज्ञानाच्या, अंधश्रद्धेच्या देवभोळेपणाच्या चक्रात पिळली जात आहे ? समाज जीवनात एकाच वर्गाचे कसे वर्चस्व स्थापित झाले आहे ? जाती व्यवस्थेचे चटके, शूद्र -अति शूद्र यांना होणारा त्रास पाहून त्यांचे अंतःर्मन तळमळत असे.
अशातच त्या काळात त्यांच्या दरबारात गंगाराम कांबळे नावाचा एक शूद्र कामगार होता. त्याला तिथले सनातनी खूपच त्रास देऊ लागले .तेव्हा त्यांनी गंगाराम कांबळेला आर्थिक मदत करून एक चहा पाणी चे हॉटेल काढून दिले. नुसते एवढं करून ते थांबले नाहीत तर त्याच्या चहाच्या हॉटेलमध्ये जाऊन ते चहा पिले. आज ही गोष्ट काही विशेष वाटत नाही .परंतु जेव्हा जातीव्यवस्था ही चरम व्यवस्थेवर होती .त्या काळात हे खूप विशेष होते.
” एक राजा एक शुद्राच्या चहाच्या हॉटेलवर जाऊन चहा पितो..?”
ही खरंतर खूप मोठी बातमी त्या काळात होती. परंतु ते खरे छत्रपती होते .छत्रपती शिवरायांच्या वारसा चालवणारे ते खरे वारसदार होते. ते त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले होते . त्यांनी प्रत्येक कृती समाजाला जाणीवपूर्वक दाखविली. आज आपण त्यांची जयंती साजरी करतो. सामाजिक न्याय विषयी बोलतो. परंतु त्यांचे विचार त्यांचे आचरण आजचे नेते कृतीतून आणू शकत नाहीत .आपण फक्त त्यांची जयंती साजरी करून मोकळे होत असतो.हे या समाजाचे खरं दुर्दैव आहे ..!
नवीन भारत बनवण्याच्या वाटा ते घेत असतात परंतु जातीव्यवस्थेवर ते मौन असतात. नवीन भारत बनविण्याच्या बाता करणे सोपं असते. परंतु सामाजिक समतेचा वाटा देणे हे कठीण असते.
छत्रपतीं शाहू महाराजांनी सन १९१२ प्राथमिक शिक्षण हे कंपल्सरी केले .तसेच विनामूल्य केले .त्यामुळेच ते आधुनिक भारताच्या विकासाचा पाया घालणारे सामाजिक पिलर ठरले.
शेकडो वर्षाच्या जाती व्यवस्थेमध्ये पूर्वी ,”माणूस आणि देव यामधला पुरोहित नावाचा दलाल आम्हाला मान्य नाही .’असं महात्मा फुलेंनी ठणकावून सांगितले .
-परंतु त्याच वेळेस महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये मध्यस्थ म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी खूप मोठे काम केले . त्यांच्यामुळेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आम्हाला लाभले. आणि त्यामुळेच आधुनिक भारताच्या पाया घालण्यात त्यांचे योगदान हे न्याय ,समता ,शिक्षा रोजगार ,शाळा, दवाखाने ,मजूर, शेतकरी यांचे विचार समाज जीवनाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले.
आपले कोण आणि परके कोण ..? हे त्यांनी समाजाला दाखवून दिले .
आज जरी भारताच्या पंतप्रधान या पदावर चहा विकणारी व्यक्ती ,श्री नरेंद्र मोदी बसले असले तरी आणि हे “सत्य” असलं तरी शंभर वर्षांपूर्वी गंगाराम कांबळे या शुद्राच्या हॉटेलमध्ये छत्रपती शाहू महाराज चहा पीत होते हे त्यामागील “पूर्ण सत्य” आहे. याची जाणीव आजच्या समाजाने ,आजच्या राजकीय शक्तींनी ठेवली पाहिजे .
म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक, समतेचे ,न्याय व्यवस्थेचे विचार हे समाज माध्यमाच्या तळागाळात पोचविले पाहिजे. तरच आम्ही त्यांचे अनुयायी आहोत हे आम्हाला सिद्ध करता येईल..!
गोकुळ बागूल
अमळनेर.
मो. 9422276140
.