• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मराठा आणि ओबीसी मध्ये दंगली घडवण्याचा राज्यकर्त्यांचा डाव. डॉ. उमेश बगाडे यांचे वक्तव्य ‘मराठा विरुद्ध ओबीसी: प्रस्थापितांचे राजकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन

Jul 16, 2024

Loading

मराठा आणि ओबीसी मध्ये दंगली घडवण्याचा राज्यकर्त्यांचा डाव.
डॉ. उमेश बगाडे यांचे वक्तव्य
‘मराठा विरुद्ध ओबीसी: प्रस्थापितांचे राजकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर दि.१६

मराठा आरक्षणावरून ज्या प्रकारचे वक्तव्य आणि भाषणं होत आहेत त्यावरून राज्यकर्त्यांना मराठा आणि ओबीसींमध्ये दंगली घडून आणायच्यात की काय अशी शंका येत असल्याचे खळबळजनक वक्तव्य ख्यातनाम विचारवंत प्रा. डॉ. उमेश बगाडे यांनी केले.

‘मराठा विरुद्ध ओबीसी: प्रस्थापितांचे राजकारण’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते संभाजीनगर येथे बोलत होते. यावेळी जेष्ठ साहित्यिक प्रल्हाद लुलेकर, माध्यमतज्ज्ञ डॉ. जयदेव डोळे, सामाजिक कार्यकर्ते अंबादास रगडे, पुस्तकाचे संपादक प्रभाकर गायकवाड आणि प्रा. सुदाम चिंचाणे यांची उपस्थिती होती.

सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून आंदोलन छेडले आहे. हे आंदोलन द्वेषावर का पोसले जात आहे आणि ओबीसींना भडकवण्याची भाषा का केली जात आहे, यामागे कोणती शक्ती कार्यरत आहे असे अनेक प्रश्न उभे करून बगाडे यांनी आरक्षणावरुन पेटलेल्या मराठा आणि ओबीसी संघर्षाचा परामर्श घेतला. महाराष्ट्रातील कुणबी मराठा शेतकरी जातींमध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. धर्मभोळेपणा, अक्षर भोळेपणा, व्यवहारभोळेपणा आणि अवलंबितता या कारणामुळे ग्रामीण भागात कुणबी मराठ्यांचे सामाजिक आणि आर्थिक शोषण होत आहे हे मान्य करायला हवे. त्यामुळे मराठ्यांनी शूद्र असण्याच्या किंवा शोषित असण्याच्या भूमिकेतून जर आरक्षणाची मागणी केली तर ती आरक्षणाच्या सामाजिक न्यायाच्या तत्वाच्या विरोधात नाही. परंतु जरांगे पाटील हे शूद्र मराठ्यांची बाजू घेऊन लढत नाहीत तर ते वर्चस्वशाली राजकारणाची भूमिका म्हणून बोलत आहेत. जरांगे यांची भूमिका जातीव्यवस्था आणि ब्राह्मणवादाला खतपाणी घालणारी आहे. ते मराठ्यांना संघटित करण्यासाठी ओबीसी विरोधात द्वेष पसरवित आहेत. द्वेषाचा आकृतीबंध हा ब्राह्मणवादाचा आणि जातीव्यवस्थेचा मूळ पाया असल्याचे डॉ .उमेश बगाडे यावेळी म्हणाले.
आरक्षणाचा मुलाधार हे सामाजिक न्यायाचे तत्व आहे. समाजातील विषमता नष्ट करून समाजातील सर्व घटकांना नोकऱ्यांमध्ये आणि सत्तेमध्ये प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आरक्षणाची तरतूद राज्यघटनेमध्ये करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या समस्याची सोडवणूक करण्यासाठी सरकारने जाती आधारे जनगणना करून जो सामाजिक न्यायाचा मुद्दा पुढे न्यावा असे आवाहन बगाडे यांनी या ग्रंथाचा हवाला देऊन केले आहे.
यावेळी ज्येष्ठ माध्यमतज्ञ व विचारवंत डॉ. जयदेव डोळे आणि प्रख्यात साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुलेकर, अंबादास रगडे यांनीही आपली भूमिका मांडली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुदाम चिंचणे यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रभाकर गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed