जगाला जीवनाचे अंतिम सत्य सांगणारा तथागत गौतम बुद्ध !!!!
जगामध्ये विज्ञानाची कास धरणारी विचारसरणी अस्तित्वात नव्हती. त्यावेळेला गौतम बुद्धांनी अतिशय कष्ट घेऊन जीवनाला उन्नत करणारा मार्ग दाखविला. स्वतः अनेक लोकांनी सांगितलेल्या सिद्धांताचा अभ्यास करून प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यांनी जगामध्ये अंतिम सत्य काय आहे हे सिद्ध करून दाखवले. जगामध्ये विज्ञान हेच सत्य पडताळून पाहण्याचे शास्त्र आहे असे अभ्यासांती सिद्ध केले. काल्पनिक देवाच्या संकल्पनेभोवती फिरणारे विचार कसे कालबाह्य आहेत हे प्रथमतः बुद्धांनी जगाला सकारण दाखवून दिले. आत्मा ,परमात्मा, स्वर्ग, नरक भ्रामक कल्पना आहेत. त्या आतापर्यंत कुणालाही शोधता आल्या नाही. कारण त्या अस्तित्वातच नाही. खरे सुख दुसऱ्याच्या परोपकारासाठी कार्य करण्यात आहे. स्वतःचा विकास आपणच करू शकतो त्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही. कर्मकांड हे विवेकी विचार थांबवण्यासाठी अडसर आहेत.ईहलोकात मानव हाच एकमेव विचार करणारा प्राणी आहे. त्याने तर्कदृष्टीने जगले तरच त्याचे कल्याण आहे. सर्वांचे हिताचा विचार ज्याच्या ठाई आहे तेच लोक खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहेत. मानवाच्या उन्नतीचा विचार सोडून ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या गोष्टीच्या मागे लागून वेळ वाया घालणे व्यर्थ आहे. आज जगामध्ये तेच चालू आहे. प्रत्येक धर्म स्वतःला महान समजत आहे. आपल्या धर्माची जगावर सत्ता असावी अशी त्यांची धारणा आहे. धर्माच्या चुकीच्या कल्पनेने तो मानवता विसरला आहे. मानवता उभी करणे हेच धम्माचे काम आहे. अहिंसा हा धम्माचा पाय आहे. धम्म ही मानवता उभी करणारी विचारसरणी आहे. सत्य शोधून काढण्याची प्रक्रिया म्हणजे धम्म होय. असा धम्म गौतम बुद्धांनी जगाला दिला. प्रत्येक माणूस अद्वितीय आहे हे सांगणारा धम्म बुद्धाचा धम्म आहे. आज धम्माच्या विचारावर जपान सारख्या देशाने विज्ञानाची कास धरून विश्वात नाव कमविले आहे. धम्माने जगाकडे पाहण्याचा अप्रतिम दृष्टिकोन मानवाला दिला. मानवाची सर्वोत्तम प्रगती हेच बुद्ध धम्माचे ध्येय आहे. समानता बुद्ध धम्माची शिकवण आहे. बुद्ध धम्मा कुणीही श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद नाही. समता वाढवणारी प्रवृत्ती बुद्ध धम्मात आहे. बुद्ध धम्माने जगाला नैतिकतेने, शीलाने, अहिंसेने, मैत्रीने जगण्याचा अधिकार दिला. बुद्धाने अमानवी परंपरांचे आपल्या बुद्धी कौशल्याने खंडन केले. असंख्य भोंदू धर्ममार्तंड यांना विचाराने पराजित केले. असा धम्म साऱ्या जगात वाढू लागला. अजूनही अशा धम्माची पाळेमुळे विश्वात जिवंत आहेत. मानवाला स्वातंत्र्याची पहाट उजाडणारा हा बुद्ध धम्म आहे. कुणापुढेही कशानेही झुकणारा हा धम्म नाही. जगामध्ये बुद्ध धम्माने जगणाऱ्याची वाणवा आहे. बुद्धधर्मीय बुद्धांचा विचार सोडून कर्मकांडाच्या माध्यमाने जगतात यातच धम्माचे अपयश आहे. बुद्धाचा धम्म जगणारे आधुनिक युगातील महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माचा विचार आयुष्यभर अंगीकारला. त्यांच्या विचाराने आजचा समाज जगत नाही त्यामुळे कर्मठ , अतार्किकता वाढली आहे. लोक पद , प्रतिष्ठा, पैसा याला बळी पडले आहे. बुद्धाने जगामध्ये पाई फिरवून हा मार्ग समजून दिला. कुणाकडूनही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही. कुणी त्यांना महान म्हणेल अशी ही अपेक्षा ठेवली नाही. बुद्धीच्या कसोटीवर विचाराला पडताळून हा विचार स्वीकारण्याचे सांगितले. मी म्हणतो म्हणून हा विचार स्वीकारू नका तुम्हाला सत्याच्या चाळणीतून हा विचार पडताळण्याचा त्यांनी सल्ला दिला. मानवतेला प्राधान्य देणारा हा जगातला एकमेव विचार ठरला. भारतामध्ये कोणत्याही कामासाठी मुहूर्त पाण्याचा केविलवाणी प्रयत्न केला जातो. मुहूर्त सांगणारा स्वतःच्या जीवनाची कुंडली सांगू शकत नाही. भारत-पाक युद्धाबाबत कोणत्याही ज्योतिषाने काय होणार याचे भाकीत केले नाही. पहेलगाम येथील पर्यटकांवर होणारा हल्ला कोणताही नामांकित ज्योतिष सांगू शकला नाही. म्हणजेच याचा अर्थ हे सर्व थोतांड आहे. बुद्धाने कल्पनेवर आधारित विचार खोडून काढला. जे सत्य आहे तेच जगाला दिले. खोटे कधीही स्वीकारले नाही. मी कुणी देव नाही, मी महापुरुष नाही असे सांगून व्यक्ती पूजेला विराम दिला. आज समाज बुद्धाच्या मूर्तीला विहारात बंद करून बुद्धांचे विचार बंदिस्त करीत आहे. वर्षावासासारखे मोठमोठे कार्यक्रम घेऊन समाज एकत्रित होतो परंतु विचार मात्र सर्वांपर्यंत घेऊन जात नाही हे वास्तव आहे. लाखो रुपये आम्ही महाप्रसादासाठी खर्च करीत असतो परंतु शिक्षणासाठी कोणालाही मदत करीत नाही. बुद्धाचा विचार घेऊन अनेक महापुरुष भारतामध्ये उदयास आले. मातृसत्ताक पद्धतीचा विचार हा बुद्धांच्या विचारात सापडतो. स्त्री पुरुष समानता बुद्धांच्या धम्मा दिसून येते. बुद्धांनी ग्रंथ प्रामाण्य नाकारले. व्यक्ती पूजा नाकारली. जगाला प्रबोधनाचा नवा मार्ग मिळाला. बुद्धांनी सर्वप्रथम कर्मकांड आणि विरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे अनेक नामांकित महापुरुष देऊ शकले नाही. गौतम बुद्धांनी त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी काही नियमावली आखली. त्या विचाराने साऱ्या जगात बुद्धांचा विचार पोहोचला. भारतातील महापराक्रमी राजा अशोक सम्राट याने देखील गौतम बुद्धांच्या विचाराची धुरा सांभाळली. आपल्या मुला मुलीला विदेशात पाठवून बुद्ध धम्माचा विचार जगाला दिला. सर्वांना या विचाराने जगता येते असा मध्यम मार्गी धम्म बुद्धांनी बहुजनांना दिला. जो या मार्गाने जाईल तो स्वतःच्या जीवनाचा विकास करील.. मानवाने स्वतःचा विकास स्वतःच करायचा आहे. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी एमपीएससी व यूपीएससी परीक्षा स्वतःच्या मेहनतीवर देतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचा विचार आपणच करायचा आहे. त्यासाठी कोणीही चमत्कार करणार नाही. आज आपल्या भारतात अनेक कर्मकांड करून जीवनातील समस्या सोडविण्याचा उपाय सांगितला जातो परंतु कोणत्याही कर्मकांडाने ते शक्य नसते. तसे असते तर एखाद्या देशाविरुद्ध लढताना एखादा पुरोहित, मौलवी, पादरी याचीच नियुक्ती केली गेली असती.. डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध धर्माच्या विचारावर राज्यघटनेचा पाया रचला आहे. कोणत्याही धर्म संस्थापकाचा त्यात उल्लेख नाही. कोणत्याही देवाच्या नावाने राज्यघटना सुरुवात होत नाही. धर्मनिरपेक्षता मांडणारा बुद्ध धम्म आहे. कोणताही व्यक्ती असो तो मानव आहे त्याचा विकास झाला पाहिजे हाच हेतू बुद्ध धम्माचा आहे. वैश्विक मैत्री निर्माण करण्याचा बुद्ध धम्माचा हेतू आहे. गौतम बुद्धाने म्हणजेच कुणबी समाजाच्या राजपुत्राने हा विचार आपल्याला दिलेला आहे. बुद्ध धम्म हा आपण विशिष्ट जातीचा आहे अशी धारणा करून ठेवलेली आहे. बहुजनांच्या राजाने स्व कष्टाने आम्हाला दिलेला हा विचार आहे. अशा या मानवाला सर्वोच्च पातळीवर घेऊन जाणाऱ्या सिद्धार्थ गौतम बुद्धाला प्रणाम!!!
पत्रकार
एस.एच.भवरे