जळगावात राज्यस्तरीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन होणार.
जळगाव जिल्ह्यातील संविधान वाचक आणि संविधान प्रेमी नागरिक तसेच पुरोगामी विचारधारा जोपासणाऱ्या साहित्यिक, विचारवंत, चळवळीतील नेते, कार्यकर्ते यांनी एकत्र येत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन राज्यस्तरीय संविधान साहित्य संमेलनाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी डॉ. मिलिंद बागुल यांनी भारतीय संविधानाची मूल्य जनमानसामध्ये रुजविण्यासाठी अशा संमेलनाची आवश्यकता असून नागरिकांमध्ये संविधानासंदर्भात जागरूकता येत त्याचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार करण्यासाठी संमेलनातून एक नवा विचार दिला जाईल यासाठी आयोजनाचा विचार हा महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.
ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी संविधान संमेलनाच्या आयोजनात सर्व समावेशकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहून संमेलन यशस्वी करण्यासाठीचे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतात मुकुंद सपकाळे यांनी सद्य परिस्थितीत भारतीय संविधान सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनासाठी, सोबतच देशातल्या श्रीमंतांसाठी सुद्धा अत्यंतिक महत्वाचे असून अशा संमेलनांच्या माध्यमातून समाजमनात स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची विचारधारा जोपासण्याचे कार्य करता येईल यासाठी हे संमेलन आयोजनामागचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला.
संविधान संमेलनाच्या संदर्भात आयोजितलेल्या बैठकीत विजयकुमार मौर्य, प्रतिभा शिरसाठ, दिलीप सपकाळे, गोपाल पाचवणे, महेंद्र केदारे, चंदन बिऱ्हाडे, रमेश बहारे, यांनी चर्चेत सहभागी होवून संमेलना संदर्भात आपापले विचार मांडले. बैठकीचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभार भाऊराव इंगळे यांनी मानलेत.