संत रविदास : आधुनिकतेचा ध्यास-
– प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’
सामाजिक क्रांतीचे प्रणेते व संत शिरोमणी गुरू रविदास यांचा जन्म फेब्रुवारी महिन्यात माघ पौर्णिमेच्या दिवशी उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात काशीजवळ गोवर्धनपूर (काहींच्या मते, मांडूर, माडुगडिह) येथे चांभार जातीत झाला. जन्माचा दिवस रविवार असल्याने त्यांचे नाव रविदास ठेवण्यात आले. (चौदाव्या शतकाचा कालखंड असल्याने, इसवी सन व तारखाबाबतीत स्पष्ट पुरावे नसल्याने, फेब्रुवारी १३७६, १३७७, १३९८ असा फरक अनेक ग्र॔थातून दिसून येतो. मृत्युच्या बाबतीतही स्पष्टता नाही. कॅलेंडरच्या तिथीनुसार दरवर्षी माघ पौर्णिमेलाच देशभर संत रविदास जयंती साजरी केली जाते.)
गुरू रविदास यांच्या वडिलांचे नाव रघुराम (रघुनंदन) व मातेचे नाव कर्मादेवी (कलसा, रघुराणी, घुरबिनिया) होते. त्यांच्या पत्नीचे नाव लोनाबाई तर, मुलाचे नाव विजयदास होते. मेलेल्या ढोरांच्या कातडीपासून पादत्राणे तयार करण्याचा कुटुंबाचा पारंपारिक व्यवसाय. कुटुंब अत्यंत गरीब असल्याने व पालणपोषणाची जबाबदारी रविदासांकडे लहानपणीच आल्याने त्यांना इतरही काबाडकष्टाची कामे करावी लागली. त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये तसेच सूफी संत, साधू व तपस्वी यांच्या सहवासात गेले. त्यामुळे फावल्या वेळात त्यांना समाजजागृती करण्याचा ध्यास लागला. रविदासांचे वय १२ वर्षाचे असतानाच हळूहळू त्याचा कल शाश्वत चिंतनाकडे लागला.
त्याचवेळी हिंदू समाजात जातीवाद, वर्णवाद, अस्पृश्यता, पुरोहितवाद यांचे प्रस्थ माजले होते. जाती-जातीत, धर्मा-धर्मात व पंथा-पंथात कहर निर्माण झाला होता. जातिभेदामुळे शुद्र, अस्पृश्यजन अन्याय व अत्याचाराला बळी पडत होते. हे सर्व गुरू रविदास उघड्या डोळ्यांनी पाहत होते. त्यांचे मन द्रवले. म्हणून त्यानी ६००० जातीत विभागलेल्या समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून भारतवर्षात स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा अहोरात्र प्रयत्न केला.
त्यांनी आपल्या अमृतवाणीने संपूर्ण भारत जागृत केला. त्यांच्या समाजप्रबोधनाने लक्षावधी लोक त्यांचे शिष्य बनले. राणी मीराबाई, राणी झाली, दिल्लीचा सुलतान सिकंदर शाह लोधी यांचासुद्धा त्यांच्या शिष्यगणात प्रामुख्याने समावेश होता. त्यामुळे त्यांच्या नावानेच ‘रविदासी पंथा’ला सुरुवात झाली. रविदासी पंथाचे लोक जाती-उपजातीच्या नावाने ओळखले जाऊ लागले. जसे; रामदासिया, जटिया, कुरील, अहिरवार, महोबिया, कबीरपंथी, धुसिया, मोची, चौधरी, जैसवार, संखवार, चर्मकार, जाटव, चोपण इत्यादि.
जातिव्यवस्थेमुळे समाजाने उच्च-नीचतेच्या भिंती उभ्या झाल्या होत्या. त्या जमीनदोस्त करण्यासाठी संत रविदासांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रचार व प्रसार संपूर्ण भारतभर दूरवर पोहचला. या सामाजिक क्रांतिकारकाची राज्याराज्यातील भाषेच्या उच्चारातील विविधतेमुळे वेगवेगळी नावे रुढ होत गेली. पंजाबी भाषेत रैदास, हिंदीत रविदास, राजस्थानमध्ये रोहिदास व राहीदास, बंगालमध्ये रुईदास, मराठीमध्ये रविदास, रैदास व रोहितदास; यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व नैतिक, बुद्धीवादी विचारांचा अखिल भारतीय स्तरांवर किती प्रभाव होता; हे दिसून येते.
आध्यात्मिक ज्ञानी व भक्तीकवी स्वामी रामानंद हे संत रविदासांचे गुरू होते; तर सेना महाराज, संत कबीर हे गुरुबंधु होते. त्यांचा गोतावळा मोठा होता. भारतीय धार्मिक परंपरेतील सतरा संतांपैकी एक म्हणून त्यांचा समावेश आहे. संत रविदासांच्या व्यक्तिमत्त्वाने व उदार विचाराने सामान्य जनता तर प्रभावित झालीच, परंतु संतश्रेष्ठीतील संत तुकाराम, गुरूनानक, गुरू कबीर, स्वामी सेवादास, संत एकनाथ, संत मीराबाई, संत दयाबाई, संत सेना अशा असंख्य संतांनी आपल्या पदात रविदासांच्या महानतेचे गुणगान केले आहे. गुरू कबीर म्हणतात;
*साधुन में रविदास संत है, सुपच ॠषि को मानिया।*
*हिंदु-तूर्क दुई दीन है, कुछ नही पहछानिया।।*
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, ओशो रजनीश, भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम, राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांसारख्या अनेक महापुरूषांनी, विद्वानांनी, कवी व लेखकांनीसुद्धा संत रविदासांच्या कार्यकर्तृत्वाचा आपल्या लेखणीतून व वाणीतून उल्लेख केला आहे. तसेच संत रविदासांच्या जनजागृतीविषयी कृतज्ञता बाळगून त्यांच्या भक्तांनी देशातील उत्तर भारत, दक्षिण भारत व मध्य भारत या भागातील अनेक ठिकाणी रविदास कुंड, रविदास मंदिरे, रविदास स्मारके व रविदास समाधीस्थळे’ बांधल्याचे आजही दिसून येतात.
आजच्या काळातसुद्धा त्यांच्या विचारांची गरज लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आंग्लविद्या विभूषित चतुरस्त्र विद्वानाने गुरू रविदासांना गुरुचा मान देऊन ‘द अनटचेबल’ नावाचा ग्रंथ समर्पित केला होता.
गुरू रविदासांनी चमत्कार, अंधश्रद्धा व ढोंगी प्रवृत्तींवर प्रहार केलेत. मूर्तीपूजेचे खंडण तसेच बाह्य अवडंबावर घणाघाती वारही केले. त्यांनी जातीव्यवस्थेवर आधारलेल्या समाजव्यवस्थेस व ब्राह्मणी ग्रंथांच्या प्रामाण्यवादास नकार दिला. परंतु सांप्रदायिक विचारधारा जपणा-या इतिहासकारांनी गुरू रविदासांच्या क्रांतिकारी विचारधारेला नष्ट करण्यासाठी अनेक चमत्कारिक गोष्टी लिहून ठेवल्या. त्या त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आहेत; हे सुज्ञ जनतेने ओळखले पाहिजे.
हिंदू-मुसलमान मंदिर-मस्जिदसाठी भांडतात. एकमेकाचे रक्त सांडतात. यासंदर्भात संत रविदास असे म्हणतात की, राम-रहीम एकच आहेत. परमेश्वर सर्वव्यापी आहे. सर्वांचा धर्म हा मानवधर्म असला पाहिजे. संत हे कोणत्याही धर्माचे नसतात तर सर्व धर्मियांसाठी असतात. म्हणून हिंदू-मुसलमान बंधु-भगिनींनी एकमेकांशी मित्रत्वाने वागले पाहिजे. याविषयी ते लिहितात;
*मुसलमान सों दोस्ती, हिंदुअन सों कर प्रीत।*
*’रविदास’ जोती सभ राम की, सभ है अपने मीत।।*
याप्रमाणे धर्मा-धर्मातील तेढ दूर करून माणसांना जोडण्याचे कार्य करायला सांगतात.
