अखेर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय मध्ये झाला समावेश
दिल्लीत पिआयबी (PIB) च्या बैठकीत मिळाली अंतिम मान्यता ,आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश
अमळनेर :-जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी जलसंजीनवनी ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश झाला असून काल दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात आयोजित गुंतवणूक बोर्डाच्या (पी आय बी) बैठकीत अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली.यामुळे धरणाच्या कामाला गती मिळेल असा विश्वास माजी मंत्री तथा आ.अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
काल 12 रोजी दुपारी 3 वाजता दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयातर्फे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी पीआयबी ची मान्यता आवश्यक असल्याने नुकतीच आमदार अनिल पाटील यांनी जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री नामदार पाटील यांनी लवकरच गुंतवणूक बोर्ड (पीआयबी) ची मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते. या बैठकीला नीती आयोग , जलशक्ती मंत्रालय , पंचायत राज ,पर्यावरण , कृषी , कामगार , अर्थ यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.
केंद्र शासन देणार 859 कोटी
पाडलसरे धरणाचा पी एम के एस वाय मध्ये समावेश झाल्याने केंद्र शासन 859 कोटी निधी आगामी काळात या धरणाला देणार आहे.म्हणजेच येत्या 2 ते 3 वर्षातच कामाला गती येऊन केंद्र आणि राज्य शासन मिळून हे धरण पूर्ण होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.केंद्राकडून 859 कोटी निधी मिळणार असल्याने या। निधीतुन धरणाचे काम तर पूर्ण होईलच त्यासोबतच शासकीय उपसा सिंचन योजना तसेच जेवढ्या भागात पाणी अडवले जाईल तेवढ्या भागाचे जमीन हस्तांतरण व गाव पुनर्वसनचे काम देखील गतीने होणार आहे.केंद्राच्या या मान्यतेमुळे माझ्या आयुष्याचा एम खऱ्या अर्थाने पूर्ण होणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.
दरम्यान निम्न तापी प्रकल्पासाठी आमदार अनिल पाटील यांनी राज्य शासनाकडून सुप्रमा मिळविल्या नंतर केंद्राच्या योजनेत समावेश होण्यासाठी केंद्र शासनाच्या अनेक महत्त्वाच्या मान्यता आ.अनिल पाटील यांनी प्रयत्न करून प्राप्त केल्या होत्या.पर्यावरण विभागाची मान्यता मार्च २०२५ पर्यंत देण्यात आली होती. अखेर पिआयबी च्या मान्यतेनंतर धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्याने राज्यसरकारवरचा भार आता कमी होऊन अतिशय जलद गतीने धरणाचे काम पूर्ण होणार आहे.
अवर्षणप्रवण भागास न्याय दिल्याने आमदारांनी मानले आभार
अवर्षणप्रवण भागात असलेल्या निम्न तापी प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या योजनेत समावेश करून येथील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय दिल्याने आमदार अनिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,अर्थमंत्री ना निर्मला सीतारामन,केंद्रीय जलशक्ती मंत्री ना सी आर पाटील,राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,ना अजित पवार,जलसंपदा मंत्री ना गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील,जिल्ह्यातील खासदार आणि ज्यांच्या काळात धरणाला इन्व्हेस्टिंग क्लिअरन्स आणि सी डब्ल्यू सी ची मान्यता मिळाली ते माजी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच जलसंपदा विभागाच्या
डेप्युटी इंजिनिअर पासून ते सचिव लेव्हल च्या सर्व अधिकारीनी केलेले यासाठी प्रचंड कष्ट घेतले त्यांचे आभार व अभिनंदन देखील आमदार पाटील यांनी केले आहे.तर धरण कार्यक्षेत्रातील तमाम जनता व शेतकरी बांधवानी आमदार अनिल पाटील यांचे कौतुक करत ऋण व्यक्त केले आहेत.
शेतकरी समृद्धीकडे ही वाटचाल
हा प्रकल्प येत्या काही वर्षांत राज्य व केंद्र शासनाच्या समन्वयातून पूर्णत्वास जाईल त्यामुळे जळगाव व धुळे जिल्ह्यासह परिसरातील शेतकऱ्यांना दीर्घकालीन व शाश्वत सिंचन सुविधा मिळणार आहेत. हे केवळ सिंचन विकासाचे नव्हे, तर शेतकरी समृद्धीकडे वाटचाल घडविणारे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी, जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल असा विश्वास आ.अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.