अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे जागतिक आश्चर्य – प्रा.डॉ.राहुल निकम
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे निव्वळ दीड दिवस शाळेत गेलेल्या माणसाने निर्माण केलेली अद्भुत कलाकृती असून ते जागतिक स्तरावरील एक आश्चर्य आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा सामान्य श्रमजीवी, कष्टकरी माणूस असून तो उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहत असतो. अण्णाभाऊंचे साहित्यात शृंगार नसला तरी अंगार मात्र निश्चित आहे. सर्वसामान्य माणसात ऊर्जा आणि चैतन्य निर्माण करणारे हे साहित्य असून ही जगातील 27 भाषांमध्ये भाषांतरित झालेले आहे. अण्णाभाऊंनी जवळजवळ 97 साहित्य कृती निर्माण केलेल्या आहेत. निरीक्षण, चिंतन, श्रवण आणि त्यांनी स्वतः जगेलल आयुष्य याचा आधार घेऊन साहित्याची निर्मिती झाली आहे. पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना रशियापर्यंत नेण्याचे पवित्र कार्य अण्णाभाऊंनी केलेले आहे असे मत प्रा डॉ राहुल निकम यांनी व्यक्त केले.
शारदा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय कळमसरे तालुका अमळनेर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वक्ते म्हणून ते बोलत होते. युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर यांच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांचे जयंती दिनाच्या दिवशी एकाच वेळी विविध ठिकाणी दोनशे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव हे होते. विचार पिठावर शाळेचे माजी मुख्याध्यापक किसन दादा,विकास महाजन, सोपान भवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले. शाळेतील शिक्षक राठोड यांनी आपल्या बुलंद आवाजात अण्णाभाऊ साठे यांनी गायलेला छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
विकास महाजन यांनी थोडक्यात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा परिचय सर्वांना करून दिला.
यावेळी शाळेतील आर. सी.बडगुजर, आर. डी. चौधरी,पी.बी.क्षीरसागर,आर. आय. सुर्यवंशी ,मुकेश सोनकुसरे,एन. डी. षाटील,एम. आर. तडवी डी. टी. टाक, के. जे सोनवणे, एस. व्ही. गर्जे कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.