• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर विशेष लक्ष केंद्रित करणार! “ईडब्ल्यूएस” विद्यार्थ्यांना दोन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

Dec 27, 2024

Loading

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर विशेष लक्ष केंद्रित करणार!

“ईडब्ल्यूएस” विद्यार्थ्यांना दोन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, दि. : देशाच्या विकासात उच्च शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व आहे. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देऊन विद्यार्थी हिताला प्राधान्य देत राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, वाचन चळवळ वाढविणे आणि प्राध्यापकांचे प्रशिक्षण यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री. पाटील यांनी आज मंत्रालयात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाला उच्च शिक्षणातील सुधारणेचा त्रिसूत्री कार्यक्रम दिला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, विद्यापीठाचे कुलगुरू संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरण पोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. यासाठी विद्यापीठे, महाविद्यालय व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’हा उपक्रम दि. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत राज्यात राबविण्यात येणार आहे. ‘वाचन संकल्प महाराष्ट्र’ या उपक्रमअंतर्गत महाविद्यालयीन,विभागीय आणि स्तरावर पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांचे परिक्षकांकडून उत्कृष्ट परीक्षणाची निवड करून प्रोत्साहनपर प्रमाणपत्र आणि बक्षीसही जाहीर करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांना सुद्धा आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार केले आहे 21व्या शतकातील हे पहिले शैक्षणिक धोरण असून भारताला जागतिक ज्ञान आणि महासत्ता बनवणे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे या धोरणाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र सादर करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ

शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या गटातून मराठा समाजातील मुलांना व्यवसायिक विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. दरम्यान, राज्य शासनाने मराठा समाजातील मुलांना “ईडब्ल्यूएस’ प्रमाणपत्र देणे बंद केले. त्याऐवजी सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्ग अर्थात “एसईबीसी’ प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली. आता प्रवेश देणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विद्यार्थ्यांकडून “ईडब्ल्यूएस’ प्रमाणपत्राची सक्ती केली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यात येत असल्याची घोषणा आज केली त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *