क्रांतिज्योती फुले यांचा वारसा चालवतांना कार्यकर्त्यांनी डगमगता कामा नये – प्रफुल्ल महाजन
‘
क्रांतीज्योती महात्मा फुले यांचा वारसा चालवतांना कार्यकर्त्यांनी डगमगता कामा नये ‘असे आवाहन प्रमुख अतिथी प्रफुल्ल महाजन यांनी केले.असावा नगर जळगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३४ व्या स्मृतिदिनानिमित्त भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी व सत्यशोधक समाज संघ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना महाजन बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ञ तथा ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत भंडारी ,प्राध्यापिका अमृता नेतकर ,सरस्वती शिकवणी वर्गाच्या संचालिका सुनिता भंडारी,सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता ताठे ( उपाध्यक्षा, सत्यशोधक समाज संघ जळगाव ) उपस्थित होते.
प्रारंभी क्रांतीसूर्य जोतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास सत्यशोधकी विचारधारेचे कृतिशील कार्यकर्ते प्रफुल्ल महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.पुढील मार्गदर्शनात महाजन म्हणाले की , ‘ महात्मा फुले यांच्या सामाजिक समता संघर्षतेच्या लढ्यात मानवी हक्क ,मूल्यनिष्ठा व शिक्षणाभिमुख परिवर्तन यामंधील बांधिलकी अतूट होती.’ सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांनी अभिवाचन उपक्रमाची संकल्पना मांडली.दैनंदिन जीवनात छंद ,अभिरुची आणि अभिजात साहित्यकृती वाचनाकडे दुर्लक्ष होते.धर्मांध मंडळी कथा पुराणे यांचे प्रत्येक वर्षी पारायण करतात परंतु पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते पुरोगामी साहित्य वाचायला वेळ काढू शकत नाही ही खंत लुल्हेंनी व्यक्त केली.यापुढे निरंतर पंधरा दिवसातून महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय तसेच फुले, शाहू ,आंबेडकर यांच्या ग्रंथांचे अभिवाचन करण्याचा संकल्प लुल्हे यांनी सर्वानुमते प्रातिनिधिकपणे सोडला.ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत भंडारी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले , ‘ महात्मा फुले यांचा कालदर्शी द्रष्टेपणा आता समाजात पाहिजे तसा शिल्लक राहिला नाही.अभिवाचनाने वैचारिक जाण,समाजाप्रती कर्तव्याचे भान येऊन डोळस वैश्विक जाण येते.’ भंडारी यांनी अभिवाचनासाठी ग्रंथाची निवड,कार्यवाही आणि समारोपानंतर गटचर्चा तसेच परिसंवादातून अभिवाचक व श्रोते यांच्या विचारानुबंधाचे महत्व स्पष्ट केले.अभिवाचन उपक्रमाचा शुभारंभ प्राध्यापिका अमृता नेतकर यांनी ‘ गुलामगिरी ‘ या महात्मा फुले लिखित ग्रंथाचे आशयानुकूल व स्पष्टोच्चारासह प्रभावी अभिवाचन करून केले.
प्रफुल्ल महाजन हे महात्मा फुले प्रणीत सत्यशोधक पद्धतीने १५ डिसेंबर २०२४ रोजी विवाह करणार असल्याबद्दल भारतरत्न डॉ.एपीजे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांच्या हस्ते शाल आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील ग्रंथ देऊन हृदय सत्कार करण्यात आला.
समारोपीय अध्यक्षीय भाषणात सिद्धार्थ नेतकर यांनी महात्मा फुले यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील सनातन्यांशी केलेला मूल्यसंघर्ष सांगितला.
कार्यक्रमास अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्यकर्ता महेश शिंपी
, निवृत्त मुख्याध्यापक हेमंत धांडे,सुप्रसिद्ध चित्रकार सुनील दाभाडे यांच्यासह पुस्तक भिशी सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना महेश शिंपी व आभार प्रदर्शन विजय लुल्हे यांनी केले.