• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सावधान! स्वायत्त महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात!

Jan 11, 2024

Loading

सावधान! स्वायत्त महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात!

•स्वायत्तता प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांना समर्थ बनवण्यासाठी नवनवीन प्रयोग होतील, सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उत्तम मनुष्यबळ निर्माण होईल, गुणवत्तेचे शिक्षण मिळेल ही स्वप्ने बघत सरकारने अ किंवा अ प्लस दर्जाच्या महाविद्यालयांना स्वायत्तता दिली.
•अ किंवा अ प्लस दर्जा पूर्वीचा आहे. विद्यार्थी संख्या देखील पूर्वीची आहे. आत्ताच्या परिस्थितीत या महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर घसरली आहे.
•लाच घेऊन रिक्त जागा भरता येतील आणि डोळे झाकून रुसा नावाची संस्था पाच कोटी रुपये देईल याची खात्री झाल्यामुळे संस्थाचालकांनी महाविद्यालयांवर स्वायत्तता लादली. शिक्षकांना स्वायत्तता नको होती.
•ठरल्याप्रमाणे स्वायत्त महाविद्यालयांना सरकारने रुसामार्फत भरपूर निधी दिला. अनेक छोट्या महाविद्यालयांना भरतीची परवानगी नाकारून त्यांच्याकडे असलेली रिक्त पदे तथाकथित अ किंवा अ प्लस दर्जा असलेल्या महाविद्यालयांकडे वर्ग करण्यात आल्या. यामुळे छोट्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल याचा खेद किंवा खंत ना संस्थाचालकांना आहे ना सत्ताधाऱ्यांना आहे. शिक्षणाला धंदा मानणाऱ्या संस्थाचालकांच्या भ्रष्ट नीतीमुळे उच्च शिक्षणाची दैना झालेली आहे.
•स्वायत्त महाविद्यालयांमध्ये दिले जाणारे शिक्षण हे कुचकामी असून येथे प्रवेश घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि एक कोटी रुपयापर्यंत लाच देऊन शिक्षकाची नोकरी विकत घेणाऱ्या उमेदवारांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता स्पष्टपणे दिसत आहे. जमीन जुमला विकून पैशांची उभारणी करत, सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी लाच देऊ नका आणि लाचखोर संस्थाचालकांच्या सापड्यात अडकून पडू नका.
•स्वायत्त महाविद्यालयांची गुणवत्ता गंभीरपणे घसरलेली दिसत आहे. कारण तासिका होत नाहीत, अभ्यासक्रम पूर्ण शिकवला जात नाही, दोन चार प्रकरणांवर प्रश्न पत्रिका निघते, जो शिकवतो तोच प्रश्न पत्रिका काढतो, तोच तपासतो. त्यामुळे ४०% मार्क्स मिळवण्याची ज्याची कुवत नाही त्याला ८५% मार्क्स मिळत असल्याचे दिसत आहे. फुकटात प्रमाण पत्र मिळत असल्याने कोणी बोलत नाही. परंतु या प्रमाणपत्राला व्यवहारात शून्य किंमत आहे हे विद्यार्थी व पालकांना कळत नाही.
•स्वायत्त महाविद्यालयातील असे विद्यार्थी ना नोकरी मिळवू शकत, ना स्पर्धा परीक्षा देण्याची हिम्मत दाखवू शकत, ना आपलं मत मांडण्याचा यांच्यात आत्मविश्वास निर्माण होत. त्यामुळे स्वायत्त महाविद्यालयात प्रवेश घेणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेणे होय.स्वायत्त महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये.
•स्वायत्त महाविद्यालयांमधील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकांना कार्यभार कमी पडत आहे.
•सन 2017 च्या विद्यार्थी संख्येनुसार प्राध्यापक भरतीस मंजुरी मिळाली आहे. आत्ताच्या विद्यार्थी संख्येनुसार क्वचित विषयांना जागा रिक्त असतीलही कदाचित. पुढे जाऊन या जागाही रिक्त असल्याचे दिसणार नाही.
•प्रत्यक्षात रिक्त जागा नसताना संस्थाचालक मोठ्या प्रमाणावर लाच घेऊन भरती करतील. परंतु कार्यभार नसल्यामुळे वर्ष दीड वर्षात ( लाच देऊन) नवीन भरती झालेले शिक्षक कार्यभार नसल्यामुळे सेवामुक्त केले जातील.
•आपली वर्णी लागावी म्हणून अनेक उमेदवारांनी रोखीच्या स्वरूपात 70 टक्के रक्कम संस्थाचालकांना लाच म्हणून दिल्याची खात्रीशीर माहिती आहे. ८० टक्के जागांवर उमेदवार निश्चित झाल्याची जोरदार चर्चा आहे. हे सारे उमेदवार दूरवरचे आहेत. संस्थाचालकांनी आपले दलाल पाठवून उमेदवार शोधून काढलेले आहेत व निश्चितही केलेले आहेत.
•मुलाखतीपर्यंत शंभर टक्के उमेदवार निश्चित होतील व हेच उमेदवार विद्यापीठ निवड समितीद्वारा निवडले जातील. याबाबतची माहिती राज्याचे राज्यपाल व मुख्य सचिवांना वेळोवेळी सादर केली जात आहे.
•देशभरातील अनेक राज्यांमध्ये सहाय्यक प्राध्यापकाची भरती लेखी व तोंडी परीक्षांद्वारे केली जाते. अशी भरती त्या त्या राज्यातल्या पब्लिक सर्विस कमिशनद्वारे केली जाते. महाराष्ट्र स्वतःला पुरोगामी राज्य मानते. परंतु या राज्यात सहाय्यक प्राध्यापकांची भरती संस्थाचालकांच्या मर्जीने लाच घेऊन पार पडते ( काही अपवाद सोडले तर).
•संस्थाचालक सत्तेचा दुरुपयोग करतात. कोटी कोटी रुपये लाच मागतात. त्यामुळे प्रत्येक संवर्गातल्या NET, SET, आणि Ph. D. अर्हता असून देखील गरीब ग्रामीण दलित वंचित उमेदवारांना सहाय्यक प्राध्यापक होता येत नाही. राज्य शासन मात्र या गंभीर प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसत आहे आणि संस्थाचालकांच्या भ्रष्ट व्यवहाराला जणू काही मूकसंमती देत आहे.
•आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे ज्या होतकरू, ग्रामीण, दलित, वंचित अर्हताधारक उमेदवारांच्या वतीने निष्क्रिय सज्जनांचे, सक्रिय दुर्जनांचे, भ्रष्ट संस्थाचालकांचे व त्यांना लगाम न घालणाऱ्या राज्यकर्त्यांचे जाहीर निषेध!

प्रा डॉ एल ए पाटील,
माजी प्राचार्य, प्रताप महाविद्यालय अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *