आद्य शिवशाहीर – साहित्यसम्राट – सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती विशेष
जन्म : १ ऑगस्ट, १९२०
मृत्यू : १८ जुलै, १९६९
” ये आजादी झुठी है देश की जनता भुकी है ” अशी सिंहगर्जना करणारे, भारतातील थोर समाज सुधारक, सत्यशोधक, लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वारणेच्या खोऱ्यात वाटेगाव येथे १ ऑगस्ट, १९२० झाला. वडिलांचे नाव भाऊराव सिधोजी साठे व आईचे नाव वालूबाई होते. अण्णा भाऊंचे नाव तुकाराम असे ठेवण्यात आले. त्याच वेळी फकीराने इंग्रजांचा खजिना लुटलेला होता. खजिन्याची लूट गावात वाटली जात होती. भाऊराव साठेच्या दारात उभा राहून फकीरानं आवाज दिला. तुकारामच्या जन्माची आनंद वार्ता फकीरास समजली. दोन ओंजळी सुरती रूपये अक्कांच्या ओंजळीत टाकून “बाळ व बाळंतीनीची काळजी घ्या.” असं सांगून घोड्याला टाच मारली. भाऊराव व वालूबाई यांना पाच अपत्य होते. त्यातली चार वाचली. तुकाराम, भागूबाई , शंकर, जाई या सर्व भावंडात तुकाराम सर्वांत मोठा म्हणून त्यास अण्णा म्हटले जाऊ लागले. तुकाराम बालपणापासून खोडकर व कुशाग्र बुद्धीमत्तेचा होता व निरीक्षण शक्ती अफाट होती.
भाऊराव साठे यांनी मुलास शाळेत दाखल केले. पहिल्याच दिवशी तुकारामास जातियतेचा अनुवभ आला. ब्राह्मणांची मुलं मराठ्यांच्या मुलांनासुद्धा स्पर्श करत नव्हती. १९ व्या शतकातील ग्रँड डफ या इतिहासकाराने असा उल्लेख केला आहे की, महाराष्ट्रातील ब्राह्मणवर्ग मराठा समाजास जनावरांपेक्षा थोडी जास्त किंमत देतो. शाळेत ब्राह्मण मास्तर होते. शाळेत दुसऱ्याच दिवशी अक्षरे काढता येत नाहीत म्हणून मास्तरांनी अण्णाभाऊंचा हात जमिनीवर ठेवला व त्यावर छडीने बेदम मार दिला. शिक्षेचा अमानुष प्रकार घडला. अण्णाभाऊंनी मास्तराचं डोकं फोडलं नी अण्णाभाऊंची शाळा सुटली ती कायमचीच. वाटेगावात ओला दुष्काळ पडला होता. भाऊराव साठेंनी आपल्या लहान मुलांना घेऊन मुंबईची वाट धरली. त्यावेळी अण्णाभाऊंचं वय होतं बारा वर्षांचं. डोक्यावर गाठोडे घेऊन ही मुलं पायी चालत होती. २२७ मैलाचं अंतर पायी चालून पूर्ण केले. ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे आल्यावर अण्णाभाऊंनी हमालीचं काम सुरू केलं. या सोबतच डोअर किपर, हॉटेल बॉय, घराची साफसफाई करणे, बूट पॉलिश करणे, कुत्रा सांभाळणे, बागकाम, इलेक्ट्रिक तारा ओढणारा मजूर इत्यादी कामे बालपणी पोटाची खळगी भरण्यासाठी करावी लागली.
कापडमीलमध्ये काम करत असतांना जगासाठी वस्त्र विणणाऱ्या कामगारांना स्वतःचेच अंग झाकायला कपडे का मिळत नाहीत ? हा प्रश्न त्यांना पडे. टोलेजंग इमारती बांधणाऱ्यांना झोपडीत का रहावं लागतं ? पृथ्वीवरील सर्व लेकरे देवाचीच असताना ही शिवाशिव कशी ? प्राण्यांना देव मानलं जातं पण माणसांचा स्पर्श का चालत नाही, असे अनेक प्रश्न त्यांना सतावत होते. इ.स.१९३४ च्या दरम्यान रशियन राज्यक्रांतीचा इतिहास कॉम्रेड लेनिनचे चरित्र ही पुस्तके मिळवून अण्णाभाऊंनी वाचून काढली. अण्णाभाऊ हे सत्याचा शोध घेणारे होते त्यामुळे भारतातील थोर समाज सुधारक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले, आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महान विचारांचा प्रभाव त्यांच्या अंतःकरणावर पडला. अण्णाभाऊ पेटी, तबला, ढोलकी, बुलबुलतरंग, सारंगी अशी सर्वच वाद्य वाजवण्यात तरबेज होते. तलवारबाजी, कुऱ्हाड, दांडपट्टा ही हत्यारे ते कौशल्याने चालवत. क्रांतीसिंह नानासाहेब पाटील यांचं स्फुर्तीदायी भाषण ऐकूण अण्णाभाऊंनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली होती. मुंबईतील कामगार वर्गाच्या संपर्कामुळं वयाच्या पंधरा-सोळा वर्षांपासूनच अण्णाभाऊ कामगार चळवळीत सहभागी झाले.
कार्ल मार्क्सचे तत्वज्ञान वाचून ते कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. इ.स. १९३५ ला अण्णाभाऊंनी साहित्य निर्मितीला सुरूवात केली. अण्णाभाऊंना चित्रपटाचं विशेष आकर्षण होतं. चित्रपट सुरू झाला की, कलाकारांची नावे येत असत ती मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेत असायची. शेजारील माणसे ती मोठ्याने वाचायची. त्याच पाट्या, नावे पाहून अण्णाभाऊ गुजराती शिकले. इ.स. १९३७ ला त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला. मजुरांना तो खूप आवडला. १९३८ ला भाऊरावांचे निधन झाल्यावर कुटुंबाची सर्व जबाबदारी अण्णाभाऊंवर आली. इ.स. १९३९ मध्ये अण्णाभाऊ गावाकडे आले. तेथे कोंडाबाई सोबत त्यांचा विवाह संपन्न झाला.
१९४२ च्या चलेजाव आंदोलनातही अण्णाभाऊंनी सहभाग घेतला. इ.स. १९४३ ला त्यांना पुण्याला काम मिळालं. या ठिकाणी जयवंताबाई नावाच्या महिलेशी त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. इ.स. १९४४ मध्ये अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर यांनी लाल बावटा पथकाची स्थापना केली. बापू साठे यांच्यासोबत ते तमाशात काम करू लागले. अण्णाभाऊ हे प्रतिभावान शाहीर होते. त्यांचा मूळ पिंड शाहिरीचा होता. लोक रंजनातून जनजागृती लोकशिक्षण ही शाहिराचे काम असते हेच कार्य ‘शाहीराचे सरताज ‘ अण्णाभाऊंनी मोठ्या जोमाने केले. अण्णाभाऊंनी जुन्या पारंपारिक चालेल स्वीकारल्या पण आपल्या रचनेत सामाजिक विषमता, जनसामान्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार, महागाई, देशाभिमान या विषयांना प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांची शायरी गीते भावली. अण्णाभाऊंचे महाराष्ट्रावर निस्सीम प्रेम होते ते सहज म्हणतात, “महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ” हा महाराष्ट्र शासनकर्त्या वीरांचा, कष्टकरी श्रमिकांचा, संतांचा आहे. अण्णाभाऊंनी “महाराष्ट्राची परंपरा ” नावाचा पोवाडा लिहिला. अण्णाभाऊंचे महाराष्ट्र गीत त्याकाळी अनेक कलापथकातून मिळण्यातून गायले जायचे. ” माझी मैना गावावर राहिली ” ही लावणी देश प्रेमाची आहे. संयुक्त महाराष्ट्राची आहे. कामगार कष्टकरी मराठी माणसांनी लढ्यात स्वतःला झोकून दिले आणि हुतात्मे पत्करले त्याची कहाणी आहे. बर्लिनचा पोवाडा, बंगालची हाक, पंजाब – दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, अमळनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळा बाजाराचा पोवाडा या दहा पोवाड्यांशिवाय अण्णांनी शेकडो गीते पदे रचली. “अमळनेरचे अमर हुतात्मे ” आणि “मुंबईचा गिरणी कामगार ” हे दोन पोवाडे महाराष्ट्रातील साम्यवादी लढ्याचे आणि परंपरेचे दर्शन घडविणारे पोवाडे आहेत. शाहीर अमर शेख म्हणतात, शाहिरी जीवन हा महाराष्ट्राला लिहिलेला अनमोल नजरांना अण्णाभाऊंनी सार्थकी लावला.
महापुरूषांवर आधारित अनेक पुस्तके त्यांनी वाचून काढली. इ.स. १९४५ मध्ये अण्णाभाऊंची पहिली कादंबरी चित्रा रशियात प्रकाशित झाली. पुढे अण्णाभाऊंनी वारणेच्या खोऱ्यात, मास्तर, वारणेचा वाघ, फकिरा,अग्निदिव्य, चंदन, चिखलातील कमळ, टिळा लाविते मी रक्ताचा, वैजंता, रत्ना, रानगंगा, आघात, गुलाम, मयुरा, मूर्ती, माकडीचा माळ, अलगुज अशा कितीतरी कादंबऱ्या लिहिल्या. असंख्य कथा लिहिल्या. पोवाड्यांची रचना केली. वगनाट्य, नाटके, प्रवासवर्णन, चित्रपट कथा, यासंबंधी देखील अण्णाभाऊ साठेंनी लिखान केले. अगणित कृषीगीते, गवळणी, लावणी, भीमगिते इत्यादींची रचना केली. इ.स. १९५० ते १९५६ च्या कालावधीमध्ये अण्णाभाऊ साहित्यक्षेत्रात अतिउच्च शिखरावर जाऊन बसले होते.
१५ ऑगस्ट, १९४७ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि ‘ १६ ऑगस्ट ऑगस्टला मुंबईला वीस हजार लोकांचा भर पावसात मोर्चा काढतात आणि अण्णाभाऊ सिंहगर्जना करतात ” ये आजादी झुटी है देश की जनता भुकी है. ” एक सच्चा समाजसेवक म्हणून अण्णाभाऊंनी परिवर्तनाची फार मोठी चळवळ उभी केली. अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या “फकिरा ” या कादंबरीस महाराष्ट्र सरकारने प्रथम पारितोषिक देवून अण्णाभाऊंचा गौरव केला. इ.स. १९६१ ला अण्णाभाऊंनी रशियाला प्रयाण केले. ताश्कंद, लेनिनग्राड, मॉस्को, स्टॅलिनग्राड इत्यादी शहरांना भेटी दिल्या. रशियाला छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून दिली. अण्णाभाऊ नेहमीच उपेक्षित माणसांच्या बाजूने उभे राहिले. अण्णाभाऊंनी स्वातंत्र्य म्हणजे काय ? स्वातंत्र्य कशासाठी हवे ? याची स्पष्टता करणारे विपुल साहित्य निर्माण केले. मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद याचा विलक्षण प्रभाव अण्णाभाऊंवर होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, जातीयंताचा लढा ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची चतु : सूत्री होती. १९५६ नंतर अण्णाभाऊ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक आंदोलनाकडे झुकू लागले होते. डॉ.बाबासाहेबांचा गौरव करताना अण्णाभाऊ म्हणतात, ” जग बदल घालूनी घाव हे सांगून गेले मला भीमराव ” हे प्रसिद्ध गीत या गोष्टीची साक्ष आहे.
अण्णाभाऊ साठे हे एक समाज सुधारक, लोककवी आणि अपेक्षितांचे लेखक होते. एका अस्पृश्य मातंग समाजात जन्मलेले एक दलित व्यक्ती होते आणि आपल्या साहित्यातून जीवनानुभावासोबत समतेची, विश्वबंधुत्वाची मांडणी करून शोषित, वंचित, दलित, पीडित वर्गाच्या दुःखाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी साहित्यात ग्रामीण आणि दलित साहित्याची एकाच वेळी भर टाकणारे अण्णाभाऊ हे एकमेव साहित्यिक होते. मराठी साहित्य विश्वात साहित्यसम्राट म्हणून त्यांचा उल्लेख विशेषत्वाने केला जातो. अशा या सत्याचा शोध घेणारा नाटककार, कादंबरीकार, लोकनाट्याचे जनक, यशस्वी शाहीर, उत्कृष्ट कथाकार, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले. अशा या महामानवास कोटी कोटी वंदन !…
मा.पी डी पाटील सर
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव.जि.जळगांव