*ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगाव निसर्ग सहलीसह पर्यावरण मित्र पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न*
जळगाव – आज दि. २९ डिसेंबर २०२४ रविवार रोजी आपल्या ऑर्कीड नेचर फाऊंडेशनची एक दिवसीय “निसर्ग सहलीसह पर्यावरण मित्र पुरस्कार सोहळा” डॉ .विकास पाटील यांच्या क्षणभर विश्रांती फार्म हाऊसवर कढोली शिवार बांभोरी रोड जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला. ऑर्किड नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.राजेंद्र एन. कुलकर्णी आणि डॉ. विकास पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनातून आणि परिश्रमातून आजच्या कार्यक्रमात सुसुत्रता दिसून आली. सुरूवातीला ठरल्याप्रमाणे अध्यक्षांकडे सर्व सभासद एकत्र जमलो. तिथे गुलाबी थंडीत चहापानाचा आनंद घेत नवीन सभासदांशी परिचय झाला. त्यानंतर सर्वांच्या चारचाकी वाहनांचा ताफा डॉ. विकास पाटील यांच्या “क्षणभर विश्रांती” या कृषी पर्यटन स्थळाकडे निघाला. वैजनाथ गावाजवळून गाड्या जाताना गावकऱ्यांनी विचारले सुध्दा कोणी पुढारी येताहेत का? अवघ्या ३०-४० मिनीटांत निसर्गरम्य अशा क्षणभर विश्रांतीत आपण पोहचलो. सर्वांना आपल्या लहानपणी खेडेगावात गेल्यासारखे वाटले जेव्हा तिथे डॉ.विकास पाटील यांनी स्वतः बनवलेल्या घरात प्रवेश केला. सर्व भिंती मातीच्या, शेणाने सारवलेल्या जमिनाचा स्पर्श, सागाच्या लाकडा पासून बनविलेली नैसर्गिक बैठक, पलंग, आरसा, कपाट हे सर्व बघून सर्वांना अप्रुप वाटले. जून्या काळातले कंदील, लाईटचे काळे बटणं, भिंतीतील छोटी छोटी कपाटे, फळीवरील पितळी भांडी सगळं काही कौतुक करण्यासारखं आणि हरवलेल्या बालपणात घेऊन जाणारं होतं. त्यानंतर संपूर्ण परिसरात मारलेला फेरफटका- त्या दरम्यान लिंबू, पेरू, सिताफळ, आवळे या फळांनी बहरलेली झाडे बघून कोणीही फळे तोडण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. पेरू आणि आवळ्यांचा आस्वाद घेतला. लिंबू ज्याला शक्य होतील तितके वेचून घेतले. मुक्कामाची सोय म्हणून दोन कौलारू घरांचं काम प्रगतीपथावर आहे. झाडांना बांधलेला झोपाळा, उंच झोके, उंच मचाण या ठिकाणी सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला.
फेरफटका झाल्यावर गरमागरम पोहे आणि चहा चा आस्वाद घेऊन सर्वांना तरतरी आली. सर्वांचा एकमेकांशी ओळख परिचय होऊन मनसोक्त गप्पा रंगल्या. काही वेळातच पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला. या अनौपचारिक छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ सदस्य आदरणीय श्री. आर. ए. पाटील सर होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र एन कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सन २०२४ मध्ये झालेल्या सर्व नवीन आजीवन सभासदांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्ष श्री. राजेंद्र कुलकर्णी यांची कन्या अभिनेत्री श्रेया कुलकर्णी हिचाही यावेळी कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर आपापल्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या सहा निसर्गप्रेमींना “पर्यावरण मित्र २०२४” हो पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात
१. डॉ. श्री. विकास पाटील ( काष्ठ शिल्पकार, आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड, जतन आणि पर्यावरण रक्षणासाठी राबविलेले अनेक उपक्रम),
२. श्री. तुकाराम ज्योतीराम पाटील ( निसर्ग कवी, पांगल्या पायवाटा कविता संग्रह प्रसिद्ध, शेतीत रमणारे व्यक्तीमत्व)
३. श्री. किशोर बळीराम महाजन ( निसर्ग भ्रमंती, वृक्षारोपण, ट्रेकची आवड, फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष, पर्यावरण रक्षणासाठी असंख्य उपक्रम राबविले आहेत)
4. श्री. दिपक तांबोळी ( निसर्ग पर्यटन, फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषदेचे माजी सचिव, लेखक, सहा वर्षांत ६ कथासंग्रह प्रसिद्ध होऊन प्रत्येक कथासंग्रहास पुरस्कार प्राप्त आहे. असे एकूण महाराष्ट्रातील विविध साहित्य मंडळांचे ३१ पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत.)
5. श्री. दत्तात्रय तावडे ( निसर्ग प्रेमी, पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी झोकून देऊन काम, शेती व्यवसायासह वड पिंपळ आणि स्थानिक वृक्षांची गंगा नर्सरीचे निर्माण करून मोठ्या प्रमाणावर वडाच्या झाडाचे वितरण व लागवड केली आहे. जंगल परिसरात जनावरांसाठी पाण्याचे हौद बांधले)
६. श्री. अमन अनिल गुजर ( वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, इथिकल हॅकर, अनेक शासकीय विभागांत अधिकाऱ्यांसोबत काम केले आहे. Rescue, Reunion and Rehabilitation या त्रिसूत्रीवर मुख्यत्वेकरून काम करत आहे. दिवसा स्वतःचा व्यवसाय सांभाळून रात्री जंगल भटकंतीचा छंद आणि त्याबरोबरच अभ्यास, जखमी प्राण्यांचे संरक्षण ह्या कामात विशेष आनंद मिळतो)
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर डॉ. विकास पाटील यांनी आयुर्वेद व मानवी जीवनशैली या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. निसर्ग कवी श्री. तुकाराम पाटील यांच्या कवितांना मनापासून दाद दिली. श्री . अमन गुजर यांनी आपल्या एकेका छंदाविषयी आणि कामाविषयी सांगून मंत्रमुग्ध केले. त्यांनी कमी वयात तारूण्यात मिळवलेले व्यवसायातील यश आणि छंद जोपासताना साधलेला निसर्गाशी मेळ ऐकून सर्व जण थक्क झाले. डॉ. विकास पाटील यांची कन्या डॉ. अनुजा पाटील यांनी मौखिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करून अनेक छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आणून दिल्या.
अध्यक्षीय भाषणात श्री. आर.एन. पाटील सरांनी थोडक्यात आढावा घेतला.
शेवटी चूलीवरच्या अस्सल खान्देशी सुग्रास जेवणाचा आस्वाद घेऊन सर्वजण तृप्त झाले. काड्यांवर भाजलेल्या वांग्याचे भरीत, कळण्याची पुरी, शेवभाजी, पुरी, शिरा,लिंबू मुळा काकडी असा स्वादिष्ट रूचकर बेत अगदीच जमून आला होता.
कार्यक्रमात खजिनदार नितीन अट्रावालकर, अविनाश भोळे , दिगंबर वाणी, जयंत राणे, माधुरी कोल्हे, जयंत राणे, विजय पाटील, गोसावी सर, विनय काळे, सुभाष महाजन, दिलीप भारंबे सर,आरती कुलकर्णी, आरती महाजन, किरण चव्हाण व सर्व सदस्य सहकुटुंब उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनीता महाजन यांनी केले. सौ. माधुरी कोल्हे यांनी आभार मानले
संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहात, सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाला. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद
*जन संपर्क अधिकारी गिरीष रमणलाल भावसार ऑर्किडनेचर फाउंडेशन जळगाव*