काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा मत्सरच केला,भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा घणाघात
मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसला विचारसरणी सुधारण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे. यावरून भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी हळूहळू का होईना काँग्रेसचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानायला लागलेत. सावरकरांचा व्यापक विचार स्वीकारायला लागलेत. त्यातूनच काँग्रेस नेतृत्वाला शहाणपण आले तर ठीक. सावरकर द्वेष्टे असणारे गांधी परिवार, काँग्रेस सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखी भुमिका घेतील असे वाटत नाही. काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा द्वेष, अवहेलना, मत्सरच केलाय, असा घणाघात केला.
दिवाळी दरम्यान लाडक्या बहिणींना ३ हजार रुपये देणार असल्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषनेवर बोलताना दरेकर म्हणाले कि, लाडक्या बहिणींची उत्तम प्रकारे काळजी घेण्याचे काम महायुतीचे सरकार करतेय. पहिल्या दिवसापासून ही योजना अपयशी ठरावी यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केला. वेगवेगळ्या वावड्या उठवल्या, संशय व्यक्त केला. परंतु योजना जाहीर झाल्यापासून रीतसर पैसे मिळताहेत, आताही दिवाळीला मिळतील. माझ्या बहिणींच्या सबलीकरणासाठी ही योजना निश्चितच मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
तसेच लाडक्या बहिणीने, भावाने भाऊबीजेचे आशीर्वाद घेणे यामध्ये काही गैर असल्याचे वाटत नाही. बहिणीचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणावर निवडणुकीला निश्चितपणे महायुतीच्या उमेदवारांना मिळणार आहे. उदय सामंत यांनी सातत्याने महिलांच्या सबलीकरणासाठी काम केलेय. आताही या योजनेसाठी त्यांना आणि महायुतीला तिथल्या जनतेचे निश्चितच आशीर्वाद मिळतील.
लक्ष्मण हाके यांनी शरद पवार गटाला दिलेल्या ईशाऱ्यावर बोलताना दरेकर म्हणाले कि, पाडापाडी करण्यापेक्षा त्यांनी स्वतः उभे राहावे, निवडून यावे, निवडून आल्यानंतर सत्तेत जाऊन ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्या-त्या समाजाला न्याय द्यावा, अशी भुमिका घेणे गरजेचे आहे. पाडापाडी करणे हा यावरचा उपाय नाही.
आ. देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना दरेकर म्हणाले कि, अशा प्रकारची वक्तव्य कुणीही करता कामा नये. लोकप्रतिनिधिनी महिलांच्या अवहेलनेसंदर्भात वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. तथापी महिलांच्या संदर्भात विधान करताना सर्व लोकप्रतिनिधिनी अत्यंत जबाबदारीने बोलण्याची गरज आहे.