कवी शाश्वत जीवनमूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो : डॉ.अनिल कांबळी
अनपेक्षित पुस्तक प्रकाशनाचा सन्मान दिल्याने भारावले सन्मानार्थी
‘
जळगाव विशेष प्रतिनिधी (विजय लुल्ले)
कवी शाश्वत मूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो ‘ असे मार्मिक भारवोद्गार डॉ.अनिल कांबळी यांनी सत्कारार्थी मनोगतात केले.श्री गजानन हार्ट ॲन्ड आय हॉस्पिटल प्रा.लि.जळगाव आयोजित स्व.गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट कविता संग्रह व स्व.दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी २०२३ पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ.कांबळी बोलत होते.पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी व.वा.वाचनालय जवळील आय.एम.ए.हॉल,जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला.सदरहू पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे.साहित्यपिठावर प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील,साहित्यिक तथा समिक्षक प्रा.अरुण पाटील,बाळकृष्ण सोनवणे, पुरस्कारार्थी प्रदिप कोकरे , मातोश्री श्रीमती कल्पना चौधरी,संयोजक हृदयरोग तज्ज्ञ डॉ.विवेक चौधरी,कवी डॉक्टर अतुल सरोदे ,डॉक्टर प्रियदर्शनी सरोदे ,नेत्रतज्ज्ञ डॉ.अंजली चौधरी,संयोजक पुरुजित चौधरी ( प्रदेश सरचिटणीस अ .भा .सरपंच परिषद ),पल्लवी चौधरी ( माजी सभापती प.स.यावल ) मान्यवर उपस्थित होते.
डॉ.अनिल कांबळी मनोगतात पुढे म्हणाले की,’ साहित्यिकाला स्वयंभू स्वतःचे एक मूल्य व भुमिका असते.अंतर्मनातून प्रकट होणारे साहित्यच अक्षर वाङ्मय होते अन्यथा ती फक्त रचना असते.’ प्रारंभी केशवसुत म.रा.पुरस्कार प्राप्त कवी स्व.गणेश चौधरी व स्क्रिझोफेनियाकार स्व.दिवाकर चौधरी यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांनी करून पुष्पपाला अर्पण केल्या तसेच कुटुंबियांनी प्रतिमा पूजन करून श्रद्धापूर्वक अभिवादन केले.प्रमुख अतिथींचे स्वागत संयोजक डॉक्टर विवेक चौधरी यांनी व प्रमुख अतिथींचा परिचय पुरुजित चौधरी यांनी केला.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात स्व.कवी गणेश चौधरी लिखित अन् कवी केशवसुत राज्य पुरस्कार प्राप्त ‘ तृषार्त ‘ काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन कादंबरीकार प्रदीप कोकरे यांच्या हस्ते व ‘ काचेच मनं ‘ ( पत्र संग्रह ) या साहित्यकृतीचे पुनर्प्रकाशन कवी डॉक्टर अनिल धाकू कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले.
स्व.गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह २०२३ कवी डॉ.अनिल धाकू कांबळी ( ईष्टक – काव्य संग्रह ) यांना सुप्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी शंभू अण्णा पाटील ( जळगाव ) यांच्या हस्ते व स्व.दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी २०२३ पुरस्कार कादंबरीकार प्रदीप कोकरे ( कादंबरी – खोल खोल दुष्काळ डोळे ) यांना ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अरुण पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. मानपत्राचे वाचन प्रा.गोपीचंद धनगर यांनी केले.
[ *पुरस्काराचे स्वरूप : प्रत्येकी २५००० रोख राशी , आकर्षक मानपत्र व स्मृतिचिन्ह यांसह शाल व श्रीफळ देऊन सत्कार* ]
प्रमुख अतिथी ज्येष्ठ रंगकर्मी शंभू अण्णा पाटील यांनी मार्गदर्शनात स्वर्गीय दिवाकर दादा चौधरी यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला तसेच स्किझोफिनिया या कादंबरीची लेखन वैशिष्ट्ये अधोरेखित केली.
पुरस्कारार्थी कादंबरीकार प्रदीप कोकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.डॉ.अतुल सरोदे यांनी सादर केलेल्या अस्सल लेवागण बोलीतील ‘ नागरगठ्ठा ‘ कवितेने कार्यक्रमात रंगत आणली.अध्यक्षीय समारोपात समीक्षक प्रा.आशुतोष पाटील मार्गदर्शनात म्हणाले की,’ साहित्यिकांनी सामाजिक ,सांस्कृतिक व राजकीय वातावरणापासून सोयीस्कर भूमिका न घेता निर्भयतेने व निर्लेपपणे लेखन केले पाहिजे.त्याच त्याच पुरस्कृत साहित्यिकांना पुरस्कार देणे अनुचित आहे.वास्तवदर्शी नवीन भावनाविश्व व अनुभवविश्वाला गवसणी घालणाऱ्या नवोदित साहित्यिकांना पुरस्कार देऊन सृजनशील साहित्य गौरवाचा राजमार्ग सुकर केला पाहिजे.’ कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिका मायाताई धुप्पड,शशिकांत हिंगोणेकर ,ए.के.नारखेडे,प्रभाकर महाजन,माजी प्राचार्य एस.एस.राणे,प्राचार्य शिरीष पाटील,प्रकाश किनगावकर ,अशोक कोतवाल,डॉ.योगेश महाले,डॉ.मिलिंद बागुल, प्रा.रत्नाकर कोळी,माजी प्राचार्य तथा चित्रकार राजेंद्र महाजन,प्रा.महेंद्र सोनवणे,विजय लुल्हे ,संजय बारी, व्रतस्थ वाचक प्रशांत गुरव,जितेंद्र साळुंखे ,जयवंत बोदडे ,मुख्याध्यापक उमाकांत महाजन ( दिवाकर खंडु चौधरी विद्यालय,डांभुर्णी ) यांसह समस्त शिक्षकवृंद अन् शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्ह्यातील साहित्यिक व रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ.विवेक चौधरी, सुत्रसंचालन प्रा.गोपीचंद धनगर व आभार प्रदर्शन पुरुजीत चौधरी यांनी मानले.कार्यक्रमानंतर उपस्थितांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.