संत रविदास हे मूर्तीपूजेचे विरोधक होते. कारण अंधश्रद्धेमुळे समाजाची प्रगती होऊ शकत नाही. समाजाचे विभाजन होते. भेदाभेद वाढतो. ‘माझा देव मोठा’ असा संघर्ष होतो. देव व दैवावरच अवलंबून राहिल्याने मनाची दुर्बलता वाढते व विचारशक्तीचा क्षय होतो. असा विचार त्यांनी सातत्याने मांडला. देवी-देवतांच्या मूर्त्या बनविणे, दूध, चंदन, तांदूळ, तूप, पाने-फुले चढविणे, भोग लावणे, पशूंचे बळी देणे; हे सर्व कर्मकांड ईश्वरवादी लोकांद्वारे
गुरू रविदास हे संत, समाजसुधारक, विचारवंत, तत्त्ववेत्ता व उत्कृष्ट कवी होते. संत रविदास उत्तर प्रदेशातील असल्यामुळे त्यांची काव्यरचना हिंदी भाषेतच सिद्ध झाली. त्यांच्या विराट प्रतिभेतून जे मानवतावादी व समतावादी विचार स्फुरले; ते काव्यबद्ध होत गेले. सध्या त्यांच्या नावे १०१ पदे (दोहे), १८ साख्या व ४१ कवितांचा उल्लेख होतो. ह्याच काव्यांचा आधार निरक्षर व अज्ञानी जनतेसाठी जागृतीचा सुलभ व सुष्ट मार्ग ठरला. संत रविदासांच्या साहित्याने दलित-शोषित समाज जागृत होईल, देव-धर्म-कर्मकांडाद्वारे धार्मिक लूट व शोषणाला आळा बसेल आणि सनातन्यांचे वर्चस्व संपून जाईल; या भीतीने त्यांचे साहित्य गहाळ केल्याची सत्यता नाकारता येत नाही. कारण संत तुकाराम महाराज हे शूद्र होते म्हणून त्यांचे अभंग इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यात आले. संत रविदास तर चांभार जातीचे. त्यामुळे ते अस्पृश्य, अंत्यज समजले गेल्यामुळे त्यांच्या साहित्याची काय गत केली गेली असेल; याची कल्पनाच केलेली बरी!
भारत सरकारतर्फे संत शिरोमणी रविदासांच्या सन्मानार्थ त्यांची प्रतिमा असलेले २० पैशांचे तसेच ३ रूपयांचे टपाल तिकीट काढले गेले आहे. भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे ‘संत गुरू रविदास पुरस्कार’ सुवर्णपत्र व प्रशस्तीपत्र देऊन केला जातो. उत्तर प्रदेशात संत रविदास जयंतीला सरकारी सुटी दिली जाते, तर एका जिल्ह्याला ‘संत रविदास जिल्हा’ असे नाव देण्यात आले आहे. इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात व बी.ए., एम. ए. अभ्यासक्रमात संत रविदासांच्या वाड्.मयाचा समावेश आहे. उत्तर भारतात अनेक विद्यापीठात ‘संत रविदास अध्यासन’ स्थापन झालेले आहेत. भारताची राजधानी दिल्ली येथील सुप्रसिद्ध बिर्ला मंदिरात संत रविदासांची पदे (दोहे) संगमरवरी दगडात कोरली आहेत. त्यांच्या हिंदी वाणीचे मराठी, पंजाबी, इंग्रजी व इतर भाषांतही रूपांतर झाले आहे. ओंकार फिल्म इंटरनॅशनलकृत के. ए. महाय प्रस्तुत ‘संत रविदासकी अमर कहाणी’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती झाली आहे. तसेच सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांची संत रविदासांवरील शास्त्रोक्त भजनाची कॅसेट तयार झाली आहे.
अशाप्रकारे संत रविदासांचे राष्ट्रीय स्तरावरील कार्य, त्यांची प्रतिभा व ज्ञान आधुनिक भारताच्या निर्मितीला नेहमीच प्रेरक राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना समाजात रूजवणे अगत्याचे आहे. वर्षानुवर्षे चालत असलेल्या अन्याय, अत्याचार व शोषणाविरूद्ध गुरू रविदास उभे राहिले आणि आपल्या असीम निष्ठेने, अविरत परिश्रम आणि सदाचाराच्या बळावर संत परंपरेत सर्वोच्च स्थान व सन्मान प्राप्त केले. समाजाला दिशा देणारे ते संत वंशातील महत्त्वाचा दुवा होते. यावरून संत रविदास हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते; हेच दिसून येते. अशा महान मानवतावादी संतपुरूषाला त्यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक अभिवादन!
– ५२-ब, साईनगर,
गणेश अपार्टमेन्टजवळ,
दिघोरी नाका,
नागपूर – ४४००३४
मो. ९४२१८०३४९८
९७६६२७८८२४